Sunday, June 22, 2025

फ़ूडी एक्सप्रेस

आजकाल खादाडपणाला "फ़ूडी" असे आंग्लभाषेतले नाव प्राप्त झालेले आहे ही गोष्ट आमच्या चाणाक्ष नजरेतून सुटलेली नाही. मराठी शब्दांना असा आंग्ल साज चढवला की त्यांना काय प्रतिष्ठा प्राप्त होते, नाही ? एखाद्याला "खादाड" म्हणणे हा त्याचा अपमान ठरू शकतो पण त्याच माणसाला तुम्ही "फ़ूडी" म्हणून बघा. तो माणूस ती पदवी कशी अभिमानाने मिरवतो ते बघा.


तर थोडक्यात सांगायचे म्हणजे आम्ही असे "फ़ूडी" प्रवासी आहोत. रस्ता मार्गे जाताना कुठेकुठे कायकाय उत्त्तम मिळते या बाबतचा आमचा शोध सतत सुरू असतो. अर्थात त्यात काही रॉंग नम्बर्स लागतातही, नाही असे नाही. पण पूर्वी जर असे ५० % रॉंग नम्बर्स लागत असतील तर आजकाल त्यांचे प्रमाण फ़क्त २५ % वर आलेले आहे ही त्यातल्या त्यात दिलासाजनक बाब. 


छत्रपती संभाजीनगर ते जालना रस्त्यावर असणारा "अमृतसर पंजाबी" हा अगदी पंजाबी चव देणारा ढाबा, देऊळगाव राजा इथला मराठी माणसाने चालवलेला आणि एका उत्कृष्ट चवीसोबत उत्कृष्ट संस्कृतीचेही दर्शन घडविणारा ढाबा, अशाच एका सुसंस्कृत व्यवस्थापनाने चालवलेला आणि तिथल्या स्थानिक खाद्यपदार्थांची चव आपल्याला करवून देणारा धुळे - मुंबई नॅशनल हायवेवर मालेगावच्या आधी असलेला साई कार ढाबा. आमच्या आजवरच्या भ्रमंतीत अशा अनेक हि-यांचा शोध आम्ही कायम घेत असतो.


रेल्वे प्रवासात मात्र त्या त्या रेल्वेच्या पॅंट्री कारमधून येणा-या किंवा एखाद्या मधल्या स्टेशनवर थांबल्यानंतर तिथल्या प्लॅटफ़ॉर्मवर मिळणा-या पदार्थांवरच अवलंबून रहावे लागे. रेल्वेत एखाद्या स्थानिक रेस्त्रॉ मधून ऑनलाईन पदार्थ मागवता येण्याची सुविधा साधारण २०१३ पासून सुरू झाली होती आणि नवनवीन असताना आम्ही आमच्या गोंदिया ते मुंबई आणि मुंबई ते सोलापूर प्रवासात या सेवेचा लाभ घेण्याचा प्रयत्न केला होता. पण गोंदिया ते मुंबई प्रवासात अकोल्याला आणि मुंबई ते सोलापूर प्रवासात पुण्याला ते जेवण घेऊन येणारी व्यक्ती आलीच नाही. फ़ोन केला असताना "पोचतोय, पोचतोय" म्हणून उत्त्तरे मिळालीत. बरे झाले गोंदिया ते मुंबई प्रवासात धाकटा भाऊ नागपूरला भेटायला आलेला असताना त्याने थोडे खाण्याचे पदार्थ आणलेले होते. त्यावर आम्हाला गुजराण करावी लागली आणि आदल्या रात्रीच्या अनुभवाने शहाणे होऊन मुंबई ते सोलापूर प्रवासात आम्ही कर्जतला वडे, पुण्याला सॅंडविचेस वगैरे खाऊन घेतलेले होते. त्यामुळे उपाशी रहावे लागले नाही तरी या बेभरवशाच्या सेवेमुळे आम्हाला अर्धपोटी नक्कीच रहावे लागले होते. म्हणून ऑनलाईन मागवण्यापेक्षा रेल्वेच्या पॅंट्री कारची विश्वसनीयता जास्त हा आमचा ग्रह झालेला आहे.


