Tuesday, June 3, 2025

ॲनिमल फ़ार्म

जॉर्ज ऑरवेलची ॲनिमल फ़ार्म ही कादंबरी खूप प्रसिद्ध आहे. त्यात त्याने प्राण्यांच्या रूपकात मानवी वागणुकीचा धांडोळा घेतलेला आहे. त्याचे संदर्भ आज कदाचित वेगळे असतील पण कालबाह्य झालेले नाहीत. अशाच पद्धतीने एखादी कलाकृती कालातीत होत असते.


गेले काही महिने आमचे घरही कुत्री आणि मांजरांच्या अशाच फ़ार्म मध्ये बदलले आहे. एका पावसाळी संध्याकाळी पावसापासून वाचण्यासाठी घरी आमच्या अंगणात वळचणीला आलेल्या एका भू भू ला आम्ही हुसकावून लावत असताना त्याने फ़ाटकापर्यंत जाऊन इतक्या दयार्द्र नजरेने, व्याकुळतेने आमच्याकडे बघितले की त्याच्या डोळ्यातले भाव वाचूनच आम्ही त्याला परत घरात बोलावले. त्या दिवसापासूनच तो दर संध्याकाळी तो आमच्या अंगणात मुक्कामा्ला असतो. रात्री घराची राखण करतो. खरेतर या श्वान जमातीबद्दल मला यापूर्वी प्रचंड भिती वाटायची. त्यांच्यापासून लांब रहाणेच मी पसंत करायचो पण या बेट्याने जिव्हाळा लावला हे खरे. मी कॉलेजला जायला निघताना स्वतःचे लाड करून घेणे, मी परतल्यावर घरी धावत परतणे आणि पुन्हा लाड करून घेणे असले त्याचे आवडते उद्योग असतात. मला माझेच आश्चर्य वाट्ते. मी असे काही करेन यावर माझाच काही वर्षांपूर्वी विश्वास नव्हता.


तसेच एक मार्जार कूळ सुद्धा गेले काही महिने आमच्या परसदारातून घरी येते आहे. त्यात दोन मांजरी, दोन बोके आणि दर तीन चार महिन्यांनी त्यांची नवजात प्रजा यांचा आमच्या घरात धुमाकूळ असतो. पुलंचे लिखाण वाचून "बोका" या प्राण्याविषयी मी उगाचच गैरसमज करून घेतला असे मला आताशी पटलेय. या कुळाचा मी अगदी अभ्यासच केला तेव्हा माझ्या लक्षात आले की मनीम्याऊंपेक्षा हे बोकेच जास्त कुटुंबवत्सल असतात. आपापल्या आणि दुस-या बोक्यांच्या पिल्लांचीही खूप काळजी घेतात, त्यांना फ़िरायला वगैरे नेतात, आपल्या अंगाखांद्यांवर खेळवतात आणि कधीमधी शेजा-यांच्या घरी मांस मच्छी शिजवली असेल तर तर तिथे नेऊन पिल्लांना पार्टीही देतात.


मांजरी मात्र आपल्या पिल्लांविषयी एकट्यात निष्काळजी असतात पण हीच मांजर दुस-या मांजरीसमोर आपल्या पिल्लाची खूप काळजी घेते आणि तिच्या पिल्लांचा खूप दुस्वास करते. तसे दोन्हीही कुटुंबांच्या खाण्यापिण्यात आम्ही फ़रक करीत नाही. दोघींनाही पिल्ले झालीत की दोघींनाही आम्ही सारखेच जपतो, सारखेच लाड करतो पण दोघींचेही एकमेकींच्या पिल्लांना पाण्यात पहाणे काही संपत नाही. एकमेकींच्या पिल्लांवर वाईट नजर ठेवणे कायम सुरूच असते.


