Tuesday, June 17, 2025

शताब्दी एक्सप्रेस

 यापूर्वीचे लेख आणि पूर्वपिठीका येथे वाचा.

भारताचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांची जन्मशताब्दी १९८९ मध्ये होती. म्हणून तत्कालीन रेल्वेमंत्री माधवराव शिंदे यांनी १९८८ च्या रेल्वे अर्थसंकल्पात शताब्दी एक्सप्रेस या गाडीची घोषणा केली. आणि लगेच चेन्नईच्या इंटिग्रल कोच फ़ॅक्टरी ने शताब्दी एक्सप्रेससाठी विशेष डबे बांधायला सुरूवात केली. 


भारतातली पहिली शताब्दी एक्सप्रेस सेवा १० जुलै १९८८ रोजी नवी दिल्ली आणि ग्वाल्हेर दरम्यान धावली. ग्वाल्हेर हा माधवराव शिंदेंचा लोकसभा मतदारसंघ. इंदिरा गांधींच्या हत्येनंतर झालेल्या लोकसभा निवडणुकीत कॉंग्रेसला जे अभूतपूर्व यश मिळाले त्यात माधवराव हे त्यावेळेस भाजपचे अर्ध्वयू आणि बडे नेता श्री अटलबिहारी वाजपेयी यांचा ग्वाल्हेरमधून पराभव करून निवडून आले होते. तत्कालीन पंतप्रधान श्री राजीव गांधी यांनी त्यांना रेल्वेमंत्रीपद बहाल केले होते. त्यानंतर या शताब्दी एक्सप्रेसचा मार्ग झाशी जंक्शन (आता वीरांगना राणी लक्ष्मीबाई जंक्शन) आणि त्यानंतर भोपाळ जंक्शनपर्यंत वाढवण्यात आला. आता ही गाडी भोपाळच्याच राणी कमलापती टर्मिनस पर्यंत जाते. ती "भोपाळ शताब्दी एक्सप्रेस" या नावाने ओळखली जाते.






१९६९ मध्ये हावडा राजधानी आणि १९७२ मध्ये मुंबई राजधानी या लक्झरी ब्रॅंडच्या गाड्या सुरू केल्यानंतर १९८८ मध्ये पहिल्यांदाच भारतीय रेल्वेने आपला दुसरा एक लक्झरी ब्रॅंड शताब्दी एक्सप्रेसच्या रूपाने आणला होता. राजधानी गाड्या राज्यांच्या राजधान्यांना देशाच्या राजधानीशी जोडणा-या लक्झरी गाड्या होत्या. त्या आपला प्रवास दिवसा आणि रात्री पार पाडत होत्या. त्यांना सुरूवातीच्या काळात वातानुकूल प्रथम वर्ग (First AC), वातानुकूल शयनयान (AC Sleeper, i.e. Second AC){वातानुकूल त्रिस्तरीय शयनयान फ़ार नंतर १९९२ च्या सुमारास भारतीय रेल्वेत आलेत.} आणि वातानुकूल खुर्ची यान (AC Chair Car) असे डबे लागत असत. शताब्दी एक्सप्रेस ही देशाच्या राजधानीला आसपासच्या राज्यातल्या महत्वाच्या शहरांना जोडणारी सेवा होती. ही गाडी आपला प्रवास सकाळी लवकर सुरू करून संध्याकाळी उशीरा संपवीत असे त्यामुळे या गाडीला शयनयान डब्यांची गरज नव्हती. फ़क्त वातानुकूल खुर्ची यान (AC Chair Car) डबे या गाडीला लागत असत. 


नवी दिल्ली वरून सकाळी ६.०० वाजता निघणारी शताब्दी ग्वाल्हेरला ४, ४.५ तासात पोचत असे. त्याकाळचे सगळ्यात शक्तीशाली एंजिन WAP 1 या गाडीला मिळायचे आणि या मार्गावर या गाडीला अगदी टॉप प्रा्यॉरिटी होती. या गाडीचे डबेही अगदी निळ्या आणि क्रीम अशा रंगसंगतीचे, विशेष डिझाईनचे आणि ताशी १३० किलोमीटर प्रतितास अशा वेगाने धावू शकणारे होते. तेव्हा नवी दिल्ली ते आगरा हा रेल्वेमार्ग मात्र ताशी ११० किलोमीटर वेगासाठीच फ़िट होता त्यामुळे शताब्दी या मार्गावर ताशी ११० किलोमीटर वेगाने मार्गक्रमण करीत असे. 


राजधानीप्रमाणेच शताब्दीही संपूर्ण वातानुकुलीत सेवा होती आणि त्याच्या तिकीटांमध्ये नाश्ता, चहा, जेवण सगळे समाविष्ट असायचे. या गाड्या पूर्णपणे आरक्षित असायच्यात आणि यांची तिकीटेही विमानाच्या तिकीटांसारखी लंबीचवडी आणि एवंगुणविशिष्ट अशी असायचीत.