आमच्या लाडक्या महाराष्ट्र एक्सप्रेसला कधीच पॅंट्री कार नव्हती. खरेतर तिच्या २७, २८ तासांच्या प्रवासासाठी तिला पॅंट्री कार मिळायला हवी असा आमचा ग्रह फ़ार वर्षे होता. "डेक्कन क्वीन ला तिच्या अवघ्या ३, ३.५ तासांच्या प्रवासासाठी पॅंट्री कार मिळते आणि आमच्या महाराष्ट्र एक्सप्रेसला मिळत नाही म्हणजे काय ? हा मुंबई - पुणे करांनी आमच्या विदर्भावर केलेला अन्याय आहे." असे टिपीकल नागपुरी विचार आमच्या मनात यायचेही. आम्ही ते जाहीररित्या बोललेलोही आहे. पण रेल्वेचे एखाद्या गाडीला पॅंट्री कार देण्याचे किंवा न देण्याचे निकष निराळे असतात आणि डेक्कन क्वीनची पॅंट्री कार ही नुसती पॅंट्री कार नसून पॅंट्री कम डायनिंग कार आहे, तो भारतीय रेल्वेचा एक मानबिंदू आहे हे कळले आणि आमचा विरोध मावळला. 


महाराष्ट्र एक्सप्रेसमध्ये गाडी नागपूरवरून निघून वर्धेपर्यंत पोचली की सेवाग्राम (पूर्वीचे वर्धा पूर्व स्टेशन) स्टेशनवर डाळवडे यायचेत. टिपीकल पूर्व विदर्भाची, चंद्रपूरची उत्कृष्ट चव असणारे हे डाळवडे मी सेवाग्राम स्टेशनशिवाय इतरत्र कुठेही बघितले नाहीत, अगदी सेवाग्राम स्टेशनपासून ३ किलोमीटर अंतर असलेल्या वर्धा स्टेशनवर सुद्धा. 


वर्धा स्टेशनवर मिळणारा चहा मात्र अत्यंत मचूळ असायचा आणि आहे. अत्यंत बोगस चहाची माझी व्याख्या वर्धा आणि पुणे स्टेशनवर मिळणारा चहा अशी आहे. एखादेवेळी घरी चहा पिताना जर माझ्याकडून "वा ! फ़र्स्ट क्लास" अशी नेहेमीची दाद गेली नाही याउलट चहा पिताना चेहेरा आंबट झाला असेल तर सुपत्नी विचारायची, "एकदम पुणे किंवा वर्धा स्टेशनचा चहा झालाय का रे ?" इतका तो चहा कुविख्यात होता. मला वाटत उकळलेल्या पाण्यात कोळशाची भुकटी टाकली तरी ते मिश्रण वर्धा स्टेशनच्या चहापेक्षा चवदार लागेल. 


बडनेरा स्टेशनवर मात्र बरीच वर्षे एक चाचा आपली केळ्यांची गाडी घेऊन "केला बढिया है" अशी टिपीकल आरोळी मारत केळी विकायचेत. केळी चांगली असायचीत. खुद्द जळगाव स्टेशनात मात्र कधी असे केळी विकणारे कधी दिसले नाहीत. "पिकत तिथे विकत नाही" या म्हणीला साजेसा हा व्यवहार.


अकोला स्टेशनवर काही खास वस्तू विकत घेतल्याचे मला तरी आठवत नाही कारण अकोल्यानंतर लगेचच अर्ध्या तासात शेगावचे वेध लागतात. गाडी मंदिरासमोरून जात असताना सगळे एंजिनचालक एक मोठ्ठा हॉर्न देतातच. महाराजांना मानवंदना म्हणून. आणि गाडीतले जाणकार मंदिराच्या कळसाकडे गाडीतूनच पाहून मनोभावे हात जोडतात. "बोलाव रे देवा लवकर दर्शनाला" अशी भाक देतात. शेगाव स्टेशन मात्र टिपीकल शेगाव कचोरी साठी प्रसिद्ध आहे. पण इथे मात्र बरोबर चांगली कचोरी मिळण्यासाठी नशीबच पाहिजे. ५० - ५० पर्सेन्ट चान्सेस असतात. एखादेवेळी मस्त गरमागरम आणि ताजी कचोरी मिळून जाते तर कधी थोड्या वेळापूर्वी येऊन गेलेल्या गाडीसाठी तळलेली पण तिथे खप न झाल्यामुळे तशीच ठेवलेली कोमट किंवा थंड कचोरी घाईघाईत आपल्याला खपविली जाते. अर्थात खुद्द महाराजांचा पाय लागल्यामुळे शेगाव स्टेशन हे इतके पवित्र आहे की आपण ती थंड कचोरी सुद्धा प्रसाद म्हणून खाऊन टाकतो.


