Tuesday, June 24, 2025

आनंदवारी

"चला बाई, ओलांडला आपन दिवे घाट. काय भारी वाटतय ना या वारीत येऊन !"


"आपल्या महाराजांचा रथ, त्याच्या संगटच्या भजनी दिंड्या, मध्ये मध्ये होणारी रिंगनं, त्यात आपन सगळे खेळत असलेल्या फ़ुगड्या, ते घोड्या्चं रिंगन, किती भारी !"


"मुक्या जनावरालाबी येवडी शिस्त ! हा महाराजांचाच चिमित्कार बाई."


"या सगळ्या चालन्यात आणि या व्यापात रात् कशी होते आणि दररोज मुक्कामाच्या ठिकाणी जाऊन आपण आपली पिठलं भाकरीची वाढलेली शिदोरी कशी संपवतो ? ते कळतच नाही बाई. मुक्कामाच्या जागी जमिनीवरच, कांबळं अंथरून आणि एखादी गोधडी, जुनेरं पांघरून केव्हा आन कशी निवांत झोप लागते ? हे बी कळतच नाही बाई."


"घरी का बर नसेल येत आशी झोप ? आणि घरी का बर नसेल लागत अशी भूक ? घरी तर छान बेडरूममध्ये मऊमऊ गाद्या. दुलया आहेत. मस्त येसी लावून घेतलाय मालकांनी."


"घरी छान मळा आहे. ताजा भाजीपाला येतो. मळ्यात राबनारी गडीमाणसं हायेत खरी पन आपल्यालाबी त्यांच्या मागे कमी बघावं लागतय का ? रोज तशी घरात, मळयात धावपळ होतेच बाई. तरीबी घरी भूक लागतच नाही. इथं मात्र अशी भूक लागते की बाई आनखी भाकरी वा्डा म्हनायला लाज वाटते. पण आजूबाजूच्या मैतरणीबी तशाच खातायत आणि इथे कुणीबी तुमच्या खान्याकडे लक्ष देत नाहीत म्हटल्यावर आपणबी पोटभर जेवतोय. संकोच न करता. अशी भूक घरी कधी लागेल बरं ?"


"घरी गुदस्त साली सून बी आलीया. माजं पोरगं चांगलं हाय. शेतकी कालिजात शिकलं सवरलं आन घरचीच शेती, मळा चांगला करतुया की आता. सूनबी शेजारच्या गावातली, तशी लांबच्या भावकीतलीच, गरीबाघरची पोर. चांगली हाय. अगदी पोटच्या पोरीसारकी समदं करती माजं आन माज्या धन्याचबी."


"पुन्य लागतं बाई अशा संसाराला. माजं धनी आनि माजे सासू सासरे दोनीबी वारकरी. मीच थोड्या सुदारक घरातनं आले. माज्या बा ला आनि आई ला बी आसं द्येवाधर्माचं खूप नवतं. या घरात मला देताना आमच्या आत्यानं, मावशाईनं मला खूप सांगितलं व्हतं ’बाई, वारकरी घरात जातीया. संबाळून वाग गं. रूढी, परंपरा जमवून घे गं बाई.’ पन मला त कंदीच असं काई येगळ वाटलं नाई बाई या घरात वागताना. माजी सासू आन माजे मामंजी कंदीच मला ’रूकमाई’ शिवाय हाक मारले नाईत. खूप प्रेम, आदर दिला म्हाता-यानं आन म्हातारीनं बी."


"दोन वर्षामागं सासू गेली, एकादशीला. सकाळी उटून न्हाली, धुली आन म्हाता-याच्या सोबत सकाळी चा पिता पिता म्हाता-याच्याच अंगावर मान टाकून कशीशीच करू लागली बाई. मंग म्हाता-यानं शांतपनं तिच्याकडून राम नाम म्हनून घेतलं बाई. राम नामातच म्हातारीचा श्वास गेला. म्हातारा तशातही आनंदी जाला. ५२ वर्साचा संसार जाला हुता पन म्हाता-यान आनंदान निरोप दिला सासूला. ’भाग्यवान होती बा’ म्हनत राईला. म्हातारीला आगीच्या हवाली करताना एकदाच डोळ्यात पानी तरारलं 

म्हाता-याच्या पन नंतर कंदीबी नाई."