परतीच्या प्रवासात ग्वाल्हेरवरून ही गाडी दुपारी निघून संध्याकाळी नवी दिल्ली स्टेशनवर संध्याकाळी पोचत असे. या गाडीचा मुख्य उद्देश नवी दिल्लीत राहून आग्रा येथे येणा-या भारतीय आणि परदेशी पर्यटकांसाठी एक लक्झरी सेवा पुरविण्याचा होता. सकाळी नवी दिल्लीवरून निघून आग्रा येथे पोहोचून ताजमहाल वगैरे बघून रात्री मुक्कामाला नवी दिल्लीतल्या हॉटेल्समध्ये येणा-या पर्यटकांना ही गाडी सोयीची होती. अगदी दोन तासांत नवी दिल्ली ते आग्रा हे १८८ किलोमीटरचे अंतर विनाथांबा पार करीत असे. यापूर्वी या मार्गावर याच पर्यटकांच्या सोयीसाठी ताज एक्सप्रेस धावत होती पण याच प्रवासासाठी ताज एक्सप्रेस जवळपास ४ तास घ्यायची. 


या गाडीला लाभलेल्या लोकप्रियतेमुळे नंतर भारतातल्या इतर शहरांमध्येही एका दिवसात जाऊन आपल्या मूळ स्टेशनवर परतणारी ही शताब्दी सेवा सुरू करण्यात आली.


लखनऊ जंक्शन - नवी दिल्ली स्वर्ण शताब्दी एक्सप्रेस: १९८९ मध्ये नवी दिल्ली आणि उत्त्तर प्रदेशची राजधानी यात ही सेवा सुरू करण्यात आली. 


नवी दिल्ली - कालका शताब्दी एक्सप्रेस: १९८९ मध्येच नवी दिल्ली वरून सिमल्याला जाण्यासाठी ही शताब्दी सेवा सुरू करण्यात आली. 


चेन्नई सेंट्रल - म्हैसूर शताब्दी एक्सप्रेस: १९९४ मध्ये चेन्नई आणि बंगलोर यांना जलद जोडणारी शताब्दी एक्सप्रेस म्हणून ही गाडी सुरू झाली.


मुंबई सेंट्रल - अहमदाबाद शताब्दी एक्सप्रेस: १९९४ मध्ये या दोन महत्वाच्या औद्योगिक शहरांना जोडणारी ही जलद सेवा सुरू झाली. आज या दोन शहरांमध्ये भारतीय रेल्वेवरच्या सर्व सेवा असलेल्या अनेक प्रकारच्या रेल्वेगाड्या उपलब्ध आहेत. फ़क्त राजधानी एक्सप्रेस सोडून. साधी पॅसेंजर, एक्सप्रेस, ए. सी. एक्सप्रेस, शताब्दी, तेजस एक्सप्रेस, वंदे भारत एक्सप्रेस, डबल डेकर एक्सप्रेस. अगदी सगळ्या सेवा. आणि आता तर याच दोन शहरांदरम्यान बुलेट ट्रेन सुद्धा येणार आहे. 


नवी दिल्ली - अमृतसर शताब्दी एक्सप्रेस: १९९४ मध्ये सुरू झाली. या गाडीचे वैशिष्ट्य हे की संपूर्ण भारतीय रेल्वेवर IR 20 या बनावटीचे आणि अमेरिकन एक्सप्रेस गाड्यांना असतात तसे कॉर्युगेटेट पत्र्यापासून बनलेले (जास्त ताकदवान) असे कोचेस फ़क्त याच गाडीला मिळत होते. तो एकच रेक भारतीय रेल्वेने प्रायोगिक तत्वावर बनवला आणि या गाडीला दिला. नंतर त्या प्रयोगाचे काय झाले हे कळले नाही. 





नवी दिल्ली - अजमेर शताब्दी एक्सप्रेस : १९९५ मध्ये सुरू झाली.


मुंबई - पुणे शताब्दी एक्सप्रेस. ही गाडी पण १९९५ मध्ये सुरू केली होती. डेक्कन क्वीन ही प्रतिष्ठित गाडी सकाळी पुण्यावरून मुंबईला येते आणि संध्याकाळी परतते ही गाडी त्याच्या बरोबर विरूद्ध धावायची. सकाळी मुंबईवरून पुणे गाठायची आणि संध्याकाळी मुंबईत परतायची. पण हिला प्रवाशांचा फ़ार प्रतिसाद लाभू शकला नाही म्हणून दोन वर्षातच ही गाडी रेल्वेने बंद केली. आता या गाडीच्या ऐवजी त्याच वेळांमध्ये मुंबई - पुणे - मुंबई ही इंटरसिटी एक्सप्रेस सुरू आहे. 


