"अरे यार ! काय सांगू ? आम्ही साऊथला फिरायला गेलो होतो ना, (इथे "साऊथ"ची व्याख्या प्रदेशानुसार बदलते. वैदर्भिय माणसांसाठी बल्लारशाच्या दक्षिणेला "साऊथ", लातूर - नांदेडकरांसाठी हैद्राबादच्या दक्षिणेला "साऊथ" तर पुणे - मुंबई - नाशिककरांसाठी सोलापूर - बेळगाव सोडले की सगळे "साऊथ"च) तिथे यार ते दोन तीन दिवस दोसा, इडली, सांबर चटणी ठीक वाटत यार. पण आपल्याकडे मिळणारा दोसा, उत्तपम आणि साऊथला मिळणारा दोसा उत्तपम यात प्रचंड फरक आहे यार. आणि तिकडच्या प्रदेशात तर पोळ्या वगैरे तर मिळतच नाहीत. नुसता भात.
पानात वाढलेला इतकाला भात आणि तो तेव्हढाही भात संपविणारी माणसं पाहून तर आपलं भैय्या भात खाण्यावरचं मनच मेलं. आता कमीतकमी १५ दिवस तरी मी भात घरीसुध्दा खात नाही पहा." असा डाॅयलाॅग दक्षिण भारताच्या सहलीवरून परतलेल्या शेकडा ९० % घरांमध्ये एक ना एक तरी मेंबर मारतोच. त्याशिवाय त्या सहलीची सांगताच होत नाही.
"अरे, नाॅर्थला काय थंडी ! तिकडे रोट्या मिळतात यार पण अगदी मैद्याच्या, वातड. ओढून ओढून रोट्या तोडून खायचा कंटाळा आला न बे शेवटी शेवटी. अन तिकडे सगळीकडे राजमा चावल आणि हे...इतकं बटर टाकून केलेल्या भाज्या. नंतर नंतर तर बटर पाहूनच शिसारी येते.
केव्हा एकदा घरी येतो आणि आपल्या घरचा साधा वरण भात खातो असं झालं होतं आम्हा सगळ्यांना." उत्तरेच्या सहलीवरून परतलेल्या घरातला एक तरी सदस्य हा डाॅयलाॅग घरी मारतोच मारतो.
आजकाल "आम्ही काश्मीरच्या डाल लेक मध्ये आमच्या प्रवाशांना पुरणपोळीचे जेवण दिले" किंवा "कन्याकुमारीच्या बीचवर आमच्या प्रवाशांसाठी आमचा श्रीखंड पुरी चा बेत रंगला" टाईप ट्रॅव्हल कंपन्या निघालेल्या आहेत. त्या कंपन्यांशी आमचे मुळात गोत्रच जुळत नाही. अरे बाबांनो, पुरणपोळी, श्रीखंड पुरी हे पदार्थ कुठे आणि कसे खाल्ले पाहिजेत ? याचे निश्चित प्रोटोकाॅल्स आहेत. एखाद्या बीचवर खायची ती भेळपुरी किंवा फारफारतर शेवपुरी. पण श्रीखंड पुरी म्हणजे खूपच झाली इचिबीन.
बाकी एकूण एक मराठी माणसे; मग ती पर्यटनाला सिक्कीमला जावोत नाहीतर केरळला, फुकेतला जावोत नाहीतर नाॅर्दन लाईटस बघायला स्कँडेनेव्हियात; त्या ट्रीपवरून परतल्यानंतरचे भरतवाक्य मात्र एकच "इतके फिरलो, रामभाऊ, पण घरचे पिठलं भात ते घरचे पिठले भात." हे वाक्य एकदाचे म्हटले की नंतरच मराठी प्रवाशांच्या प्रवासकथनाची इतिश्री होते.
- स्वतः प्रवासपक्षी असलेला, जिथे जातोय तिथले वैशिष्ट्यपूर्ण पदार्थ (अर्थात माझ्यासाठी शाकाहारी) खाऊन पाहिलेच पाहिजेत या अट्टाहासाचा आणि तरीही घरच्या वरणभाताला कायम आसुसलेला टिपीकल एवंगुणविशिष्ट मराठी माणूस, प्रा. वैभवीराम प्रकाश किन्हीकर.
गुरूवार, १२ जून २०२५
शेगाव
#सुरपाखरू
#३०दिवसात३०
#जून२०२५
No comments:
Post a Comment