भुसावळ स्टेशन हे प्रवाशांच्या बाबतीत कॉस्मॉपॉलिटन. इथे उत्त्तरेकडून येणा-या गाड्यांमधल्या भय्या लोकांसाठी (भुसावळच्या उत्त्तरेला सगळे भैय्या राहतात हा एक टिपीकल मराठी माणसाचा समज आहे. जसा मलकापूरच्या पश्चिमेला राहणारे सगळे लोक "मुंबई - पुणेकर" हा टिपीकल वैदर्भीय माणसाचा गैरसमज आहे अगदी तसाच.), नागपूर , छत्त्तीसगढ, ओरिसा, पश्चिम बंगाल इथून येणा-या पुरभैय्यांसाठी, दक्षिणेकडून येणा-या दाक्षिणात्यांसाठी सर्व प्रकारची व्यंजने उपलब्ध असतात. केळी पट्ट्यातली केळी जळगाव स्टेशनवर मिळत नसली तरी भुसावळला मिळतात. पण हे स्टेशन प्रकृतीने कॉस्मॉपॉलिटन असल्याने स्वतःचे वैशिष्ट्य असे काही नाही.


महाराष्ट्र एक्सप्रेसमध्ये म्हणा किंवा विदर्भ एक्सप्रेसमध्ये म्हणा भुसावळ ते मनमाड ते दौंड आणि भुसावळ ते मनमाड ते कल्याण हा प्रवास रात्री होत असे. त्यामुळे मधल्या चाळीसगाव, मनमाड, कोपरगाव, अहिल्यानगर इथल्या स्टेशन्सवरच्या खाद्यसंस्कृतीचा फ़ारसा परिचय झाला नाही. तसेच मुंबईला जाताना नाशिक स्टेशनचे व्हायचे. पण परतताना, विशेषतः सेवाग्राम एक्सप्रेसने परतताना कसारा स्टेशनवर आजूबाजूची स्थानिक मंडळी पळसाच्या पानांची शंक्वाकृती आकाराचे (Conical Shape) द्रोण करून त्यात तिथल्या स्थानिक करवंदांची (रानाची मैना) विक्री करायचीत ती मात्र अप्रतिम. अर्थात आपल्या विदर्भात करवंद वेगळी असतात आणि ठाणे जिल्ह्यात ज्याला करवंदे म्हणतात ती संपूर्ण वेगळी असतात. इथली करवंदे जांभळांसारखी काळी जांभळी आणि खायला अप्रतिम गोड असतात. कसारा स्टेशनवर पुढे घाट चढण्यासाठी म्हणून गाडीला मागून दोन तीन एंजिने लावतात त्यामुळे गाडी तबियतेने थांबलेली असते. ही करवंद विकणारी मंडळी अगदी शोधून काढता येतात आणि त्यांच्यापर्यंत जाऊन आपण ती करवंदे विकत घेऊ शकतो.


बाकी कल्याण, ठाण्यापासून तर मग स्टेशनवर वडापावचेच अनभिषिज्ञ साम्राज्य सुरू होते. अर्थात तो वडापाव बाहेरगावावरून येणा-या मेल एक्सप्रेसच्या प्रवाशांसाठी नसतोच मुळी. तो वडापाव मुंबईच्या लोकलशी आपली नशीबे जोडून लांबलांब प्रवास करीत आपले आयुष्य घडविणा-या चाकरमान्यांसाठी असतो. त्यातही एखादा चलाख चाकरमानी ठाण्यापर्यंत एका लोकलने येऊन पटकन बाहेर जाऊन अगदी ठाणे स्टेशनबाहेर मिळणारा कुंजविहारचा वडा (राम मारूती रोडवरचा राजमाता वडापाव फ़ारच लांब पडला असता) घेऊन मागून चारच मिनीटांनी येणा-या दुस-या लोकलमध्ये बसून बदलापूर किंवा टिटवाळा गाठतो हे मी माझ्या डोळ्यांनी बघितलेले आहे.


