Monday, June 2, 2025

निरोप: एक देणे, एक घेणे.

मध्यंतरी एक मराठी सिनेमा बघण्यात आला. खूप गाजलेला. सहा बहिणींच्या एकमेकींशी असलेल्या नात्यांवर आधारलेला. त्यात एक दृष्य होते. मोठ्या बहिणीच्या घरी रहायला आलेली तिची धाकटी बहीण तिथला तिचा मुक्काम आटोपल्यानंतर परत आपल्या घरी जायला निघते. मोठी बहीण स्वतःच्या घराच्या दारापर्यंतच जाऊन "सांभाळून जा गं" असे बोलून तिला निरोप देते. मला हे फ़ार तोंडदेखले वाटले. अरे, किमान बिल्डींगमधली लिफ़्ट उतरून बाहेर तिच्या टॅक्सीपर्यंत तरी तिला सोडता आले असते. मनात काही काळजी नाही आणि नुसते तोंडदेखले "सांभाळून जा गं" हे मला दरवेळी खटकते.


आमच्या बालपणी आमच्या घरी कुणी पाहुणी मंडळी मुक्कामाला आलीत तर त्यांना बसस्टॅण्ड नाहीतर रेल्वे स्टेशनवर जाऊन त्यांची बस, रेल्वे सुटेपर्यंत तिथे उभे राहून निरोप देत असू. बस, रेल्वे हलण्याच्या अत्यंत कातर क्षणांमध्ये हात हातात घेऊन "पत्र टाक रे, फ़ोन कर गं" वगैरे निरोपांची देवाणघेवाण होत असे. तो निरोप त्या पाहुण्याच्या आपल्या घरी पुढल्या मुक्कामाला येण्याची नांदी असे. त्याला आपल्याकडे पुन्हा यावेसे वाटले पाहिजे, तशी ओढ लागली पाहिजे आणि अशा भेटीगाठी वारंवार होत राहिल्या पाहिजेत ही त्यामागची अत्यंत प्रामाणिक आणि भाबडी भावना असे.


अर्थात आम्हालाही त्या त्या पाहुण्यांच्या गावी गेल्यानंतर तसेच निरोप मिळत असत. मला आठवतय बालपणी उन्हाळ्याच्या सुट्याच्या सुट्या आजोळी, चंद्रपूरला घालवल्यानंतर शाळा सुरू होण्याच्या सुमाराला आम्ही जेव्हा नागपूरला परतत असू तेव्हा आमचे ऐंशीपार वृद्ध आजोबा हळूहळू चालत आम्हाला निरोप द्यायला आजोळच्या गल्लीच्या तोंडापर्यंत येत असत. त्यांच्यापेक्षाही जास्त थकलेली, मान हलत असलेली आमची आजी पण गल्लीच्या तोंडाशी आलेल्या ऑटोरिक्षापर्यंत आम्हाला निरोप द्यायला यायची. ऑटोत बसल्यानंतर मागे वळून वळून आम्ही, तिचा आमच्या दिशेने हलणारा हात बघत असू. बसस्टॅण्डपर्यंत सोडायला समवयस्क मामेभावंडे येत असत. बसमध्ये बसल्यानंतर बस सुटेपर्यंत त्यांचे आणि आमचे सुकलेले चेहरे आमचे ऋणानुबंध अधिक घट्ट करीत असत. त्यांचा आणि आमचा न बोलता होणारा हा मूक संवाद अंतरीचे नाते अधिक दृढ करीत जात असे. बस बसस्टॅण्डवरून निघून पाण्याच्या टाकीजवळून नागपूरकडे भरधाव निघत असे. ती तशी निघाल्यावर चंद्रपूर शहर दिसेनासे होईपर्यंत आम्ही त्या दिशेकडे बघत असू. आणि संपूर्ण प्रवासात चंद्रपूरला घालवलेल्या मजेमजेच्या दिवसांच्या गप्पा अखंड चालत असत किंवा एकटेच असलोत तर त्या दिवसांची मनात उजळणी होत असे. पुन्हा कधी आपल्याला चंद्रपूरला यायला मिळेल ? याचे हिशेब मनातल्या मनात होत असत. हा सगळ्या त्या भावपूर्ण निरोपांचा परिणाम. आपली कुणीतरी वाट बघणारे या गावात आहे ही भावनाच त्या गावाशी आपले नाते अधिक दृढ करणारी ठरते, हो ना ?


