Wednesday, June 25, 2025

प्रसन्न "गोल्ड लाईन" घाडगे पाटील "Snooooozer" आणि लक्झरी बसेस बद्दल माझ्या अपेक्षा

 माझ्या कुंडलीत प्रवासाचे भरपूर योग असावेत आणि त्यातही प्रवास आरामदायकच व्हावेत असेही योग असावेत. तूळ किंवा वृषभ राशीचा उच्चीचा शुक्र असला की आयुष्यात असे लक्झरीचे योग येतात असे म्हणतात. माझ्या कुंडलीत हा बेटा शुक्र कुठे बसला आहे, कोण जाणे ! पण आरामदायक प्रवासाचे भरपूर योग आलेत हे मात्र नक्की. अर्थात काही काही प्रवास दगदगीचेही ठरलेत म्हणा. त्यांच्यावर एक स्वतंत्र ब्लॉगपोस्ट येऊ शकते. कदाचित तेव्हा तो गोचरीचा शुक्र नेमका वक्री असावा. बाकी शुक्र मार्गी असावा असेच योग जास्त.


मागील एका लेखात वर्णन केल्याप्रमाणे प्रसन्न ट्रॅव्हल्सने साधारण १९९३ मध्ये नागपूर - पुणे प्रवासासाठी त्यांची "गोल्डलाईन" ही लक्झरी बस सुरू केली होती. त्यातल्या ब-याचशा सोयीसुविधा त्या काळाच्या पुढे होत्या आणि काहीकाही सोयीसुविधा तर आजही ब-याचशा आराम गाड्यांमध्ये दिसत नाहीत. 


प्रसन्न ची "गोल्डलाईन" बस नागपूरवरून प्रसन्नच्याच "विदर्भ क्वीन" च्या पाटोपाठ दुपारी ३.३० च्या सुमारास निघत असे. अकोल्याला रात्री ८.३० ला पोचून पुढे पुण्याला सकाळी ७ पर्यंत पोचत असे. या वातानुकूल गाडीचे काहीकाही खास फ़ीचर्स असे होते.


अ) या गाडीमध्ये आसनांच्या ६ च रांगा होत्या. त्याकाळी "विदर्भ क्वीन" आणि इतरही गाड्यांमध्ये आसनांच्या १० रांगा असायच्यात. म्हणजे दोन रांगांमधले अंतर "गोल्डलाईन" मध्ये इतर बसेसच्या तुलनेने १६६ % जास्त होते.


आ) या "गोल्डलाईन" बसमध्ये आसनांची व्यवस्था २ बाय १ अशी होती. इतर सर्व बसेसमध्ये ती २ बाय २ अशी असायची. म्हणजे प्रत्येक आसनाची रूंदी १३३ % जास्त असू शकत होती. म्हणजे अधिकचा आराम.


इ) "गोल्डलाईन" बस इतर बससारखी १०.५ मीटर लांब असूनही फ़क्त १८ प्रवाशांना घेऊन प्रवास करीत होती. त्याकाळच्या इतर बसेस मात्र ३५ आसनी होत्या. याचाच अर्थ या "गोल्डलाईन" बस मधल्या सगळ्या प्रवाशांना मधल्या थांब्यांवर चढण्या उतरण्यासाठी कमी वेळ, कमी गर्दी लागत असणार. ही बस प्रवाशांना एखाद्या मोठ्या कारसारखीच वाटत असणार.


ई) "गोल्डलाईन" ही बस सेमी स्लीपर बस होती. दोन रांगांमध्ये अंतर जास्त असल्याने प्रत्येक प्रवाशाला भरपूर पुशबॅक करता येत होता आणि त्यासोबतच पायांच्या पोट-यांना अधिकचा आधार या गाडीतल्या विशेष आसनांमुळे मिळत होता. त्याकाळी स्लीपर बसेसचे प्रस्थ नागपूर - पुणे मार्गावर फ़ारसे नव्हते, किंबहुना एक सुद्धा स्लीपर कोच बस या मार्गावर नव्हती. तेव्हा त्याकाळी ही "गोल्डलाईन" सेमी स्लीपर बस आरामाच्या दृष्टीने या मार्गावर सर्वोत्त्तम होती हे नक्की.


