Sunday, June 1, 2025

एक स्पर्धा ? नव्हे एक सुरेल मैफ़ल : कायमची मनात रूतून बसलेली.

एप्रिल १९९३. डी. वाय. पाटील अभियांत्रिकी महाविद्यालय कोल्हापूरचे विस्तीर्ण प्रांगण. शिवाजी विद्यापीठाचा विद्यापीठ स्तरीय युवक महोत्सव. यात उत्स्फ़ूर्त वक्तृत्व, समूहगायन, एकल गायन, वादविवाद, एकल वाद्यवादन अशा विविध स्पर्धांचे आयोजन. यात सामील असणारी विद्यार्थी मंडळी म्हणजे फ़ेब्रुवारी १९९३ मध्ये जिल्हावार झालेल्या युवक महोत्सवांमधून त्या त्या गटात पहिला आणि दुसरा क्रमांक मिळवलेली गुणी मंडळी. 


शिवाजी विद्यापीठाच्या कार्यक्षेत्रात तेव्हा सातारा, सांगली, सोलापूर आणि कोल्हापूर अशा चारच जिल्ह्यांचा समावेश होत होता. (नंतर २०१० च्या आसपास सोलापूर विद्यापीठाने स्वतःची वेगळी चूल मांडल्यावर सध्या विद्यापीठाच्या कार्यक्षेत्रात फ़क्त तीनच जिल्ह्यांचा समावेश आहे.) म्हणजे या सगळ्या स्पर्धांसाठी त्या त्या क्षेत्रातली गिनीचुनी आठच स्पर्धक मंडळी आलेली होती. स्पर्धा अगदी चुरशीची होणार हे निश्चित होते. 


आदल्या दिवशी आमची उत्स्फ़ूर्त वक्तृत्व स्पर्धा झालेली. एकापेक्षा एक सुंदर भाषणे आणि त्यातले विचार सगळ्यांना ऐकायला मिळालेले होते. ही भाषणे ऐकायला स्पर्धक तर होतेच पण कोल्हापूर शहरातले काही हौशी नागरिक पण स्पर्धास्थळी आलेले होते. दुस-या दिवशी एकल गायन स्पर्धा होती.


तिन्हीसांजेची कातर वेळ. एका छोट्याशा ऑडिटोरियम वजा वर्गखोलीत ही स्पर्धा आयोजित केलेली होती. तिथे थिएटरसारखे समोर एक स्टेज आणि समोर पायरीपायरीने चढत गेलेली प्रेक्षकांची बैठकव्यवस्था. छोट्याशा स्टेजवर ही तानसेन मंडळी गाणार होती. त्यांच्या सोबतीला केवळ तबला, पेटी आणि तानपुरा अशी मोजकीच वाद्ये होती. आजसारखा कॅराओके चा कल्लोळ नव्हता. आणि त्याकाळी हा कॅराओके असता तरी तिथे शक्य नव्हता. कारण स्पर्धेच्या नियमानुसार यापूर्वी रेडिओवर आणि इतरत्र रेकॉर्ड झालेली गाणी त्या अंतिम फ़ेरीत गायलेली चालणारच नव्हती. फ़क्त अनरेकॉर्डेड गाणी.