"सासू नंतर दोनच महिन्यात सासरा बी गेला. चालता बोलता. घरी सकाळी सकाळी उटला, अंगोळ करून माळ घेऊन देवाम्होरं बसला आन तिथंच गलंडला. माळ हातातच ठेवून गेला म्हातारा, एकादशीलाच. आख्ख गाव लोटलं होत म्हाता-याच्या राखेला. विमान बांदलं लोकाईनं त्याच्यासाटी. मोठाच भाग्यवान म्हातारा. मुला नातवाच्या खांद्यावर गेला आनि मातीत मिसळला.". 


"सासू सासरे असेपावेतो कंदी वारी घडली नाई. त्यांनी बी कंदीच म्हटलं नाई का हे कर आन ते कर म्हनून. गेल्या वर्सी वारीची लय ओढ लागली व्हती बाई माजी मलाच. पन घरी नवीन सून आलती, ती माझ्या पोराचं आन माज्या धन्याचं, घरचं समदं कसं करनं ? काय करनं ? काय की बाई ? अशी माजी मलाच धास्ती होती म्हनून गेल्या वर्सी वारीला न्हाई गेली."


"पन सून चांगली हाये. घर, मळा, शेती समदं चांगलं संबाळतीया. सोताच्या नव-याचं आन आम्हा दोगांचबी चांगलं करतीया. म्हनून या येळी धन्याला आन पोरगा सुनेला इचारून वारीत आलीया."


"इतं आली हाये खरी आन अजूनबी घरचीच याद येतीया. इथं नाव कदी घेऊ ? त्या इट्टलाला मनातलं कदी सांगू ? त्याला सांगाव त्याच्यापाशी काईतरी मागाव अस काईच न्हाई म्हना. काय मागू त्याच्याकडं?"


"ठरलं. त्याच्यापाशी मागू ’बापारे, माज्या सासू सास-याला लाबलं तसच भाग्य आमाला बी लाबू दे. तुजं ध्यान आयुक्षभर ठेव आमच्यात आन तुज्यात आमचबी ध्यान राऊ दे.’ आजून काय मागायच असतया ?"


"वारीत आलो तं मागायचच असतं का त्याच्याकडं ? हा वारीतला आनंद समद्या जीवनात नेहमीच राऊ दे बापा. कुनाशी काई देनं नाई न घेनं नाई. तुज्या ओढीनं पावलं पडतायत बस्स. पायाला काटे बोचतायत का चिखल्या पडतायत काईच परवा न्हाई. बस तुजं दर्सन, तुज्या कळसाचं दर्सन झाल की वाटचाल सरली. मंग चाललेल्या वाटेचा हिशेब कुनी ठेवायचा ? तसच तुज्यामंदी मिळून जायला या देहाची वाटचाल ठीव. मंदी काय सुक दुक आलं त्याचा हिशेब कशाला ठिवायचा ? शेवटच्या टायमाला तूज्यापाशी पोचलो, तुज्यात मिळालो की झाली की देहाची आनंदवारी. मग संसार सुकी आहे का दुखी आहे ? याचा काय फ़रक पडनार बापा ? जीवनाचीच अशी आनंदवारी होऊ दे."


"बोला, पुंडलिक वरदा हारी विठठल, श्री ज्ञानदेव तुकाराम, सदगुरूनाथ महाराज की जय."



- आपले जीवन हे आनंदवारी व्हावे ही भावना मनात कायम बाळगणारा, भोळा भाविक प्रा. वैभवीराम प्रकाश किन्हीकर


मंगळवार, २४ जून २०२५


नागपूर


#सुरपाखरू


#३०दिवसात३०


#जून२०२५





Sunday, June 22, 2025

फ़ूडी एक्सप्रेस

आजकाल खादाडपणाला "फ़ूडी" असे आंग्लभाषेतले नाव प्राप्त झालेले आहे ही गोष्ट आमच्या चाणाक्ष नजरेतून सुटलेली नाही. मराठी शब्दांना असा आंग्ल साज चढवला की त्यांना काय प्रतिष्ठा प्राप्त होते, नाही ? एखाद्याला "खादाड" म्हणणे हा त्याचा अपमान ठरू शकतो पण त्याच माणसाला तुम्ही "फ़ूडी" म्हणून बघा. तो माणूस ती पदवी कशी अभिमानाने मिरवतो ते बघा.