उ) त्याकाळी बसमध्ये टी व्ही. असणे आणि एव्हढ्या लांबच्या प्रवासात मनोरंजन म्हणून एक दोन सिनेमे बघणे हे त्या काळी सगळ्यांसाठी एक आवश्यक गोष्ट होती. बरे, रात्री एका विशिष्ट वेळेनंतर काही काही प्रवाशांना झोप घ्यायची असायची तर इतर काही प्रवाशांसाठी टी. व्ही. सुरूच असायचा त्यामुळे काही प्रवाशांची अकारण झोपमोड होत असे. प्रसन्न कडून प्रत्येक प्रवाशाला स्वहेडफ़ोन्स दिले जात होते. त्यामुळे ज्यांना टी. व्ही. बघायचा नाही ते प्रवासी निवांत हेडफ़ोन्स काढून झोपेची आराधना करू शकायचेत. या बसच्या सीटस मध्ये चॅनेल म्युझिक ऐकण्यासाठी जॅक्स होते. त्यामुळे ज्याला उत्त्तम संगीताचा आनंद घ्यायचाय असे प्रवासी संगीतसुद्धा ऐकू शकायचेत. अर्थात प्रसन्न मध्ये लागणारे सिनेमे सुद्धा दर्जेदार असायचेत.


ऊ)  या "गोल्डलाईन" बसमध्ये प्रवाशांचे स्वागत एका वेलकम ड्रिंकने होत असे. सोबतच एक पाण्याची बॉटल आणि एक वेट वाईप टिश्यू पेपर दिला जात असे. 


प्रसन्न "गोल्डलाईनची" जाहिरात. आसनव्यवस्था त्या काळाच्या मानाने भरपूर पुढचा विचार केलेली होती.

बाकी इतर तर प्रसन्न चे सिग्नेचर फ़ीचर्स सोबत असायचेत. चांगल्या ठिकाणी जेवायला थांबणे, वेळेवर निघणे आणि पोचणे, मधल्या थांब्यांवरून अनधिकृत प्रवासी न घेणे वगैरे. त्यामुळे त्या काळी ही "गोल्डलाईन" बस नागपूर पुणे प्रवासाच्या सोयींमधली लक्झरीचा सर्वोच्च आदर्श होती. अर्थात या बसचे तिकीटही इतर बसेसच्या तुलनेत दुपटीपेक्षा जास्त महाग होते. पण प्रवाशांच्या सोयीचा, आरामाचा विचार करून, इतर स्पर्धक काय देऊ शकत नाहीत ते आपण देऊयात या भावनेने सोयी सुविधा पुरवलेली नागपूर - पुणे प्रवासासाठीची ही पहिली बस होती. हिची बस बांधणीपण "विदर्भ क्वीन" प्रमाणेच पुण्यातल्या ऑटो बॉडी या कंपनीनेच केलेली होती.


बाकी अशीच एक अतिशय उत्त्तम सेवा बरीच वर्षे कोल्हापूर ते मुंबई, मुंबई ते छत्रपती संभाजीनगर या मार्गावर कोल्हापूरचे घाडगे पाटील ट्रॅव्हल्स (मोहन ट्रॅव्हल्स) चालवीत असे. ही बस वातानुकूल शयनयान होती पण शयन आसनांची रचना इतर गाड्यांप्रमाणे २ बाय १  नसून १ बाय १  असायची. म्हणजे उजव्या आणि डाव्या बाजूला खालच्या बाजूला आणि वरच्या बाजूला एक एकच बर्थस. या गाडीत अशा ५ बर्थसच्या रांगांमध्ये २० बर्थस ची सोय होऊ शकत होती पण घाडगे पाटलांनी पहिले रांगेतले उजवीकडले पहिले दोन बर्थस काढून तिथे प्रवाशांच्या हॅंडबॅग्जसाठी जागा केलेली होती. बर्थसवर झोपताना जवळ आपली बॅग घेऊन अवघडून झोपण्यापेक्षा ती बॅग त्या रॅकमध्ये आपल्या नजरेसमोर ठेऊन सगळे प्रवासी निवांत झोपण्याचा आनंद घेऊ शकत होते. मोठे जड सामानसुमान ठेवायला बसच्या पोटात डिक्की होतीच पण तरीही जवळच्या छोट्या छोट्या सामानासाठी प्रवाशांची गैरसोय होऊ नये म्हणून बसमध्ये फ़क्त १८ च बर्थस होते. आणि त्याकाळी कोल्हापूर - मुंबई धावणा-या इतर गाड्यांच्या तुलनेने हिचे तिकीट थोडेसेच महाग होते. म्हणजे दीडपट वगैरे. अत्यंत आरामदायक प्रवासासाठी एअर सस्पेन्शन असणा-या या गाडीवर दोन्हीही बाजूला "Snooooozer" असे लिहीले असायचे. त्यातही मधल्या दोन "oo" त दोन अत्यंत झोपाळू असे डोळे काढलेले असायचे आणि शेवटल्या "r" नंतर घोरण्याचे प्रतिक म्हणून z z z असायचेत. या गाडीत बसतानाच आपण इथे निवांत झोपणार आहोत अगदी घोरेपर्यंत निवांत ही भावना व्हायची. बस तशी खरोखर खूप आरामदायक होती. सगळ्यात महत्वाचे म्हणजे प्रत्येक शायिकेखाली प्रवाशांची पादत्राणे एकाच जागी आणि व्यवस्थित राहतील अशी उत्त्तम शू रॅक पण त्या बसमध्ये होती.  