हावडा - रांची शताब्दी एक्सप्रेस: १९९५ ला ही गाडीपण सुरू झाली.


नवी दिल्ली - देहरादून शताब्दी एक्सप्रेस: १९९५ मध्येच ही गाडी सुरू झाली.


नवी दिल्ली - अमृतसर स्वर्ण शताब्दी एक्सप्रेस (दुसरी): १९९८


बेंगलुरु कॅंट - चेन्नई सेंट्रल शताब्दी एक्सप्रेस: २००५


कानपूर सेंट्रल - नवी दिल्ली शताब्दी एक्सप्रेस: २०१०


चेन्नई सेंट्रल - कोइंबतूर जंक्शन शताब्दी एक्सप्रेस: २०११


पुणे - सिकंदराबाद शताब्दी एक्सप्रेस: २०११


काठगोदाम - नवी दिल्ली शताब्दी एक्सप्रेस: २०१२


हावडा - न्यू जलपाईगुडी शताब्दी एक्सप्रेस: २०१२


नवी दिल्ली - चंदीगड शताब्दी एक्सप्रेस: २०१३


हावडा - पुरी शताब्दी एक्सप्रेस: २०१३


गुवाहाटी - नाहरलागुन शताब्दी एक्सप्रेस: २०१७


सगळ्या शताब्दी एक्सप्रेसमध्ये खालील प्रकारचे कोचेस असतात. 


अ) कार्यकारी वातानुकूलित खुर्ची यान (Executive Class - EC)


या वर्गात २x२ (दोन आसनं एका बाजूला आणि दोन आसनं दुस-या बाजूला) अशी आरामदायक बसण्याची व्यवस्था असते. या आसनांना जास्त लेगरूम (पाय ठेवण्यासाठी जागा) असते आणि ती अधिक मागे झुकतात (recline)

या डब्यांमध्ये सहसा उत्तम दर्जाच्या सुविधा असतात, जसे की आरामदायक सीट, हेडरेस्ट, अधिक जागा आणि काही गाड्यांमध्ये वैयक्तिक मनोरंजन प्रणाली (personal entertainment system). या वर्गातील तिकीटाचे भाडे सामान्य खुर्ची यान पेक्षा जास्त असते. शताब्दी एक्सप्रेसमध्ये या दर्जाचे एक किंवा दोनच कोचेस असतात.  




आ) वातानुकूलित खुर्ची यान (AC Chair Car - CC)


या वर्गात ३x२ (तीन आसनं एका बाजूला आणि दोन आसनं दुस-या  बाजूला) अशी बसण्याची व्यवस्था असते.

या वर्गातील आसनं कार्यकारी वर्गाच्या तुलनेत थोडी कमी आरामदायी असली तरी, ती वातानुकूलित असतात आणि त्यात पुरेशी लेगरूम असते. शताब्दी एक्सप्रेसमध्ये सगळ्यात जास्त डबे या श्रेणीचे असतात. येथेही जेवण तिकीट दरात समाविष्ट असते.


या व्यतिरिक्त, काही निवडक शताब्दी एक्सप्रेस गाड्यांमध्ये अनुभूती (Anubhuti) आणि विस्टाडोम (Vistadome) कोच देखील असतात, जे अधिक आरामदायक आणि विशेष वैशिष्ट्ये प्रदान करतात.



इ) अनुभूती (Anubhuti) कोच (काही निवडक गाड्यांमध्ये)


हा एक नवीन बांधणीचा (LHB) लक्झरी  कोच आहे, जो शताब्दी आणि राजधानी एक्सप्रेसमध्ये हळूहळू समाविष्ट केला जातो आहे. हा कोच उच्च दर्जाच्या सुविधा आणि अधिक चांगला प्रवासाचा अनुभव देण्यासाठी विशेष रूपाने डिझाइन केलेला आहे. यात अत्याधुनिक आसने आणि प्रवाशांच्या सोयीसाठी अनेक वैशिष्ट्ये असतात.


ई) विस्टाडोम (Vistadome) कोच (काही निवडक गाड्यांमध्ये)


काही निवडक पर्यटन मार्गांवरील शताब्दी एक्सप्रेसमध्ये विस्टाडोम कोच जोडले जातात.

या डब्यांमध्ये मोठ्या काचेच्या खिडक्या, पारदर्शक छत (transparent roofing) आणि फिरणाऱ्या आसनांची सोय असते. यामुळे प्रवाशांना आजूबाजूच्या निसर्गाचा आणि दृश्यांचा अनुभव घेता येतो.