आज कॅराओके च्या कल्लोळात गायकाला गाणी पाठ असणे ही मूलभूत गरज आपण विसरत चाललेलो आहोत. व्यावसायिक गायक जेव्हा पहिल्यांदा एखादे गाणे म्हणतात तेव्हा माईकसमोर गाण्याचा, नोटेशन्सचा कागद लावून त्यांनी गाणी म्हणणे आपण समजू शकतो. त्यांच्यासाठी अनोळखी असलेली ती गाणी ते लोक केवळ दोन तीन तालमींनंतर म्हणत असतात. पण आज आपण सहस्र वेळा ऐकलेली, सगळी नोटेशन्स पाठ असलेली, शब्द पाठ असलेली गाणी एका हातात मोबाईल धरून दुस-या हातात तो कॅराओकेचा माईक धरून (त्यातही त्या मोबाईलची स्क्रीन ऑफ़ झाली की माईक धरलेल्या हाताने ती स्क्रीन पुन्हा सुरू करत) ते गाणे कसेबसे म्हणण्याची काय फ़ॅशन आलीय कोण जाणे ? यात त्या गाण्याचे काय भजे होते याचा विचार कुणीही करीत नाही. जे गाणे आपण श्रोत्यांसमोर सादर करतोय, ते लोकप्रिय आहे, आपल्याला आवडलेले आहे म्हणूनच सादर करतोय ना ? मग आपल्याला आवडलेले गाणे, लोकप्रिय गाणे आपल्याला त्यांच्यातल्या सुरावटीसकट पाठ असायला नको ? आणि ते गाणे आपल्यालाच अनोळखी असेल तर त्याच्या सादरीकरणात श्रोत्यांनाही मजा येत नाही हा सार्वत्रिक अनुभव आहे. असो काळ बदललाय हे स्वीकारूयात.


१९९३ च्या स्पर्धेत मात्र सगळी सामील स्पर्धक मंडळी खूप तयारीने आलेली होती. आयोजकांनी स्पर्धेआधीच सगळ्या स्पर्धकांना ते कुठली कुठली गाणी म्हणणार आहेत ? त्या गाण्यांचे राग कुठले कुठले आहेत ? याची चौकशी करून त्यानुसार गाण्यांचे क्रम ठरवलेले होते. हे अत्यंत महत्वाचे असते. कारण यासारख्या मोठ्या स्पर्धांमध्ये दुस-या तिस-याच स्पर्धकाने जर बिलासखानी तोडी किंवा भैरवीत गाणे गायले तर त्यापुढली गाणी कितीही चांगली गायली गेली तरी श्रोत्यांसकट परिक्षकांच्याही कानांना भावत नाहीत. आणि त्याचा निकालावर परिणाम होऊ शकतो. त्यानुसार स्पर्धकांचा क्रम ठरवताना आयोजकांनी तशी काळजी घेतलेली होती.


पहिलेच गाणे आमच्या शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालयाचा स्पर्धक आणि आमचा मित्र सतीश तानवडेने सादर केले. भवानीशंकर पंडितांचे अत्यंत अर्थगर्भ, श्रीनिवास खळ्यांच्या अत्यंत कठीण सुरावटीत रचलेले आणि पंडित हृदयनाथ मंगेशकरांनी अत्यंत तयारीने गायलेले "गेले ते दिन गेले". सतीशला त्यापूर्वी हे गाणे गाताना आम्ही अनेक हॉस्टेलला, अनेक खाजगी मैफ़िलीत ऐकलेले होते. हे गाणे तो हातखंडा म्हणत असे. पण तरीही त्यादिवशी त्या छोट्याशा सभागृहात त्याने गायलेले गाणे त्याचे तोपर्यंतचे गायलेले सर्वोत्कृष्ट गाणे होते. खूप ताकदीने आणि खूप मन लावून त्याने गाणे सादर केले होते हे आम्हा सर्व मित्रांना आतून जाणवत होते. संधिप्रकाश. सूर्य मावळतोय. आणि सोबतीला खूप तयारीने सादर केले गेलेले "गेले ते दिन गेले" सारखे मन कातर करणारे गाणे. गाणे संपताना केवळ आम्हा मित्रांचीच नव्हे तर सर्व श्रोत्यांचीही मने कातर झालेली त्यांच्या चेहे-यांवरून कळत होते. 