मी शिक्षणासाठी पहिल्यांदा घरापासून दूर कराडला जायला निघालो होतो तेव्हा मला महाराष्ट्र एक्सप्रेसवर निरोप द्यायला माझे आई दादा आणि माझी भावंडं आलेली होती. पोटचा गोळा इतक्या दूर जायला निघतोय म्हणून माझ्या आईचा बांध तर दोन तीन दिवसांपासून फ़ुटला होता पण माझ्या दादांना तसे करून चालणार नव्हते. मुलाच्या शिक्षणासाठीची सगळी तरतूद करण्यासाठी त्यांची धावपळ सुरू होती. पण महाराष्ट्र एक्सप्रेस हलली आणि नागपूर स्टेशनच्या हद्दीबाहेर एक मोठे वळण घेऊन अजनीकडे निघेपर्यंत मी गाडीच्या दारात आणि माझे दादा प्लॅटफ़ॉर्मवर उभे राहून एकमेकांना हात दाखवत होतो. दादांच्या त्या हलणा-या हाताने मला त्यांच्या हृदयातली तगमग, पैशांची ओढाताण सगळी समजत होती. आपण त्यांचे पांग नक्की फ़ेडले पाहिजेत, शिक्षणासाठी चाललोय - मौजमजेसाठी नाही तेव्हा उत्तम शिक्षणच घ्यायचे, आपला बेस्ट परफ़ॉर्मन्स द्यायचा हा मनातला निश्चय त्या निरोपाच्या देवाणघेवाणीत माझ्या मनात दृढ होत होता. त्यामुळे त्यानंतर विद्यार्थीदशेत येणा-या अनेक प्रलोभनांना मी बळी पडलो नाही. नेमस्त जीवन जगत शिक्षण उत्तम रितीने पूर्ण करणे याला प्रथम प्राधान्य देत गेलो.


कालांतराने नोकरी लागली. पुन्हा नागपूरपासून दूर मुंबईला. आता दादा तर नव्हते. पण धाकट्या भावाने त्यांची जागा घेतली होती. गाडी बदलली. महाराष्ट्र एक्सप्रेस ऐवजी विदर्भ एक्सप्रेसने प्रवास व्हायला लागला. धाकटा भाऊ, त्याच्या कामधंद्यात कितीही बिझी असला तरी निरोप द्यायला स्टेशनवर यायचाच. गाडी सुटल्यानंतर त्याचा आणि माझा हात तसाच एकमेकांना दिसेनासे होईपर्यंत हलत रहायचा. वडील "पोहोचल्यावर पत्र टाक रे" म्हणायचेत. हा "फ़ोन कर रे" म्हणतो एव्हढाच काय तो फ़रक पण या निरोपाच्या देवाणघेवाणीत या हृदयीचे प्रेम त्या हृदयी सहज संक्रमित होत जायचे.


काळाच्या ओघात वडीलांना अखेरचा निरोप द्यावा लागला. त्याक्षणी त्यांचा हात हलत नव्हता म्हणून फ़क्त आमचे हृदय हललेले होते. मग लक्षात आले की अरे शेवटी आपली सगळ्यांचाच प्रवास तिथपर्यंत असणार, नाही का ? आपल्याला निरोप द्यायला मंडळी जमावीत. आपल्या आप्तेष्टांची, दोस्तमित्रांची, सहका-यांची सगळ्यांची मने, हृदये हललेली असावीत आपण मात्र आपल्या जीवनभर कधीही न जमलेले, शिष्टासारखे वागून, कुणाचीही दखल न घेता सगळ्यांच्या हृदयात घर करून आपल्या नियत प्रवासाला निघून जावे. कारण त्या जगन्नियंत्याचा आपल्याला जो निरोप आलेला असतो त्याला होकार देणे आपल्याला भाग असते.  


- गेल्या काही वर्षात अनेक जवळच्या व्यक्तींना असा कायमचा निरोप द्यावा लागण्याने व्यथित होऊन "त्या"च्या अखेरच्या निरोपाची आतुरतेने वाट बघणारा, प्रा. वैभवीराम प्रकाश किन्हीकर


सोमवार, २ जून २०२५


नागपूर


#सुरपाखरू


#३०दिवसात३०


#जून२०२५

1 comment:

  1. रामराया फार भावूक केलंत

    ReplyDelete