तर थोडक्यात सांगायचे म्हणजे आम्ही असे "फ़ूडी" प्रवासी आहोत. रस्ता मार्गे जाताना कुठेकुठे कायकाय उत्त्तम मिळते या बाबतचा आमचा शोध सतत सुरू असतो. अर्थात त्यात काही रॉंग नम्बर्स लागतातही, नाही असे नाही. पण पूर्वी जर असे ५० % रॉंग नम्बर्स लागत असतील तर आजकाल त्यांचे प्रमाण फ़क्त २५ % वर आलेले आहे ही त्यातल्या त्यात दिलासाजनक बाब. 


छत्रपती संभाजीनगर ते जालना रस्त्यावर असणारा "अमृतसर पंजाबी" हा अगदी पंजाबी चव देणारा ढाबा, देऊळगाव राजा इथला मराठी माणसाने चालवलेला आणि एका उत्कृष्ट चवीसोबत उत्कृष्ट संस्कृतीचेही दर्शन घडविणारा ढाबा, अशाच एका सुसंस्कृत व्यवस्थापनाने चालवलेला आणि तिथल्या स्थानिक खाद्यपदार्थांची चव आपल्याला करवून देणारा धुळे - मुंबई नॅशनल हायवेवर मालेगावच्या आधी असलेला साई कार ढाबा. आमच्या आजवरच्या भ्रमंतीत अशा अनेक हि-यांचा शोध आम्ही कायम घेत असतो.


रेल्वे प्रवासात मात्र त्या त्या रेल्वेच्या पॅंट्री कारमधून येणा-या किंवा एखाद्या मधल्या स्टेशनवर थांबल्यानंतर तिथल्या प्लॅटफ़ॉर्मवर मिळणा-या पदार्थांवरच अवलंबून रहावे लागे. रेल्वेत एखाद्या स्थानिक रेस्त्रॉ मधून ऑनलाईन पदार्थ मागवता येण्याची सुविधा साधारण २०१३ पासून सुरू झाली होती आणि नवनवीन असताना आम्ही आमच्या गोंदिया ते मुंबई आणि मुंबई ते सोलापूर प्रवासात या सेवेचा लाभ घेण्याचा प्रयत्न केला होता. पण गोंदिया ते मुंबई प्रवासात अकोल्याला आणि मुंबई ते सोलापूर प्रवासात पुण्याला ते जेवण घेऊन येणारी व्यक्ती आलीच नाही. फ़ोन केला असताना "पोचतोय, पोचतोय" म्हणून उत्त्तरे मिळालीत. बरे झाले गोंदिया ते मुंबई प्रवासात धाकटा भाऊ नागपूरला भेटायला आलेला असताना त्याने थोडे खाण्याचे पदार्थ आणलेले होते. त्यावर आम्हाला गुजराण करावी लागली आणि आदल्या रात्रीच्या अनुभवाने शहाणे होऊन मुंबई ते सोलापूर प्रवासात आम्ही कर्जतला वडे, पुण्याला सॅंडविचेस वगैरे खाऊन घेतलेले होते. त्यामुळे उपाशी रहावे लागले नाही तरी या बेभरवशाच्या सेवेमुळे आम्हाला अर्धपोटी नक्कीच रहावे लागले होते. म्हणून ऑनलाईन मागवण्यापेक्षा रेल्वेच्या पॅंट्री कारची विश्वसनीयता जास्त हा आमचा ग्रह झालेला आहे.


आमच्या लाडक्या महाराष्ट्र एक्सप्रेसला कधीच पॅंट्री कार नव्हती. खरेतर तिच्या २७, २८ तासांच्या प्रवासासाठी तिला पॅंट्री कार मिळायला हवी असा आमचा ग्रह फ़ार वर्षे होता. "डेक्कन क्वीन ला तिच्या अवघ्या ३, ३.५ तासांच्या प्रवासासाठी पॅंट्री कार मिळते आणि आमच्या महाराष्ट्र एक्सप्रेसला मिळत नाही म्हणजे काय ? हा मुंबई - पुणे करांनी आमच्या विदर्भावर केलेला अन्याय आहे." असे टिपीकल नागपुरी विचार आमच्या मनात यायचेही. आम्ही ते जाहीररित्या बोललेलोही आहे. पण रेल्वेचे एखाद्या गाडीला पॅंट्री कार देण्याचे किंवा न देण्याचे निकष निराळे असतात आणि डेक्कन क्वीनची पॅंट्री कार ही नुसती पॅंट्री कार नसून पॅंट्री कम डायनिंग कार आहे, तो भारतीय रेल्वेचा एक मानबिंदू आहे हे कळले आणि आमचा विरोध मावळला. 