विदर्भ एक्सप्रेसमधल्या एका खाद्यपदार्थाचा शोध मला फ़ार उशीरा लागला याची मला खरोखर खंत आहे. विदर्भ एक्सप्रेसला सुद्धा पॅंट्री कार नाही. विदर्भ मुंबईवरून सुटतासुटता एका वेताच्या मोठ्या टोपलीत मावतील इतक्या कुल्फ़्या घेऊन (पारशी डेअरीच्या कुल्फ़्या) एक विक्रेता साधारण S - 2  किंवा S- 3 कोचमध्ये शिरतो. त्याचा प्रवास S - 2  पासून S - 1 कडे आणि पुढे वातानुकुलीत कोचेसकडे होत असतो. पण पहिल्या वातानुकुलीत कोचमध्ये येईपर्यंतच त्याच्याकडल्या सगळ्या कुल्फ़्या संपलेल्या असतात. म्हणून जाणकार मंडळी गाडी सुटली रे सुटली की S - 2  कडे धाव घेतात. साधारण एका छोट्या ताटलीच्या आकाराची, थोडेसे दूध लागलेल्या चवीची ती अप्रतिम कुल्फ़ी खरेच खूप छान असते आणि इतके वर्ष एकच चव राखण्याचे त्यांचे कसब म्हणजे त्यांना एखादे ISO सर्टिफ़िकेटच दिले पाहिजे या मताचा मी आहे.


तसे तर हावडा मेल आणि गीतांजली गाड्यांनाही पॅन्ट्री कार फ़ार पूर्वीपासून असायच्यात. त्यातली कटलेटस सोडलीत तर इतर काही खाण्याची इच्छा होत नाही. न जाणो, सामिष आणि निरामिष (ही रेल्वेची खास भाषा. सामिष = मांसाहारी आणि निरामिष  = शाकाहारी. हे दोन संस्कृत शब्द रेल्वेतल्या कुठल्या पंडिताने कुठून शोधून काढले कोण जाणे ?) जेवणात यांनी भेसळ केली तर ? ही शंका कायम मनात असते.


बाकी कधीकधी एखाद्या अनोळखी जागीसुद्धा अप्रतिम चवीचे खाद्यपदार्थ खायला मिळतात यावर माझा विश्वास आहे बर का. अहो म्हणूनच तर दरवेळी एखाद्या अनोळखी जागेला एकदम खारीज करून न टाकता तिथली चव बघूयात तरी म्हणत आपण खात असतो ना. काहीवेळा रॉंग नंबर्स लागतीलही पण कधीकधी असा अनपेक्षित खजिनाही हाती लागतो. आम्ही सगळे कुटुंबिय दिल्ली स्टेशनवरून जम्मू मेलने जम्मू कडे निघालेलो होतो. आदल्या दिवशी दगदगीमुळे दिवसा आणि रात्रीही कुणाचेच नीट जेवण झालेले नव्हते. जम्मू मेल सकाळी ८ च्या सुमाराला पठाणकोट स्टेशनमध्ये दाखल होत असे. तिथे तिचे एंजिन उलट बाजूने येऊन लागत असे आणि तिचा पुढला प्रवास सुरू होत असे. आता जम्मू मेल पठाणकोट स्टेशनवर जात नाही. या स्टेशनला बायपास करणा-या चक्की बॅंक स्टेशनवरूनच पसार होते. पण तेव्हा ती पठाणकोट स्टेशनवर जायची. 


