यापूर्वीचा अनुभव इथे वाचा
५ सप्टेंबर १९८९ रोजी, गणेशचतुर्थीच्या दिवशी नागपूरवरून कराडला निघालेला मी. शिक्षणासाठी घर सोडायचे, लांबवर हॉस्टेलला रहायचे. नवे गाव, नवे शिक्षण, खुणावणारी नवी क्षितीजे ही सगळी स्वप्ने घेऊन महाराष्ट्र एक्सप्रेस कराडकडे धावत (?) होती. अर्थात माझ्यासोबत कराडपर्यंत आणि तिथे माझे बस्तान बसेपर्यंत सोबत म्हणून माझ्याहून १० वर्षे मोठा माझा एक मावसभाऊ सोबत येणार होता आणि तिथे एखादा आठवडा थांबून मी तिथे स्थिरावलो की नागपूरला परतणार होता.
२५ तासांच्या प्रवासानंतर दुस-या दिवशी दुपारी १२ च्या सुमाराला आम्ही कराड स्टेशनवर उतरलोत. प्रथम वर्षात शिकणारी नागपूरची इतर विद्यार्थीमंडळी या आधीच कराडला पोहोचलेली होती. आम्ही घरी गणरायाचे स्वागत करून जायचे म्हणून दोन तीन दिवस उशीरा निघालेले होतो. कराड स्टेशन तेव्हा गावापासून, महाविद्यालयापासून फ़ार दूर वाटत असे. स्टेशन आणि गावात मध्ये मध्ये फ़क्त तुरळक वस्ती होती. गावात जायला वाघेरी - कराड, स्टेशन - कराड अशा मोजक्याच एस. टी. फ़े-या होत्या. रिक्षावाले त्याकाळी चक्क ५० - ५० रूपये भाडी मागीत असत. त्याकाळी नागपूर ते कराड या १०९५ किलोमीटर अंतराचे रेल्वेभाडे फ़क्त ९० रूपये होते. त्यात स्लीपर बर्थस साठी प्रति रात्र प्रति बर्थ २० रूपये भरावे लागत. त्यामुळे १०९५ किलोमीटर साठी ११० रूपये आणि कराड स्टेशन ते महाविद्यालय परिसर या ५ - ६ किलोमीटर अंतरासाठी ५० रूपये हा आमच्यासाठी अन्याय होता. शिवाय त्याकाळी आम्हा विद्यार्थ्यांचे महिन्याभराचे बजेट हे ४०० - ४५० त्यातून इतके पैसे एका लहानशा प्रवासासाठी खर्च करणे म्हणजे जवळपास अशक्यच होते.
कराडच्या एकुलत्या एका फ़लाटावर आम्ही दोघेही उतरलोत. सोबत माझ्या कपड्यांच्या दोन बॅग्ज, एक गादी आणि माझ्या मावसभावाची एक बॅग सोबत जेवणासाठीची पिशवी, वॉटरबॅग असा भरपूर जामानिमा होता. कराड स्टेशनला आम्ही वैदर्भिय विद्यार्थी ज्या दिवशी कराडला पोहोचत असू आणि आणि ज्यादिवशी कराडवरून सुट्यांसाठी आपापल्या गावी जाण्यासाठी निघत असू त्यादिवशीच थोडी चहलपहल असे. इतर वेळेला पुलंच्या "काही अप्स काही डाउन्स" या लेखात वर्णन केलेल्या रेल्वे स्थानकांप्रमाणे कराड स्थानक एकदम सुनसान असे. त्यादिवशी कराडला उतरणारी मंडळी फ़क्त दोन्ही हातांच्या बोटांइतकी (आमचा समावेश करून) होती.
महाराष्ट्र एक्सप्रेस पुढल्या प्रवासाला रवाना झाली आणि आम्ही आपले सगळे "बोरीयाबिस्तर" घेऊन कराड स्टेशनच्या बाहेर जायला निघालोत. बाहेरून वाघेरी - कराड बस घेऊन आम्ही महाविद्यालय परिसराकडे जाणार होतो. इतक्यात एक गृहस्थ आमच्याकडे चालत येताना दिसले.
