Wednesday, June 18, 2025

आग्रह विपरीत फ़ळ देई

२४ मे २०१४. नागपूर इथला जवळपास चार दिवसांचा मुक्काम आटोपून आम्ही आमच्या कामाच्या गावी सांगोल्याला निघालोय. उन्हाळी सुट्या आणि इतरही काही प्रासंगिक कार्ये नागपूर आणि चंद्रपूर येथे होती. ती आवरून आम्ही परत आमच्या निवासस्थानी सांगोल्याला जायला निघतोय.


सांगोला जिल्हा सोलापूर आणि शिरपूर जिल्हा धुळे येथे माझे नोकरीनिमित्त्त मधली ५ वर्षे वास्तव्य होते. नागपूर या शहरावर, इथल्या सगळ्या नातेवाईकांवर भारी प्रेम त्यामुळे सुट्यांमध्ये इथे आलो की इथे सगळ्या नातेवाईकांच्या भेटीगाठी अगदी आवर्जून घेणे आणि त्यानिमित्त्ताने माझ्या नागपूर शहरात काय काय आणि कसे कसे बदल होताहेत ते सुद्धा बघणे, टिपून घेणे अशी आस मला लागायची. आपण नोकरीनिमित्त्त ६०० - ७०० किलोमीटर्स दूर असतो. सगळ्या नातेवाईकांच्या सुखदुःखाच्या सगळ्याच प्रसंगात आपण मुद्दाम येऊन हजर राहू शकत नाही यानिमित्त्ताने सगळ्यांना भेटून होईल आणि चार सुखदुःखाच्या गोष्टी एकमेकांसोबत वाटून घेता येतील हा त्या आवर्जून भेटींमागचा उद्देश. तसाच यावेळेसच्या नागपूर भेटीतही आम्ही दिवसभर इकडून तिकडे फ़िरत भेटीगाठी घेत होतो.


"राखावी बहुतांची अंतरे" ह्या श्रीसमर्थउक्तीवर माझा फ़ारच विश्वास. कुणाचे मन मोडणे माझ्या सहसा जिवावर येते. या भेटीतही प्रत्येक आप्त सुहृदांकडे काही ना काही खाण्यापिण्याचा आग्रह होतच होता. कुणाकडे उन्हाळ्यासाठी करून ठेवलेला चिवडा, कुणाकडे दुपारी मधल्या वेळेत खायला केलेली मटकीची उसळ, कुणाकडे नुसताच चहा तर अशाच कुणाकडे आंब्याचे पन्हे अशा विविध पदार्थांनी पोट तुडुंब भरले. आणि ज्या आप्तांकडे आम्ही मुक्कामाला होतो त्यांच्याकडे यजमानांसोबत रात्रीचे जेवण म्हणून थोडे फ़ोडणीचे वरण भात हे वरून झालेच.


नागपूर ते सांगोला आमच्या कारने प्रवासाचे आमचे साधारण वेळापत्रक असे असायचे. पहाटे ३ - ३:३० ला उठून भरभर आवरायचे. आणि पहाटे ४, ४:३० पर्यंत प्रस्थान ठेवायचे.  मला रात्री अंधारात गाडी चालवायला अजिबात आवडत नाही. पहाटेचा अंधार आणि रात्रीचा अंधार यात फ़ार फ़रक असतो. पहाटेच्या अंधारात क्षणाक्षणाला प्रकाश वाढत असतो आणि आपल्याला अधिक आश्वासक वाटत असते. पण रात्रीला क्षणाक्षणाला गडद होत जाणा-या नकारात्मकतेची किनार असते. किमान एक ड्रायव्हर म्हणून तरी माझी तशी भावना होते. रात्री आपल्या सखीचा हात धरून चांदण्यात निवांत फ़िरणे, त्या फ़िरण्यात एखादी कविता सुचणे, ती तिला ऐकवून तिची दाद घेणे हे अत्यंत रोमॅंटिक आहे. रात्री जवळपासच्याच एखाद्या हॉटेलमध्ये सहकुटुंब जेवायला निघालोय, गाडीवर मालिनीताई राजूरकरांचा मालकंस आणि त्यानंतर बिलासखानी तोडी ऐकतोय, एक शब्दही न बोलता आपले आणि सखीचे मन एकमेकांमध्ये इतके जुळलेय हे सुद्धा अत्यंत रोमॅंटिक आहे हे ही मला मान्य आहे कारण या प्रसंगांचा अनुभव मी अनेकदा घेतलेला आहे, हे प्रसंग जीवनसंगिनीसह खूपवेळा जगलेलो आहे. पण इतक्या लांबचा प्रवास रात्री करणे हे मला खरोखर आवडत नाही. त्यामुळे पहाटे लवकर प्रथान ठेवणे हे मी श्रेयस्कर समजतो.