महाराष्ट्र एक्सप्रेसमध्ये गाडी नागपूरवरून निघून वर्धेपर्यंत पोचली की सेवाग्राम (पूर्वीचे वर्धा पूर्व स्टेशन) स्टेशनवर डाळवडे यायचेत. टिपीकल पूर्व विदर्भाची, चंद्रपूरची उत्कृष्ट चव असणारे हे डाळवडे मी सेवाग्राम स्टेशनशिवाय इतरत्र कुठेही बघितले नाहीत, अगदी सेवाग्राम स्टेशनपासून ३ किलोमीटर अंतर असलेल्या वर्धा स्टेशनवर सुद्धा. 


वर्धा स्टेशनवर मिळणारा चहा मात्र अत्यंत मचूळ असायचा आणि आहे. अत्यंत बोगस चहाची माझी व्याख्या वर्धा आणि पुणे स्टेशनवर मिळणारा चहा अशी आहे. एखादेवेळी घरी चहा पिताना जर माझ्याकडून "वा ! फ़र्स्ट क्लास" अशी नेहेमीची दाद गेली नाही याउलट चहा पिताना चेहेरा आंबट झाला असेल तर सुपत्नी विचारायची, "एकदम पुणे किंवा वर्धा स्टेशनचा चहा झालाय का रे ?" इतका तो चहा कुविख्यात होता. मला वाटत उकळलेल्या पाण्यात कोळशाची भुकटी टाकली तरी ते मिश्रण वर्धा स्टेशनच्या चहापेक्षा चवदार लागेल. 


बडनेरा स्टेशनवर मात्र बरीच वर्षे एक चाचा आपली केळ्यांची गाडी घेऊन "केला बढिया है" अशी टिपीकल आरोळी मारत केळी विकायचेत. केळी चांगली असायचीत. खुद्द जळगाव स्टेशनात मात्र कधी असे केळी विकणारे कधी दिसले नाहीत. "पिकत तिथे विकत नाही" या म्हणीला साजेसा हा व्यवहार.


अकोला स्टेशनवर काही खास वस्तू विकत घेतल्याचे मला तरी आठवत नाही कारण अकोल्यानंतर लगेचच अर्ध्या तासात शेगावचे वेध लागतात. गाडी मंदिरासमोरून जात असताना सगळे एंजिनचालक एक मोठ्ठा हॉर्न देतातच. महाराजांना मानवंदना म्हणून. आणि गाडीतले जाणकार मंदिराच्या कळसाकडे गाडीतूनच पाहून मनोभावे हात जोडतात. "बोलाव रे देवा लवकर दर्शनाला" अशी भाक देतात. शेगाव स्टेशन मात्र टिपीकल शेगाव कचोरी साठी प्रसिद्ध आहे. पण इथे मात्र बरोबर चांगली कचोरी मिळण्यासाठी नशीबच पाहिजे. ५० - ५० पर्सेन्ट चान्सेस असतात. एखादेवेळी मस्त गरमागरम आणि ताजी कचोरी मिळून जाते तर कधी थोड्या वेळापूर्वी येऊन गेलेल्या गाडीसाठी तळलेली पण तिथे खप न झाल्यामुळे तशीच ठेवलेली कोमट किंवा थंड कचोरी घाईघाईत आपल्याला खपविली जाते. अर्थात खुद्द महाराजांचा पाय लागल्यामुळे शेगाव स्टेशन हे इतके पवित्र आहे की आपण ती थंड कचोरी सुद्धा प्रसाद म्हणून खाऊन टाकतो.