घाडगे पाटील मधला आमचा कोल्हापूर ते वाशी प्रवास. तसा आरामदायक बसप्रवास पुन्हा झाला नाही.


नंतर घाडगे पाटलांनी ही सेवा बंद केली. नवी सेवा "Snooooozer" होती खरी पण ती इतर ट्रॅव्हल्सप्रमाणे २ बाय १  केलेली होती. घाडगे पाटलांची बस, त्यांच्या बसचे मेण्टेनन्स वगैरे इतर कुणापेक्षाही उजवे असले तरी या बसचे वैशिष्ट्यपूर्ण फ़ीचर १ बाय १  शयनव्यवस्था होते ते हरवले होते.


आजच्या ट्रॅव्हल कंपन्यांनी जर २० वर्षांपूर्वीसारखा, प्रसन्न आणि घाडगे पाटील ट्रॅव्हल्स सारखा प्रवाशांच्या सुखसोयींचा आणि नेमकी त्यांची मागणी काय आहे ? याचा विचार केला तर आजही लांब पल्ल्याच्या बससेवेत खालील बदल घडू शकतील.


१) बसप्रवासासाठी आजकाल प्रवाशांची विशेषतः महिला प्रवाशांची आणि ज्येष्ठ नागरिकांची मुख्य अडचण म्हणजे बसेसमध्ये चांगली स्वच्छतागृहे नसणे. प्रवासात निसर्गाच्या हाकेला ओ देण्यासाठी दरवेळी बस थांबवावी लागणे. यात बसचालकांचाही 

ब-याचदा नाईलाज असतो. रात्री बेरात्री निर्जन स्थळी अशी बस थांबवून प्रवाशांना उतरण्यासाठी मुभा देणे धोक्याचे असू शकते. ज्या थांब्यांवर बस जेवण, नाश्यासाठी थांबते तिथली स्वच्छतागृहे चांगली आहेत की नाहीत यावर ट्रॅव्हल कंपनीचे कुठलेच नियंत्रण नसते. अशा कारणासाठी एखादा थांबा वगळून दुस-या थांब्यावर बस थांबवली तर तिथेही पहिले पाढे पंचावन्नच असतात.


यावर उपाय म्हणजे बसमधली मागची एक पूर्ण रांग काढून तिथे विमानाच्या धर्तीवरची दोन व्हॅक्युम स्वच्छतागृहे तयार करणे. आताशा अशी टेक्नॉलॉजी वापरणे म्हणजे रॉकेट सायन्स नव्हे आणि या दर्जाची स्वच्छतागृहे आता उभारणीच्या आणि नियमित देखभालीच्या दृष्टीनेही तुलनेने स्वस्त आहेत. त्यामुळे मागच्या शयन रांगेच्या ऐवजी अशी दोन स्वच्छतागृहे प्रवाशांचा खूप मोठा त्रास वाचवू शकतील.


२) सरसकट सगळी आसने १ बाय १  च असावीत आणि त्यातही आसनांची व्यवस्था पॉडसारखी असावी. आजकाल सगळी माणसे घरीसुद्धा एकमेकांशी सर्वच बाबतीत अंतर ठेऊन असतात आणि अतिशय वैयक्तिक रित्या घरीही वावरत असतात त्यामुळे प्रवासात सहप्रवाशांशी गप्पा, त्यांच्यासह सुखदुःख वाटून घेणे खूप दूरची गोष्ट आहे. त्यात आपला बर्थ हा कुणासोबत शेअर करायचा म्हटल्यावर बहुतेकांना खूप अवघडल्यासारखे होते. त्यामुळे पॉड सारखे बर्थस असलेली बस लगेचच लोकप्रिय होईल यात शंका नाही. जपानमध्ये अशा पॉड बसेस आधीपासून वापरात आहेत.