शताब्दी एक्सप्रेसच्या कोचेसमध्ये खूप बदल घडलेत. आताशा सगळ्याच शताब्दी एक्सप्रेस गाड्यांना नवे LHB कोचेस यायला लागलेत. आमच्या बंगलोर म्हैसूर प्रवासासाठी म्हैसूरवरून परतताना आम्ही रस्तामार्गे न परतता, मुद्दाम म्हैसूर - चेन्नई शताब्दीचे कार्यकारी वातानुकूलित खुर्ची यान (Executive Class - EC) आरक्षण केले होते. २ जुलै २००९ रोजी आमचा हा प्रवास होणार होता. आमच्या सुदैवाने या गाडीला १ जुलै २००९ रोजीच नवा कोरा LHB कोचेसचा रेक मिळाला. आणि आमचा म्हैसूर ते बंगलोर हा प्रवास अगदी नव्या को-या रेकने झाला.




या प्रवासात आम्हाला नाश्ता किंवा जेवण मिळेल अशी आमची अपेक्षा होती. दुपारी म्हैसूर वरून निघणारी ही गाडी जरी फ़क्त दोन अडीच तासांत बंगलोरला पोचणार असली तरी तिकीट मात्र याच गाडीच्या वातानुकूलित खुर्ची यान (AC Chair Car - CC) च्या तुलनेत जवळपास अडीचपट होते. त्यामुळे आम्ही या खाण्यापिण्याचा आस्वाद घ्यायचा म्हणून म्हैसूरवरून निघताना फ़क्त नाश्ता करून निघालेलो होतो. न जाणो आपण पूर्ण जेवण वगैरे करून निघायचो आणि गाडीतल्या उत्कृष्ट पदार्थांचा आपल्याला आस्वादच घेता यायचा नाही म्हणून आम्ही पोटात भूक ठेवूनच निघालेलो होतो.


म्हैसूरला आम्ही गाडीत शिरलो. गाडी पूर्णपणे रिकामी. ही गाडी मुख्यतः बंगलोर ते चेन्नई या प्रवासातच पूर्ण प्रवाशांनिशी धावते हे वर्तमान आम्हाला गाडीतल्या रेल्वे कर्मचा-यांनी सांगितले होते. गाडी छान फ़ुग्यांनी वगैरे सजवलेली होती. म्हैसूरवरून निघून अर्धा तास झाला तरी आम्हाला साधा चहा / कॉफ़ी सुद्धा विचारले नाही म्हणून मी कोच अटेंडंट कडे चौकशी केली तेव्हा जे वर्तमान समजले त्यामुळे आम्ही हादरलोच. या गाडीत म्हैसूर ते बंगलोर प्रवास करणा-या प्रवाशांकरिता रेल्वेकडून काहीही म्हणजे काहीही खायला प्यायला दिले जात नाही. आमचे पडलेले चेहरे पाहून त्या कर्मचा-यांनाच दया आली असावी कारण थोड्या वेळाने त्यांनी आम्हाला कॅडबरी इक्लेअर्स, चहा आणि मारी बिस्कीटे आणून दिलीत. राजधानी एक्सप्रेसमधल्या प्रथम वर्ग वातानुकूल वर्गातल्या आदरातिथ्याचा आम्ही यापूर्वी खूपच छान अनुभव घेतला होता पण या शताब्दी एक्सप्रेसच्या पहिल्या प्रवासाने आम्हाला आदरातिथ्याबाबत मात्र वेगळाच धक्का दिला. 





आज शताब्दी गाड्यांना काही काही मार्गावर गतिमान एक्सप्रेस, तेजस एक्सप्रेस आणि गेल्या काही वर्षांमध्ये वंदे भारतने पर्याय द्यायला सुरूवात केलेली आहे. आता शताब्दीचे नवे कोचेससुद्धा बनविणे रेल्वे कारखान्यांनी बंद केले आहे. शताब्दी एक्सप्रेस ही राजधानी एक्सप्रेसची धाकटी बहीण खरी पण राजधानी एक्सप्रेस अजूनही आपले अस्तित्व टिकवून आहे पण शताब्दी एक्सप्रेस मात्र येत्या २-३ वर्षांमध्ये काळाच्या पडद्याआड जाईल आणि भूतकाळ होईल हे खरे.


- भारतीय रेल्वेच्या जवळपास सगळ्या गाड्यांमधून आणि सगळ्या वर्गांमधून प्रवासाचे भरपूर अनुभव घेतलेला एक प्रवासी पक्षी, प्रा. वैभवीराम प्रकाश किन्हीकर


मंगळवार, १७ जून२०२५


नागपूर


#सुरपाखरू


#३०दिवसात३०


#जून२०२५


No comments:

Post a Comment