४:३० च्या आसपास नागपूरवरून निघालोत की मध्ये फ़क्त शरीराच्या हाकेला ओ देण्यासाठी पाचेक मिनिटे, बडने-याला  संत्री खरेदी करण्यासाठी पाचेक मिनीटे आणि आमच्या ठरलेल्या पेट्रोल पंपावर पेट्रोल भरण्यासाठी पाचेक मिनीटे असे छोटे छोटे थांबे घेऊन अमरावती - बडनेरा - कारंजा (लाड) - शेलू बाजार - मालेगाव (जहांगीर) - मेहेकर - सुलतानपूर - सिंदखेडराजा या मार्गाने बरोबर ७ तासांत ४०० किलोमीटर्सचा प्रवास करीत साधारण ११:३० ला देऊळगाव राजा इथल्या "चैत्रबन" ला जेवणासाठी थांबणे. "चैत्रबन" ला मनसोक्त जेवण आणि थोडे हातपाय ताणून दिल्यानंतर तासाभराने तिथून निघून जालना - अंबड - वडीगोद्री - गेवराई - बीड - मांजरसुंबा - वाशी - येरमाळा - बार्शी - कुर्डुवाडी - पंढरपूर मार्गे उरलेले ३५० किलोमीटर्स प्रवास पूर्ण करायला आम्हाला जवळपास आणखी ७ - ७:३० तास लागीत असत आणि संध्याकाळी ६:३० ते ७ च्या सुमाराला आम्ही आमच्या मुक्कामी, सांगोल्याला पोचत असू. उन्हाळ्यात सूर्य जरा लवकर उगवत आणि उशीरा मावळत असल्याने हा सगळा प्रवास बहुतेक उजेडातच पार पडत असे.


तसे प्रवासाचे लेखी नियोजन आदल्या दिवशीच आमच्या कारच्या लॉगबुकमध्ये करून आम्ही प्रवासाला निघत असू. हे नियोजन तयार असले की आपल्याला किती उशीर झालाय किंवा आपण वेळेच्या किती आधी आहोत याचा अंदाज आपल्याला येत असतो आणि नियोजनाच्या मागे पुढे अर्धा तास, पाऊण तास आपण आपले गंतव्य गाठतोच हा माझा तोपर्यंतच्या प्रवासांचा उत्त्तम अनुभव होता. पण आज काहीतरी वेगळेच व्हायचे होते.


वर वर्णन केल्याप्रमाणे आदल्या दिवशी दुपारी आणि संध्याकाळी उशीरपर्यंत इतके वेगवेगळे खाणे झालेले होते. त्यात भर उन्हाळ्यातल्या दुपारी नागपुरात फ़िरणे. त्यात भर म्हणजे रात्री चांगल्या ११, ११:३० वाजेपर्यंत नातेवाईकांशी गप्पांची मैफ़ल रंगवून पहाटे लवकर उठून आवरून निघणे यात आपल्या शरीरावर आपण अन्याय करतोय हे माझ्या लक्षातच आले नाही. आपण आपल्याच शरीरावर असे अनेकदा अत्याचार करतो पण शरीर एका मर्यादेपर्यंत सहन करते आणि एखादेवेळी असा काही फ़टका देते तो फ़टका आज बसायचा होता. सकाळी निघालो खरा पण पोट थोडे गडबड आहे याची जाणीव प्रवासादरम्यान झाली. त्यामुळेच "चैत्रबन" ला नेहेमीप्रमाणे पूर्ण जेवण न करता मी फ़क्त थोडेसे ताक प्यायलो आणि आज दिवसभर लंघन करून संध्याकाळीच जेवण करू असा बेत सुपत्नी आणि सुकन्येला बोलून दाखवला. मी लोकांची मने राखायला स्वतःवर कसा अन्याय करतो आहे यावर या दोघींचे एक छोटेसे लेक्चर पण ऐकले. गोष्ट खरी होती. निमूटपणे लेक्चर ऐकून घेण्याशिवाय माझ्याकडे पर्याय नव्हता.


देऊळगाव राजावरून निघालो खरा आणि २५ किलोमीटर्स अंतर कापून जालना शहरात पोचलो तोच पोटात काहीतरी विचित्र होतेय याची जाणीव झाली. सुरूवातीला वाटले की जालना शहरातल्या बायपासवरील खड्ड्यांमुळे गाडी उसळून पोट डचमळत असेल पण नंतर लक्षात आले की हा काहीतरी वेगळाच प्रकार आहे. जालना औद्योगिक वसाहतीतलया दिसलेल्या पहिल्याच ब-यापैकी हॉटेलच्या बाहेर गाडी थांबवली आणि आत जाऊन अति शीघ्र गतीने रिसेप्शनवर रूमची किल्ली मागितली. गाडी लॉक करणे, गाडीतले सामानसुमान रूमवर आणणे वगैरे जबाबदा-या सहधर्मचारिणी आणि सुकन्येवर सोपवून धावतच रूम गाठली आणि पोट रिकामे करायला धावलो. त्यानंतर काय विचारता राजेहो !  दोन तीनदा उलटी आणि शौचाला जावे लागले आणि लगेच प्रचंड ग्लानीतच मी झोपी गेलो. आजूबाजूचा पूर्ण विसर पडला. अर्धवट बेशुद्धावस्थाच.