त्यानंतर दोन तीन स्पर्धकांचीही अशीच सुंदर तयारीची गाणी सादर झालीत. त्याकाळी रेकॉर्डिंग करण्याची साधने होती खरी पण ती अत्यंत मर्यादित होती. स्वतःचा वॉकमन वगैरे असण्याची चैन महाविद्यालयातल्या एखाद्या विद्यार्थ्याला परवडत असे. त्यामुळे आजसारखी रेकॉर्ड करण्याची साधने असती तर त्यादिवशी सगळ्या स्पर्धकांनी गायलेली गाणी तिथल्या सगळ्याच श्रोत्यांनी रेकॉर्ड करून ठेवली असती आणि आपापल्या आयुष्यभर अनंत हळव्या संध्याकाळी ती मैफ़ल ऐकली असती. इतकी ती सुंदर मैफ़ल त्यादिवशी त्या छोट्याशा ऑडिटोरियममध्ये जमून आलेली होती. ती स्पर्धा आहे ही गोष्ट स्पर्धकांसकट सगळेच जणू विसरलेच होते. परिक्षकांना मात्र ही स्पर्धा आहे हे लक्षात ठेवणे भाग होते. इतर श्रोत्यांप्रमाणे ते त्या मैफ़िलीत वाहून जाऊ शकत नव्हते. मला त्यादिवशी त्या परिक्षकांची खरोखर कीव आली. सगळीच गाणी प्रथम क्रमांकाची झालेली असताना केवळ स्पर्धा म्हणून त्या बिचा-यांना परिक्षण करणे भाग होते.


सगळे अशा भावपूर्ण अवस्थेत असताना सगळ्यात शेवटचा स्पर्धक स्टेजवर आला. आणि त्याने भैरवीतले "दे दुवा किंवा दवा" हे गाणे गायला सुरूवात केली. तिथे उपस्थित असलेली सगळी मने त्या भैरवीच्या सुरांमध्ये आणि त्या अर्थपूर्ण शब्दांमध्ये अक्षरशः भिजली. भावगीतातले "भाव", शब्दप्रधान गायकीतले शब्दांचे महत्व याविषयावर त्यापूर्वी शेकडो लेख वाचले असतील पण त्यादिवशी तिथे उपस्थित असलेल्या सगळ्यांनी त्या शब्दप्रधान गायकीची अनुभूती घेतली. अत्यंत सुरेल गळ्यांच्या साक्षीने.


त्या स्पर्धकाचे शेवटल्या कडव्याचे शेवटले शब्द "अग्नी दे माझ्या शवा, दे दुवा किंवा दवा" हे शब्द ऐकले मात्र आणि अत्यंत भावगर्भ शब्द, भैरवीचे कातर सूर, संध्याकाळची कातर वेळ या तिन्हीचा परिणाम म्हणून त्यादिवशी त्या सभागृहात सगळ्यांची भिजलेली मने त्यादिवशी सगळ्यांच्याच डोळ्यांमधून बाहेर पडत होती. "कोणते नाहीत डोळे आज ओले, आसवांनी आसवांना काय द्यावे ?" अशी एकूण एक श्रोत्यांची अवस्था झालेली होती. टाळ्या वाजवायला सुद्धा सगळे विसरले होते कारण टाळ्या वाजविणा-या हातांपैकी एक हात डोळे पुसण्यात मग्न होता. काही सेकंदांनंतर डोळे तसे वाहते ठेवत सगळ्यांचे हात टाळ्या वाजवण्यात गुंतले. अभूतपूर्व असा टाळ्यांचा कडकडाट झाला. 


स्पर्धेचा निकाल स्पर्धेच्या दुस-या दिवशी (युवक महोत्सवाच्या अखेरच्या दिवशी) अधिकृतरित्या जाहीर होणार होता. पण सर्वांच्या मनात स्पर्धेचा निकाल तर त्याक्षणीच लागलेला होता. पण त्या निकालाचे महत्व त्यात सामील असलेल्या स्पर्धकांसह कुणालाही फ़ारसे नव्हते. एक अत्यंत दुर्मिळ, दुर्लभ भावगीत मैफ़िल आपण ऐकली याचे समाधान तिथल्या सर्व श्रोत्यांना आयुष्यभर पुरणार होते.


- शब्दांवर आणि सुरांवरही तितकाच प्रेम करणारा प्रा. वैभवीराम प्रकाश किन्हीकर


रविवार, १ जून २०२५


नागपूर


#सुरपाखरू 


#३०दिवसात३० 


#जून२०२५ 


No comments:

Post a Comment