कवी कुसुमाग्रजांची एक कविता आहे.
व्योमातून उडताना ओढीतसे मज घरटे,
अन उबेत त्या घरट्याच्या क्षुद्र तेच मज गमते.
एखादा कवी, एखादा लेखक असा सार्वकालिक होत असतो की त्याच्या लिखाणाचे संदर्भ हे त्या त्या काळाशी जोडलेले नसतात तर ते मानवी वृत्त्तीशी, मानवी स्वभावाशी, मानवी क्रिया प्रतिक्रियांशी जोडलेले असतात. आणि जगात जोपर्यंत मानवजात आहे तोपर्यंत त्यांच्या वृत्त्ती, त्यांचे स्वभाव, त्यांच्या क्रिया प्रतिक्रिया या सारख्याच असणार. म्हणूनच या मानवी स्वभावाचा अभ्यास करून लिहीलेले एखादे "वाडा चिरेबंदी" सारखे नाटक आजही आपल्याला आपल्या घरीच घडणारी घटना म्हणून बघाविशी, चिंतन कराविशी वाटते. वाडा संस्कृती आज कालबाह्य झाली असली तरीही एखाद्या कुटुंबामधले नात्यांचे पीळ, नात्यांची वीण, ती उसविण्याची कारणे हे आपण आपल्या आजूबाजूला, कदाचित आपल्या घरी सुद्धा सतत बघत असतो. आणि म्हणून ते नाटक कुठेतरी आपल्या मनाला भिडते.
अशा अनेक कलाकृती आहेत. बरेचसे सिनेमे आहेत. विस्तारभयास्तव त्यांचा उल्लेख इथे टाळतो. पण कुसुमाग्रजांची उपरोल्लेखित कविता मात्र अशाच मानवी वृत्त्तीचे आरस्पानी दर्शन देणारी आहे. (व्वा ! ब-याच दिवसांनी "उपरोल्लेखित" आणि "आरस्पानी" हे शब्द लिखाणात आले. अगदी विद्यापीठात मराठी भाषेचे प्राध्यापक झाल्यासारखे वाटले.)
आज जी पिढी चाळीशी किंवा पन्नाशी पार केलेली आहे त्यांना या माझ्या विधानाचा तत्काळ प्रत्यय येईल. आपल्या बालपणी बहुतांशी घरे अंगणे यांच्या भिंती, जमिनी मातीच्या असायच्या. त्यांचे पोपडे निघायचेत. मातीचे फ़्लोरिंग दर आठवड्याला शेणाने सारवावे लागे आणि अंगणात आठवड्याला शेणसडा टाकावा लागे. भिंतींना दरवर्षी एकदा तरी मातीचा गिलावा करून रंगवावे लागे. आमच्या कडे गणपती महालक्ष्म्यांआधी भिंती रंगवीत असत. बहुतांशी घरी दस-या नंतर दिवाळी आधी हे रंगकामाचे प्रकरण चालायचे. दर आठवड्याला जमिन सारवायचा अगदी कंटाळा यायचा. ते गोठ्यातून शेण आणा, बादलीत कालवा आणि जमीन सारवा. वैताग यायचा. केव्हा एकदा हे घर सोडून छान फ़रशी घातलेल्या किंवा सिमेंटचा गिलावा केलेल्या घरात आपण जातोय असे व्हायचे. फ़्लोरिंगला मार्बल असलेली घरे तेव्हा फ़क्त हिंदी सिनेमांमध्येच दिसायची आणि आपण कधीतरी असल्या घरांमध्ये रहायला जाऊ हे आमच्या कधी स्वप्नातही आले नव्हते. मग आजसारख्या मार्बोनाईट वगैरे व्हिट्रीफ़ाईड टाईल्स तर गोष्ट दूरचीच. असे काही येईल याची कल्पनाही कुणाला नव्हती.
गेल्या २० - २५ वर्षांमध्ये या नवनवीन आणि सहज साफ़ करता येऊ शकणा-या गुळगुळीत टाईल्सवर आपण सहज वावरतोय. इतवारीतून किराणा आणावा इतक्या सहजतेने घराला इटालियन मार्बल चे फ़्लोरिंग बसवतोय. पण नंतर लक्षात येतय की हिवाळ्यात या फ़्लोरिंगवर उघड्या पायांनी चालणे तर सोडाच हे फ़्लोरिंग लावलेल्या खोलीत बसणेसुद्धा अशक्य व्हावे, इथे बसल्यावर एखाद्या शीतगृहात बसल्यासारखे वाटावे इतका या फ़्लोरिंगचा प्रताप आहे. मग काय मोजे, घरात घालायच्या सपाता (हा शब्दही फ़ार दिवसांनी भेटला आणि उपयोगात आणला.) घालूनच आपण घरात वावरतोय आणि खास डॉक्टरांच्या सल्ल्याने, एखाद्या वास्तूतज्ञाच्या सल्ल्याने घराबाहेर चार फ़ूट बाय चार फ़ूटाचा चौकोन मुद्दाम टाईल्स न लावता तसाच ठेवलाय. रोज तिथे जाऊन सहज जमिनीला पाय टेकवून आपले अर्थिंग करून येतोय. ती जागा दर आठवड्याला सारवण्यासाठी शेण आणतोय आणि ती जागा स्वछ ठेवण्यासाठी रोज तिथे सडा रांगोळी वगैरे करतोय. "व्योमातून उडताना ओढीतसे मज घरटे"
आमच्या बालपणी आमची आई, मावश्या, माम्या या दर आठवड्यात कुठल्या ना कुठल्या वारी उपवास धरायच्याच. शेगावच्या गजानन महाराजांसाठी म्हणून गुरूवार तर बहुतेक घरी असायचाच. सकाळी जेवण करून घेऊन संध्याकाळी फराळाला उसळ असायची. (विदर्भाच्या हद्दीबाहेर जिला साबुदाण्याची खिचडी म्हणतात ती उसळ. किंबहुना ज्या जागेपासून तिला साबुदाण्याची खिचडी म्हणायला सुरूवात होते ती विदर्भाची हद्द हा आमचा पक्का खाद्यसांस्कृतिक भुगोल. किंबहुना उपवासाच्या दिवशी "खिचडी खाल्ली" असे म्हटल्यावर देखील ज्याचा उपवास मानसिकरित्या मोडल्या जातो तो खरा वैदर्भिय माणूस. हे आमच्या वैदर्भिय माणसांचे व्यवच्छेदक लक्षण. असो, मूळ मुद्दा तो नाही.)