गाडी प्लॅटफ़ॉर्मला पुरती लागण्याआधीच "ए, छोले भटुरे" अशा आरोळ्यांनी सर्व विक्रेत्यांनी आपापल्या गाड्या घेऊन गाडीच्या कोचेसवर आक्रमण केले होते. आम्हा सर्वांना भुका तर लागल्याच होत्या. पण त्या भटु-यांचा आकार बघूनच आमच्यापैकी काहींनी "राम, आपल्याला ही डिश दोघांमध्ये एकच पुरे होईल. तसाच ऑर्डर दे." अशी मला सूचना केली. मी पण त्याचे पालन केले. पण सगळ्यांनाच सपाटून लागलेली भूक, त्यात त्या छोल्यांची अप्रतिम आणि अस्सल पंजाबी चव, ते मोठे मोठे दिसणारे पण अजिबात तेलकट नसलेले आणि तोंडात सहज विरघळणारे भटुरे यामुळे एकापाठोपाठ एक किती डिशेस आम्ही मागवल्यात आणि फ़स्त केल्यात याचा हिशेब आमच्यापैकी कुणालाच नव्हता. त्या विक्रेत्याकडे तो हिशेब होता म्हणून ठीक झाले. गाडी तिथे फ़क्त अर्धाच तास थांबली म्हणून बरे नाहीतर आमच्या गटाने तिथल्या सगळ्याच छोले भटु-यांचा फ़डशा पाडला असता. आज जवळपास २१ वर्षांनंतरही पठाणकोट स्टेशनवरच्या त्या छोले भटु-यांची चव अगदी माझ्या जिभेवर आहे.


या सगळ्यात अग्रगण्य म्हणजे मुंबई - मडगाव मांडवी एक्सप्रेसची पॅन्ट्री कार. ही गाडी आम्हा सर्व रेल्वे फ़ॅन्समध्ये "फ़ूडी एक्सप्रेस" म्हणून प्रसिद्ध आहे. आयुष्यात देवदयेने राजधानी एक्सप्रेसच्या प्रथम वर्ग वातानुकुलीत या सर्वोच्च वर्गाने प्रवास करण्याचे योग आलेत. या गाड्यांमध्ये प्रथम वर्ग प्रवाशांचे जे खाण्यापिण्याचे लाड होतात त्याला तोड नाही. सहसा हा डब्बा त्या गाडीच्या पॅन्ट्री कारच्या शेजारीच असतो आणि रेल्वेचे नियम या वर्गाच्या प्रवाशांसाठी खूप वेगळे आहेत. 


राजधानीत इतर वर्गाच्या प्रवाशांसाठी अन्न आणि पेये हे प्लॅस्टिक कन्टेनर्स मधून किंवा कागदी पेल्यांमधून आणि टेट्रा पॅक्समधून दिले जातात पण प्रथम वर्ग वातानुकूल प्रवाशांसाठी अगदी पद्धतशीरपणे चिनीमातीची भांडी, कप्स आणि स्टीलचे चमचे वापरले जातात. शीतपेये किंवा आईसक्रीम्स वगैरे काचेच्या भांड्यांमधून दिले जातात. जेवण करत असताना शेजारच्या पॅन्ट्री मधून कॅसरॉलमधून गरमागरम पोळ्या घेऊन तिथला सेवक येतो आणि आग्रह करकरून आपल्याला वाढतो. त्यामुळे या वर्गाचे तिकीट जरी विमानापेक्षा महाग असले तरी ती किंमत तिथे मिळणा-या या राजेशाही वागणुकीची आणि सेवेची असते. एकापाठोपाठ एक आपल्यावर खाण्यापिण्याचा इतका भडिमार राजधानी एक्सप्रेसमध्ये होत असतो की "बरे झाले, आपले तिकीट नागपूरपर्यंतच आहे. पुढे भोपाळपर्यंत किंवा नवी दिल्लीपर्यंत तिकीट असते तर बहुतेक आपल्याला या डब्यातून स्ट्रेचर आणूनच बाहेर काढावे लागले असते इतकी आपली पोटे तुडुंब आणि ताबडून भरलेली आहेत" अशी आमची भावना दरवेळी व्हायची.





गाडीतल्या कोचमध्ये शिरल्याशिरल्या प्रवाशांचे हे स्वागत. फ़ुले आणि टॉफ़ीज देऊन



चहापानाचा इंतजाम. सगदी सरंजामशाही पद्धत.