हाच अनुभव आम्हा नवरा बायकोला माणसांच्या वागण्यातही कायम आला आहे. माणसे आजकाल उगाचच एकमेकांचा, एकमेकांच्या पिल्लांचा दुस्वास करतात हे आमच्या लक्षात आले. तशी एकमेकांची कार्यवर्तुळे एकमेकांना कुठेच छेद देत नसतात. छंद, आर्थिक, सामाजिक, सांस्कृतिक परिस्थिती पूर्णपणे वेगळी असते. तरीही अकारण दुस्वास असतोच.


काही दशकांपूर्वी अशी स्थिती नव्हती. समाजात गुणग्राहकता होती. आपल्या मुलांमध्ये जर एखादा गुण त्याच्या समवयस्क सोबत्यांपेक्षा, नातेवाईकांच्या मुलांपेक्षा कमी असेल तर त्या गुणी मुलाचे कौतुक करून आपल्या अपत्याला त्या गुणांचा आदर्श ठेवण्याचा उपदेश होत असे. त्यात दुस-याच्या अपत्याविषयी थोडा मत्सर असला तरी आजसारखी असूया आणि दुस्वास तर मुळीच नसे.


दूरदर्शनवर अनेक वाहिन्या आल्यात. प्रत्येक वाहिनीला चोवीस तास दळण देणे भाग पडू लागले. सुमार, विकृत लेखक आणि विशेषतः अतिविकृत लेखिकांची सद्दी झाली. मालिकांमध्ये पाणी टाकून टाकून कथानक लांबविण्याच्या नादात आपण किती विकृत, चुकीच्या गोष्टी समाजात पसरवतोय हे त्या लेखक लेखिकांच्याही लक्षात आले नाही आणि आपण जे इथे बघतोय ही वस्तुस्थिती नाही हे त्या अत्यंत नाकर्त्या आणि आपापल्या घरात नाकारलेल्या लेखक लेखिकांचे स्वप्नरंजन आहे ही गोष्ट श्रोतेजनही विसरू लागलेत आणि मग समाज हळूहळू अशा दुस-यांच्या मुलामुलींचा दुस्वास करण्याच्या विकृत मनोवृत्तीकडे वळला. 


आजकाल व्हॉटसॅप विद्यापीठात तर तंत्र, मंत्र, टोटके, टोणे यांच्या ज्ञानाचे तर पेवच फ़ुटल्यासारखे झालेले आहे. या दुस्वासाची परिणीती मग अशा टोटक्यांच्या प्रयोगामध्ये होतेय. वरवर गोड बोलून नातेसंबंध ठेवणे आणि त्याआडून असे विकृत प्रयोग करणे यात आजकाल समाजातला अभिजन वर्गही सामील झाला आहे हे पाहून मनस्वी दुःख होते. हीच मंडळी मात्र दुसरा मुखवटा अत्यंत आध्यात्मिक मंडळींचा वापरतात आणि जगभर शालीनतेचे सोज्वळतेचे आध्यात्मिक ज्ञानप्रसाराचे कार्य करतात तेव्हा कलियुगाचा अंत अगदी जवळ आलाय याची खात्री पटते.


घरच्या ॲनिमल फ़ार्म मध्ये गुंतून जाताना बाहेर अशा विकृत नातेवाईकांच्या, सोय-या धाय-यांच्या ॲनिमल फ़ार्म पासून मात्र पळून जावेसे वाटते. माणसे आपल्या ॲनिमल इंस्टिंक्ट नुसार वागतात ? की प्राणी माणसांच्या वागण्याचे अनुसरण करतात ? ह्या प्रश्नाचे उत्तर ठरवणे अगदी कठीण आहे.


- ज्या ठिकाणी अन्न किंवा जल ग्रहण केल्यानंतर शरीरात नकारात्मक भावना जाणवल्यात तिथले अन्न आणि पाणी त्यानंतर दृढतेने नाकारणारा आणि अशा टॉक्झिक नातेसंबंधांना कटाक्षाने चार हात दूर ठेवणारा निश्चयात्मक गृहस्थ, प्रा. वैभवीराम प्रकाश किन्हीकर


मंगळवार, ३ जून २०२५


नागपूर


#सुरपाखरू


#३०दिवसात३०


#जून२०२५

No comments:

Post a Comment