भुसावळ स्टेशन हे प्रवाशांच्या बाबतीत कॉस्मॉपॉलिटन. इथे उत्त्तरेकडून येणा-या गाड्यांमधल्या भय्या लोकांसाठी (भुसावळच्या उत्त्तरेला सगळे भैय्या राहतात हा एक टिपीकल मराठी माणसाचा समज आहे. जसा मलकापूरच्या पश्चिमेला राहणारे सगळे लोक "मुंबई - पुणेकर" हा टिपीकल वैदर्भीय माणसाचा गैरसमज आहे अगदी तसाच.), नागपूर , छत्त्तीसगढ, ओरिसा, पश्चिम बंगाल इथून येणा-या पुरभैय्यांसाठी, दक्षिणेकडून येणा-या दाक्षिणात्यांसाठी सर्व प्रकारची व्यंजने उपलब्ध असतात. केळी पट्ट्यातली केळी जळगाव स्टेशनवर मिळत नसली तरी भुसावळला मिळतात. पण हे स्टेशन प्रकृतीने कॉस्मॉपॉलिटन असल्याने स्वतःचे वैशिष्ट्य असे काही नाही.


महाराष्ट्र एक्सप्रेसमध्ये म्हणा किंवा विदर्भ एक्सप्रेसमध्ये म्हणा भुसावळ ते मनमाड ते दौंड आणि भुसावळ ते मनमाड ते कल्याण हा प्रवास रात्री होत असे. त्यामुळे मधल्या चाळीसगाव, मनमाड, कोपरगाव, अहिल्यानगर इथल्या स्टेशन्सवरच्या खाद्यसंस्कृतीचा फ़ारसा परिचय झाला नाही. तसेच मुंबईला जाताना नाशिक स्टेशनचे व्हायचे. पण परतताना, विशेषतः सेवाग्राम एक्सप्रेसने परतताना कसारा स्टेशनवर आजूबाजूची स्थानिक मंडळी पळसाच्या पानांची शंक्वाकृती आकाराचे (Conical Shape) द्रोण करून त्यात तिथल्या स्थानिक करवंदांची (रानाची मैना) विक्री करायचीत ती मात्र अप्रतिम. अर्थात आपल्या विदर्भात करवंद वेगळी असतात आणि ठाणे जिल्ह्यात ज्याला करवंदे म्हणतात ती संपूर्ण वेगळी असतात. इथली करवंदे जांभळांसारखी काळी जांभळी आणि खायला अप्रतिम गोड असतात. कसारा स्टेशनवर पुढे घाट चढण्यासाठी म्हणून गाडीला मागून दोन तीन एंजिने लावतात त्यामुळे गाडी तबियतेने थांबलेली असते. ही करवंद विकणारी मंडळी अगदी शोधून काढता येतात आणि त्यांच्यापर्यंत जाऊन आपण ती करवंदे विकत घेऊ शकतो.


बाकी कल्याण, ठाण्यापासून तर मग स्टेशनवर वडापावचेच अनभिषिज्ञ साम्राज्य सुरू होते. अर्थात तो वडापाव बाहेरगावावरून येणा-या मेल एक्सप्रेसच्या प्रवाशांसाठी नसतोच मुळी. तो वडापाव मुंबईच्या लोकलशी आपली नशीबे जोडून लांबलांब प्रवास करीत आपले आयुष्य घडविणा-या चाकरमान्यांसाठी असतो. त्यातही एखादा चलाख चाकरमानी ठाण्यापर्यंत एका लोकलने येऊन पटकन बाहेर जाऊन अगदी ठाणे स्टेशनबाहेर मिळणारा कुंजविहारचा वडा (राम मारूती रोडवरचा राजमाता वडापाव फ़ारच लांब पडला असता) घेऊन मागून चारच मिनीटांनी येणा-या दुस-या लोकलमध्ये बसून बदलापूर किंवा टिटवाळा गाठतो हे मी माझ्या डोळ्यांनी बघितलेले आहे.


