"अपमान ही साधकाची परीक्षा आहे, पण मान ही त्याची त्याहून कठीण परीक्षा आहे." - डॉ. सुहास पेठे काका :"चिंतनक्षण"
पुलंच्या "रावसाहेब" मध्ये एक चिंतनात्मक वाक्य आहे. "माणसे अपयशापेक्षा यशानेच अधिक मुर्दाड बनतात." आणि आपल्या सर्वांनाच हे समाजात वावरताना अनुभवायला येते. तसाच विचार अध्यात्मात श्री. पेठे काकांनी मांडला आहे.
अपमान झाला आणि तो सकारण असो वा अकारण असो मनाला वाईट वाटतेच. अपमान सकारण झाला असेल तर ती आपलीच चूक झाली आणि ती चूक आपण पुन्हा करता कामा नये असा विचार जे मन करते ते अत्यंत सकारात्मक मन असते.
आणि आपला अकारण अपमान झाला असेल तर समोरच्या (अपमान करणा-या) व्यक्तीने आपल्याला, त्यावेळी असलेल्या परिस्थितीला समजावून न घेता तो अपमान केला आहे. त्या व्यक्तीला काही कालावधीने खरी परिस्थिती कळेल आणि आपला अकारण अपमान केल्याबद्द्ल त्या व्यक्तीला वाईट वाटेल किंवा कदाचित वाटणारही नाही. तो माझ्या चिंतनाचा आणि कर्माचा विषय नाही. पण सत्य वेगळे आहे त्यामुळे आपल्या अशा अकारण झालेल्या अपमानाचा आपण कधी स्वीकारच केलेला नाही त्यामुळे त्यावर प्रतिक्रिया देण्याची किंवा प्रतिसाद देण्याची आपल्याला गरजच नाही आणि त्यामुळेच ते कर्म मला बाधण्याची शक्यता नाही अशी भूमिका जे मन घेते ते तर अत्यंत सुदृढ आणि प्रगल्भ मन असते.
वरीलपैकी दोन्हीही प्रतिक्रिया मनात सहज उमटायला त्या मनाला साधनेची बैठक लागते. एखादे साधक मनच अशा सकारण किंवा अकारण अपमानाचा अशा प्रकारे स्वीकार करू शकते. आणि आपल्या कर्मांचा विचार करून पुढे मार्गक्रमण करू शकते.
पण साधकाला एकदा मान मिळायला लागला की त्याची खरी परीक्षा सुरू होते. त्यावेळी अपमान पचवणा-या मनापेक्षाही अधिक सुदृढ आणि अधिक प्रगल्भ मन लागते. मान मिळायला लागला की एखाद्या कच्च्या साधकाच्या आयुष्यात अखंड घसरणच सुरू झाल्याचे अनेक अनुभव आपण दैनंदिन जीवनात बघतो. मान मिळायला लागला की अधिकाधिक मानाची अपेक्षा मनात निर्माण होते. मग त्या अपेक्षांची आणि त्या साधकाच्या आसपास वावरणा-या इतरांची सांगड नीट बसत नाही त्यामुळे साधकाला अपेक्षित असलेल्या मान मरातबापेक्षा थोडासुद्धा कमी मान साधकाला एखादेवेळी मिळाला की तो त्याला अपमान वाटतो आणि असे अनेक प्रसंग घडलेत की तो साधक सामान्य जनांच्या आदर्शाचा विषय नव्हे तर हेटाळणीचा विषय होतो. आणि त्यानिमित्त्ताने नास्तिक मतांच्या लोकांना एकूणच अध्यात्मावर आणि त्यानिमित्त्ताने भारतीय संस्कृतीवर कोरडे ओढायला निमित्त्त मिळते.
हार तुरे, सत्कार, स्तुतीपर कवने, मान मरातब, प्रतिष्ठा या सगळ्या गोष्टी आपल्या देहाला मिळालेल्या नसून त्या देहात वास करत असणा-या चैतन्यरूप परमेश्वराला मिळालेल्या आहेत ही वैचारिक बैठक ज्या साधकाची अगदी मनापासून पक्की असते तो त्या मानात वाहून जात नाही. जगदगुरू श्री तुकाराम महाराजांनी म्हटल्याप्रमाणे त्या साधकाची भूमिका "मी तो हमाल, भारवाही" अशी असते. माझ्या देहात असलेले सगळे गुण त्या एका विश्वचैतन्याचे आहेत आणि मी केवळ त्यांचा वाहक आहे, मी केवळ एक माध्यम आहे अशी त्या साधकाची पक्की मनोभूमिका झाली की तो त्या मानसन्मानात वाहून जाण्याची भिती उरत नाही.
म्हणूनच अपमानापेक्षा मान प्राप्त होणे ही साधकाची खरी कठीण परीक्षा असते.
- राम सदगुरू मायबाई महाराज "चिंतनक्षणांवर चिंतन" जेष्ठ पौर्णिमा शके १९४७
मंगळवार, १० जून २०२५
नागपूर
#सुरपाखरू
#३०दिवसात३०
#जून२०२५
No comments:
Post a Comment