संध्याकाळी मी थोडा शुद्धीवर आलो. सहधर्मचारिणी आणि माझी लेक माझ्या उशा पायथ्याशीच बसलेले होते. सचिंत पण खंबीर. तेव्हढ्या वेळात माझ्या सहधर्मचारिणीने सांगोल्याला माझा मित्र आणि आमच्या महाविद्यालयाचा प्राचार्य असलेल्या सतीश ला फ़ोन करून सगळी परिस्थिती निवेदन केली होती. उद्या कदाचित मी गाडी चालवू शकेल न शकेल तर उद्या आम्हाला जालन्यावरून सांगोल्यापर्यंत आमच्याच गाडीत ड्राइव्ह करीत आणण्यासाठी तिथून रात्री एक ड्रायव्हर बसने पाठविण्याचे त्याने ठरविले.


शुद्धीवर आलो. स्वतःला आणि कुटुंबालाही सावरले. आज जालन्यात मुक्काम करतोच आहे तर जालन्यात एका अत्यंत अवतारी सत्पुरूषांच्या दर्शनाला संध्याकाळी जायला आम्ही निघालो. तीव्र ॲसिडीटी आणि भयंकर खवळलेल्या पित्त्तामुळे पोट अक्षरशः रिकामे झालेले होते. त्या सत्पुरूषांच्या आश्रमात त्यांचे दर्शन आणि तिथेच प्रसाद घेतला. प्रसाद घेतल्यानंतर शरीराला एकदम तरतरी आली आणि सतीशला फ़ोन करून ड्रायव्हर पाठवू नको, मी ठीक आहे, उद्या मीच गाडी चालवीत उरलेले ३५० किलोमीटर्स अंतर पूर्ण करतोय म्हणून सांगितले. नेहेमीप्रमाणे माझ्या खाण्याच्या शौकावर आणि आग्रह न मोडण्याच्या स्वभावावर सुपत्नीप्रमाणे त्याच्याही शिव्या खाल्ल्यात. माझ्यासाठी तो प्राचार्य, माझा बॉस वगैरे अगदी कमी, मित्र कमी आणि घरातला एक सदस्य जास्त होता. आनंदाने आणि त्याने केलेल्या विनोदांवर मनमुराद हसत हसत त्याच्या कानपिचक्या ऐकल्या आणि रात्री निवांत झोपलो.


दुस-या दिवशी मात्र जालन्यावरून निवांत निघालो. आज फ़क्त सात आठ तासांचाच प्रवास करायचा होता. दुपारी बार्शी - कुर्डुवाडी रस्त्यावरच्या एका अतिशय सुंदर धाब्यावर जेवण करून सांगोल्याला पोचलो. 


सहज विचार केला की ही वेळ जालना शहरात आणि हॉटेल दृष्टीपथात असताना आली म्हणून बरय. प्रवासात, निर्जन जागी मी असा ग्लानीत पडून राहिलो असतो तर आमच्यावर किती अनवस्था प्रसंग ओढवला असता ? या कल्पनेनेच अंगावर शहारा आला. माझे नक्की काय चुकले ? याचे आत्मपरिक्षण मी केले.


त्यानंतर मात्र मी माझ्या जीवनात बदललो. लोकांच्या आग्रहापेक्षा माझे शरीर काय म्हणतेय ? याकडे जास्त लक्ष देऊन आग्रह ठामपणे टाळायला लागलो. "राखावी बहुतांची अंतरे" हे करतानाच स्वतःचे अंतर काय म्हणतेय हे ओळखून नम्रपणे नकार द्यायला लागलो. या आत्यंतिक घाबरवणा-या प्रसंगाने मला हा जन्मभराचा धडा दिला.



- खादाडखाऊ असला तरी वयोमानानुसार मोजकेच आणि अगदी वेळेवर खाणारा, खाण्याच्या वेळा अगदी काटेकोर पाळणारा, निग्रही माणूस प्रा. वैभवीराम प्रकाश किन्हीकर


बुधवार, १८ जून २०२५


नागपूर


#सुरपाखरू


#३०दिवसात३०


#जून२०२५


No comments:

Post a Comment