त्याकाळी सर्वसामान्य मध्यमवर्गीय घरांमध्ये ही उसळ करायला सरसकट वनस्पती तूप (डालडा) वापरले जाई. प्रत्येकाच्या वाट्याला ही उसळ थोडीथोडीच (वाटीभर वगैरे) यायची. खूप सुबत्त्ता नव्हती. महिन्याभरासाठी एखाद्या चौकोनी कुटुंबात एखादा किलो शेंगदाणे आणि अर्धा किलो साबुदाणा असा किराणा येत असे आणि तो महिनाभर पुरवावा लागे. त्यामुळे आम्ही बाळगोपाळांनी ती अप्रतिम चवीची उसळ खाण्याकरिता दंगा केला की "अरे, तिला उपास आहे, तिला खाऊ देत भरपूर. तुमचे लेको आताच जेवण झाले ना." वगैरे दटावणी घरातल्या वडिलधार्यांकडून मिळायची सुध्दा. पण खरं सांगतो त्या वाटीभर (द्रोणभर) उसळीची चव इतकी अप्रतिम असायची की ती उसळ संपूर्ण कढईभरही आपण खाऊ शकतो हा आमच्यातल्या सगळ्या बाळगोपाळांना आत्मविश्वास असे. वाटीभर उसळ खाऊन मन आणि पोट दोन्हीही भरत नसत. पुढल्या गुरूवारी तशी उसळ घरी कधी होतेय ? याची वाट आम्ही बघत असू. ती आस, तो ध्यास आम्हाला आमच्या त्या आठवड्यातल्या इतर घडामोडींमध्ये बळ पुरवीत असे.
बाकी या उसळीची खरी चव म्हणजे पळसाच्या पानांच्या द्रोणातच (वैदर्भिय भाषेत 'डोन्या'तच) असे माझे स्पष्ट मत आहे.
आज तेच आमचे मध्यमवर्गीय जीवन आपापल्या विद्यावैभवाच्या बळावर लक्ष्मीमाता प्रसन्न करुन घेऊन स्थिरावले आहे. उच्च मध्यमवर्गीय, श्रीमंत झालेले आहे. आता उसळीसाठी चांगले साजूक तूप वापरण्याची ऐपत मध्यमवर्गीय घरांमध्ये आलेली आहे. प्रत्येकाला त्याचे पोट आणि मन भरेस्तोवर अशा उसळी करता येतील इतपत ऐपत आणि मने विस्तारलेली आहेत. पण आज आमच्या बालपणची ती चव हरवली आहे हे माझे निरीक्षण आहे. आज वाटीभर उसळ सुद्धा कधीकधी खाऊ शकत नाही अशी परिस्थिती आहे. त्यात त्या उसळीची चवच हरवलीय ? की कुसुमाग्रजांच्या "उबेत त्या घरट्याच्या क्षुद्र तेच मज गमते" ओळींसारखे असे होते आहे ? ह्याचा विचार आज खरोखर करावासा वाटतोय ना ?
मी ही अशीच दोन उदाहरणे दिलीयत. आपल्यालाही असे अनेक अनुभव आलेले असतील. ते कॉमेंटमध्ये लिहा. बहुधा "आमच्या वेळी" किंवा "आम्ही तरूण होतो ना" वगैरे ओळी आपल्या लिहीण्याबोलण्यात आल्या की आपल्याला लोकं "हा लेकाचा आता म्हातारा झाला, आता जास्त नॉस्टॅल्जियामध्ये रमतोय" वगैरे बोलतील की काय ? अशी उगाचच भिती वाटायला लागते पण एका मेंदूतज्ञ डॉक्टरांच्या मते अशा जुन्या आठवणींमध्ये रमणे म्हणजे आपल्या मेंदूला पूर्णपणे आणि अधिक कार्यक्षमरित्या वापरणे होय. जुन्या स्मृती ज्या मेंदूच्या कप्प्यात साठवल्या गेल्या आहेत त्यांच्यापर्यंत असे मध्येमध्ये आठवणींच्या द्वारे रमणे म्हणजे मेंदूचा तो भाग अजूनही वापरात आणणे आणि भावी अल्झायमर किंवा डिमेन्शिया पासून आपल्या मेंदूचे आपणच रक्षण करणे होय. मग आठवा तुमच्या बालपणीच्या अशा गोष्टी ज्या तुम्हाला बालपणी फ़ार आवडत नव्हत्या किंवा त्यातून सुटका होण्यासाठी तुम्ही प्रयत्न करीत होतात आणि आज त्यातून तुम्ही मोकळे झालायत तर तुम्हाला त्या एकेकाळी नको वाटणा-या गोष्टींचीच ओढ लागलीय.
- नॉस्टॅल्जियात रमणारा म्हातारा, प्रा. वैभवीराम प्रकाश किन्हीकर
गुरूवार, १९ जून २०२५
नागपूर
#सुरपाखरू
#३०दिवसात३०
#जून२०२५
No comments:
Post a Comment