३) आज प्रवाशांची सोय बघून विशेषतः जे प्रवासी एका दिवसाच्या कामासाठी नागपूर ते पुणे ते नागपूर असा प्रवास करत असतात त्यांच्या सोयीसाठी शेवटल्या रांगेतल्या काढलेल्या शायिकांऐवजी दोन स्वच्छतागृहांसोबत आणखी दोन क्युबिकल्समध्ये अत्यंत मॉड्युलर असे शॉवर्स उपलब्ध करून द्यावेत. म्हणजे रात्रभर प्रवास करून पुण्यात सकाळी पोचून दिवसभराची कामे करून रात्री परत नागपूरला परतणारी अशी जी मंडळी असतील त्यांना हे शॉवर्स म्हणजे वरदान ठरतील. रात्रभर प्रवास करून सकाळी पुण्यात पोचण्याआधी असे स्वच्छ अंघोळ वगैरे करूनच बसबाहेर पडणे त्यांच्यासाठी एका दिवसाच्या हॉटेलचा खर्च वाचविणारे ठरू शकते. असे शॉवर्स सुद्धा उभारणीच्या आणि नियमित देखभालीच्या दृष्टीने आजकाल शक्य आहेत. फ़ार खर्चिक नाहीत. पण जर अशा प्रवाशांची सोय बघितली तर या बसला थोडे जास्त तिकीट द्यायला अशा प्रवाशांची ना असणार नाही. आज पुण्यासारख्या शहरात एखाद्या हॉटेलची रूम फ़क्त अंघोळीसाठी आणि कपडे वगैरे बदलण्यासाठी घेणे यात प्रवाशांचे किमान १००० रूपये तरी जातात. त्याऐवजी या बसेसचे थोडे महाग तिकीट प्रवाशांना परवडेलच.


४) आता अशी बस ट्रॅव्हल्सवाल्यांना आणि प्रवाशांनाही परवडण्याच्या अर्थशास्त्राचा विचार करू. साध्या २ बाय १  शायिका असलेल्या बहुतांशी बसमध्ये आजकाल ६ रांगांमध्ये ३६ शायिका असतात. प्रत्येक आसना / शायिकेसाठी नागपूर ते पुणे तिकीट १५०० रूपये धरले तर एका पूर्ण बसमधून एका ट्रीपमध्ये ट्रॅव्हल्सवाल्यांना ५४००० रूपयांचा महसूल मिळतो.


आपण शेवटली रांग काढून तिथे दोन स्वच्छतागृहे आणि दोन शॉवर्स ठेवण्याचे नियोजन करतोय. त्यामुळे आपल्या बसमध्ये शायिकांच्या ५ च रांगांची व्यवस्था असेल. प्रत्येक रांगेत उजव्या बाजूला २ पॉडसदृश शायिका (१ खाली आणि १ वर अशा रचनेच्या) आणि डाव्या बाजूला सुद्धा २ च पॉडसदृश शायिका (१ खाली आणि १ वर अशा रचनेच्या) अशा ४ शायिका येतील. म्हणजे एकूण प्रवासीसंख्या २० होईल.


आता एकूण मिळणा-या महसूलाला (५४००० रूपये) २० ने भागले तर प्रत्येक प्रवाशाला २७०० रूपये प्रवासखर्च येईल. म्हणजे साधारण बसच्या जवळपास पावणेदोन पट. पण त्या वाढीव तिकीटात ज्या सोयीसुविधा मिळत आहेत त्या हव्या असणारे २० प्रवासी तर रोज दोन्हीबाजूने अशा बसला मिळतीलच. 


काय म्हणताय ? पोचवताय आमचे म्हणणे संबंधितांपर्यंत ? "गोल्डलाईन" किंवा "Snooooozer" सारखी अशी उत्कृष्ट सोयीसुविधायुक्त, आरामदायक बस सुरू झाली तर थोडे जास्त पैसे खर्चून प्रवास कराल ?



- स्वतः एस. टी. च्या साध्या बसने कोल्हापूर ते पुणे ते अकोला ते नागपूर असा सलग २५ तास प्रवास केलेला आणि "Snooooozer"  ने सुद्धा प्रवास केलेला, सर्वत्र असा आरामदायक प्रवास आवडणारा, सगळ्यांच्या आरामाचा विचार करणारा एक प्रवासी पक्षी प्रा. वैभवीराम प्रकाश किन्हीकर


बुधवार, २५ जून २०२५


नागपूर


#सुरपाखरू


#३०दिवसात३०


#जून२०२५


No comments:

Post a Comment