परवा आमच्या घराजवळच्या मदर डेअरीतला मुलगा आपल्या कुटुंबियांसोबत गोव्याला जाऊन आला. तो मुलगा त्या आऊटलेटमध्ये असला की हिशेब वगैरे भराभर होतो, नवीन आलेले प्रॉडक्टस वगैरे कळतात, दोन चार इकडल्या तिकडल्या गप्पा होतात. तो मधला आठवडाभर नव्हता तेव्हा तिथे जे गृहस्थ होते त्यांना ते या आऊटलेटमध्ये नवखे असल्याने हिशेबातच इतका वेळ लागायचा की अवांतर गप्पांसाठी आमच्याकडे वेळच नसायचा कारण त्या वेळात आऊटलेट बाहेर गि-हाईकांची रांग लागायची. आणि गप्पा सुरू ठेऊन त्यांना ताटकळत ठेवणे हे माझ्या स्वभावाला पटत नाही.
परवा तो मुलगा परतल्यानंतर त्याला त्याचा प्रवासमार्ग विचारला. हो, ही एक माझी सवय आहे. कुणीही कुठल्याही प्रवासाला जाणार असेल किंवा जाऊन परत आला असेल तर त्याला मी त्याचा प्रवासमार्ग, प्रवासाची साधने वगैरे सविस्तर विचारतो. माझ्या आप्त सुहृदांना हा माझा "प्रवासी पक्षी" पणा माहिती आहे म्हणून बरे, नाहीतर एखाद्या नवख्या माणसाला हा उगाचचा भोचकपणा वाटणे अगदी शक्य आहे. पण या माझ्या मोकळ्या स्वभावामुळेच अनेक विविध क्षेत्रातली आणि विविधरंगी माणसे माझ्याशी जोडली जातात हे सुद्धा तितकेच खरे. माणसाला जेव्हा पुढच्या माणसाचा शुद्ध हेतू कळतो तेव्हा त्या दोघांमध्ये मैत्र प्रस्थापित होते. आजवरच्या माझ्या आयुष्यात माझ्या सरळ स्वभावामुळे असे अनेक समस्वभावी मैत्र मी जोडले.
अर्थात या सरळ स्वभावाचा फ़ायदा घेणारी, या सरळ स्वभावाला हिणवणारी मंडळी सुद्धा भेटलीत बरं का, नाही असे नाही. माझ्या सरळ स्वभावाला "बावळटपणा" समजून मला दूर करणारी मंडळी त्यात होती तशीच त्या स्वभावाचा आपल्याला काही फ़ायदा करून घेता येतो का ? या माणसाला तेव्हढ्यापुरते वापरून फ़ेकून देता येते का ? याचा अदमास घेणारी आणि तशी वागणारीही मंडळी भेटलीतच. अर्थात जोडलेल्या मैत्रांपेक्षा अशा व्यक्तींची संख्या अगदीच नगण्य होती आणि अशा प्रत्येक व्यक्तीने मला जीवनात एक नवीन आणि अनमोल धडा शिकवला, अगदी मोफ़त. आणि मला या सगळ्यांमध्येही सगळ्यात हर्ष होणारी गोष्ट हीच होती की या सगळ्यांना माझ्या स्वभावातला साधेपणा जाणवला आणि त्यांच्या मनापासून पटला म्हणून तर त्यांनी त्याचा फ़ायदा करून घेतला किंवा फ़ायदा करून घेण्याचा प्रयत्न केला. आपले व्यक्तीमत्व इतके पारदर्शी आहे की ते सर्व प्रकारच्या लोकांनी ओळखलेले आहे या जा्णीवेसारखे दुसरे सुख नाही.
आपणही थोडा खोलवर विचार केला तर आपल्या लक्षात येईल की आपल्यासारखीच मनुष्य सहवासाला, मैत्राला आसुसलेली अनेक माणसे आपल्या आसपास अहेत. दोन पैशांचे घेणे देणे नसतानाही त्यांचे आणि आपले निखळ मैत्र जुळू शकते. फ़क्त समोरची व्यक्ती ही आपल्यासारखीच एक व्यक्ती आहे, तिचेही मन आपल्यासारखेच आहे असा विश्वास आपल्या मनात ठेवूनच त्या व्यक्तींशी व्यवहार करत गेला पाहिजे. यात मी वर वर्णन केल्याप्रमाणे काही काही ठिकाणी आपल्या मनाशी न जुळणा-या, आपल्या अगदी विरूद्ध मनोवृत्त्ती असणा-या व्यक्ती भेटतीलही. पण अशा व्यक्ती कमीच आहेत आणि त्या व्यक्ती सुद्धा आपल्याला जीवनात एखादा धडाच शिकवून जातील. माणसे ओळखण्याचा, पारखण्याचा. म्हणजे त्या सुद्धा जाताना आपल्यावर उपकारच करून जातील.
व.पु.काळे म्हणतात "नाटकाच्या पंधराव्या रांगेत एकमेकांशेजारी बसलेल्या दोन अनोळखी माणसांनी एकमेकांना इतके का लाजायचे ? इतके का परक्यासारखे करायचे ?" खरेच आहे ते. एकाच नाटकाला येताय म्हणजे सांस्कृतिक पातळी, सांस्कृतिक आवडीनिवडी ब-याचशा सारख्या असल्या पाहिजेत, एकाच रांगेचे तिकीट काढताय म्हणजे आर्थिक पार्श्वभूमी सुद्धा जवळपास सारखी असली पाहिजे. मग उगाच शिष्टपणा, इतरांविषयी अनेक प्रकारचे ग्रह का करून घ्यायचे ? "मीच तेव्हढा शहाणा, मीच तेव्हढा तत्वांवर चालणारा, मीच तेव्हढा उच्च अभिरूचीचा" असे ग्रह मनात घेऊन आपण जगात वावरलोत की आपण जगात खरोखर एकटे पडू. याउलट आपले सामर्थ्य, आपले गुण अवगुण ओळखून इतर जगातली माणसेही माझ्याप्रमाणेच आहेत अशा भावनेने आपण जगात वावरलोत तर आपल्यासारखीच अनेक समानधर्मी माणसे आपल्याला भेटलीत आणि आपले जीवन आनंदमय होईल.
शेवटी तुमची माझी या जगातली धडपड आपले जीवन आनंदमय होण्यासाठीच आहे, नाही का ? "शेवटला दिवस गोड व्हावा" यासोबतच जगलेला प्रत्येक दिवस आनंदमय व्हावा यासाठीही आपली सगळी धडपड आहे. एकदा स्वतःच्या मनाला शांतपणे विचारून तर बघा की आपल्या जीवनाचे अंतिम उद्दिष्ट काय आहे ? बहुतेक सगळ्यांचे "रोज आनंदाने जगणे" हेच उत्त्तर येईल याचा मला आत्मविश्वास आहे. आपल्या उपनिषदांमध्येही "सर्वे भद्राणि पश्यन्तु" अशीच प्रार्थना आहे ना ?
- पटकन कुणाशीही मैत्र जुळणारा, मनमोकळा, प्रा. वैभवीराम प्रकाश किन्हीकर
शुक्रवार, २० जून २०२५
नागपूर
#सुरपाखरू
#३०दिवसात३०
#जून२०२५
No comments:
Post a Comment