अगदी राजेशाही नाश्ता


अगदी राजेशाही नाश्ता



भारतीय रेल्वेतल्या अगदी टॉप क्लास गाडीतला सर्वोच्च दर्जाचा वर्ग

पण तरीही मांडवी एक्सप्रेसच्या पॅन्ट्री कारचे एक निराळेच वैशिष्ट्य आहे. इथे मिळणा-या पदार्थांची रेंज आणि त्यांची चव अगदी अतुलनीय आहे. आहुजा नावाच्या एका कॉन्ट्रॅक्टरला या गाडीचा हा पॅन्ट्री कारचा कॉन्ट्रॅक्ट मिळत आलेला आहे आणि त्यांनी आपला दर्जा कायम ठेवलेला आहे. केवळ भरपूर पदार्थ आणि उत्त्तम चव असून भागत नाही, ते पदार्थ स्वच्छ भांड्यांमधून प्रवाशांना मिळायला हवेत आणि आपल्या पॅन्ट्री कारचीही स्वच्छता तितकीच उत्त्तम असायला हवी यावर त्यांचा कटाक्ष असल्याचे कायम दिसते. मी जेव्हा जेव्हा मांडवी एक्सप्रेसने प्रवास केलाय तेव्हा तेव्हा मी आवर्जून त्या पॅन्ट्री कार मध्ये जातो आणि तिथली स्वच्छता, नीटनेटकेपणा पाहून पुन्हा पुन्हा समाधानी होतो. किंबहुना मुंबईवरून कोकणात किंवा गोव्याला जायला मांडवी एक्सप्रेसच्या आधी जनशताब्दी, तेजस एक्सप्रेस, वंदे भारत एक्सप्रेस, डबल डेकर एक्सप्रेस असे अनेक सोयीचे आणि जलद पर्याय उपलब्ध झालेले असले तरी खरा फ़ूडी रेल्वेफ़ॅन मांडवी एक्सप्रेसचाच पर्याय निवडत असतो.


मुंबई - मडगाव - मुंबई मांडवी एक्सप्रेस. 



स्वच्छ धुतलेल्या स्टीलच्या डब्यामधून आलेला अप्रतिम चवीचा उपमा आणि तितकेच चविष्ट सॅंडविच.



जेवण हे साधेसेच असले तरी चव केवळ अप्रतिम. जिभेवर रेंगाळणारी.


मांडवी एक्सप्रेसच्या पॅन्ट्री कारमधील मेन्यू. दर २००९ मधले आहेत हे ध्यानात घ्यावे.

एखाद्या स्टेशनवर मिळणा-या किंवा एखाद्या रेल्वेगाडीच्या पॅन्ट्री कारमध्ये मिळणा-या एखाद्या खास चवीच्या पदार्थाविषयी तुमच्याही अशाच काही आठवणी असतील तर नक्की कॉमेंटमध्ये लिहून कळवा. आमचाही डेटाबेस त्यामुळे विस्तारेल आणि लेख वाचणारी सगळी मंडळी त्यांच्या पुढल्या प्रवासांमध्ये ती चव घेऊन पाहतील.



- एक फ़ूडी रेल्वेफ़ॅन प्रा. वैभवीराम प्रकाश किन्हीकर. (खरेतर "खादाडखाऊ, लांडग्याचा भाऊ" असेच स्वतःला विशेषण लावणार होतो. पण उगाच आमच्या गरीब बिच्चा-या बंधूराजांना उगाचच लांडग्याची उपमा मिळाली असती म्हणून तो शब्दप्रयोग टाळला.)


रविवार, २२ जून २०२५


नागपूर


#सुरपाखरू


#३०दिवसात३०


#जून२०२५



1 comment:

  1. आपला लेख वाचल्यावर आपण खरोखर फार प्रवास करता हे समजले. हा प्रवास ‘ माइंडफुल’ असतो.
    फुडी हे विशेषण खादाड शब्दाला नक्की प्रतिष्ठा देते😀
    गेल्या काही दशकांत वहान सुविधा वाढली . त्या मुळे खाण्यासाठी प्रवास करणे शक्य होत आहे. मिडिया वर आपले अनुभव टाकणे कॅामन झाले आहे.
    यातुन या विक्रेत्याना नक्की फायदा होतो

    ReplyDelete