"अरे, तुम्ही कॉलेज कॅम्पस ला जाणार आहात का ?" त्यांनी विचारले.
आम्ही साशंक. ह्यांचा नक्की हेतू काय ? हेच आम्हाला कळेना. यांचा रिक्षा आहे आणि त्यासाठी हे आम्हाला विचारत आहेत ? की काय अशी शंका आम्हा दोघांच्याही मनात येऊन गेली. पण अचानक प्रश्न विचारलेला होता आणि अनायासे उत्त्तर गेले, "हो"
"चला, सर तुम्हाला बोलावताहेत."
"कोण सर ?" प्रचंड गोंधळलेला मी. कराडला मी पहिल्यांदा, दुस-यांदाच पाऊल ठेवत होतो. इथल्या कुठल्याही शिक्षकाला मी ओळखत नव्हतो किंवा इथले कुठलेही शिक्षक मला ओळखतील अशी सुतराम सुद्धा शक्यता नव्हती.
"अरे, मानकर सर. प्राचार्य आहेत आपल्या कॉलेजचे. ते आज याच गाडीने अमरावतीवरून आलेत. त्यांना घ्यायला आपल्या कॉलेजची गाडी आलेली आहे. त्यांनी तुम्हाला इतक्या सगळ्या सामानासुमानासकट फ़लाटावर उतरताना बघितले आणि इथून महाविद्यालय परिसरापर्यंत त्या मुलांना जायचे असल्यास आपण आपल्या गाडीतून सोडूयात म्हणून मला इथे पाठविले आहे."
एकदम उलगडा झाला. अर्थात त्यादिवशीचा आमचा मोठ्ठा प्रश्न असा अचानक निकाली निघालेला होता. आम्ही कॉलेजने सरांना दिलेल्या सरांच्या गाडीत बसलोत आणि त्यादिवशी महाविद्यालय परिसरात इतक्या सामानसुमानासह आरामात पोहोचलो. गाडीत बसल्यानंतर सरांना अभिवादन केले. ती माझी आणि माझ्या अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या प्राचार्यांची पहिली ओळख.
त्याकाळी सगळ्या शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालयांच्या प्राचार्यांना शासनातर्फ़े प्रवासासाठी ॲम्बॅसॅडर गाडी देण्यात यायची. फ़क्त कराड्च्या प्राचार्यांना एक मोठीच्या मोठी मेटॅडोर गाडी देण्यात आली होती.
मानकर सर शिक्षक आणि विद्यार्थी यांत पुरेसे अंतर राखून होते पण जिथे जिथे आपल्या कक्षेबाहेर जाऊन माणुसकी दाखवायची वेळ आली तिथे तिथे त्यांनी ती कुठलाही अभिनिवेश न बाळगता, अत्यंत मनापासून दाखवली याचे पहिले उदाहरण त्यादिवशी मला दिसले. मानकर सर प्रशासक म्हणून किती करडे आहेत पण माणूस म्हणून किती थोर आहेत याचे आणखीही अनुभव मला पुढल्या चार वर्षांच्या शिक्षणप्रवासात येणार होते.
- अशा अनेक व्यक्तीमत्वांचा ज्याच्यावर अत्यंत सकारात्मक प्रभाव आहे आणि "जीवन त्यांना कळले हो" अशा भावनेने त्यांना आदर्श मानून आपले जीवन त्या आदर्शांवर चालणारा, प्रा. वैभवीराम प्रकाश किन्हीकर
शनिवार, १४ जून २०२५
शेगाव
#सुरपाखरू
#३०दिवसात३०
#जून२०२५
अगदी खरं आहे रामराया. मानकर सरांसारखी व्यक्तिमत्वे विरळ होती
ReplyDelete