विदर्भ एक्सप्रेसमधल्या एका खाद्यपदार्थाचा शोध मला फ़ार उशीरा लागला याची मला खरोखर खंत आहे. विदर्भ एक्सप्रेसला सुद्धा पॅंट्री कार नाही. विदर्भ मुंबईवरून सुटतासुटता एका वेताच्या मोठ्या टोपलीत मावतील इतक्या कुल्फ़्या घेऊन (पारशी डेअरीच्या कुल्फ़्या) एक विक्रेता साधारण S - 2  किंवा S- 3 कोचमध्ये शिरतो. त्याचा प्रवास S - 2  पासून S - 1 कडे आणि पुढे वातानुकुलीत कोचेसकडे होत असतो. पण पहिल्या वातानुकुलीत कोचमध्ये येईपर्यंतच त्याच्याकडल्या सगळ्या कुल्फ़्या संपलेल्या असतात. म्हणून जाणकार मंडळी गाडी सुटली रे सुटली की S - 2  कडे धाव घेतात. साधारण एका छोट्या ताटलीच्या आकाराची, थोडेसे दूध लागलेल्या चवीची ती अप्रतिम कुल्फ़ी खरेच खूप छान असते आणि इतके वर्ष एकच चव राखण्याचे त्यांचे कसब म्हणजे त्यांना एखादे ISO सर्टिफ़िकेटच दिले पाहिजे या मताचा मी आहे.


तसे तर हावडा मेल आणि गीतांजली गाड्यांनाही पॅन्ट्री कार फ़ार पूर्वीपासून असायच्यात. त्यातली कटलेटस सोडलीत तर इतर काही खाण्याची इच्छा होत नाही. न जाणो, सामिष आणि निरामिष (ही रेल्वेची खास भाषा. सामिष = मांसाहारी आणि निरामिष  = शाकाहारी. हे दोन संस्कृत शब्द रेल्वेतल्या कुठल्या पंडिताने कुठून शोधून काढले कोण जाणे ?) जेवणात यांनी भेसळ केली तर ? ही शंका कायम मनात असते.


बाकी कधीकधी एखाद्या अनोळखी जागीसुद्धा अप्रतिम चवीचे खाद्यपदार्थ खायला मिळतात यावर माझा विश्वास आहे बर का. अहो म्हणूनच तर दरवेळी एखाद्या अनोळखी जागेला एकदम खारीज करून न टाकता तिथली चव बघूयात तरी म्हणत आपण खात असतो ना. काहीवेळा रॉंग नंबर्स लागतीलही पण कधीकधी असा अनपेक्षित खजिनाही हाती लागतो. आम्ही सगळे कुटुंबिय दिल्ली स्टेशनवरून जम्मू मेलने जम्मू कडे निघालेलो होतो. आदल्या दिवशी दगदगीमुळे दिवसा आणि रात्रीही कुणाचेच नीट जेवण झालेले नव्हते. जम्मू मेल सकाळी ८ च्या सुमाराला पठाणकोट स्टेशनमध्ये दाखल होत असे. तिथे तिचे एंजिन उलट बाजूने येऊन लागत असे आणि तिचा पुढला प्रवास सुरू होत असे. आता जम्मू मेल पठाणकोट स्टेशनवर जात नाही. या स्टेशनला बायपास करणा-या चक्की बॅंक स्टेशनवरूनच पसार होते. पण तेव्हा ती पठाणकोट स्टेशनवर जायची. 


गाडी प्लॅटफ़ॉर्मला पुरती लागण्याआधीच "ए, छोले भटुरे" अशा आरोळ्यांनी सर्व विक्रेत्यांनी आपापल्या गाड्या घेऊन गाडीच्या कोचेसवर आक्रमण केले होते. आम्हा सर्वांना भुका तर लागल्याच होत्या. पण त्या भटु-यांचा आकार बघूनच आमच्यापैकी काहींनी "राम, आपल्याला ही डिश दोघांमध्ये एकच पुरे होईल. तसाच ऑर्डर दे." अशी मला सूचना केली. मी पण त्याचे पालन केले. पण सगळ्यांनाच सपाटून लागलेली भूक, त्यात त्या छोल्यांची अप्रतिम आणि अस्सल पंजाबी चव, ते मोठे मोठे दिसणारे पण अजिबात तेलकट नसलेले आणि तोंडात सहज विरघळणारे भटुरे यामुळे एकापाठोपाठ एक किती डिशेस आम्ही मागवल्यात आणि फ़स्त केल्यात याचा हिशेब आमच्यापैकी कुणालाच नव्हता. त्या विक्रेत्याकडे तो हिशेब होता म्हणून ठीक झाले. गाडी तिथे फ़क्त अर्धाच तास थांबली म्हणून बरे नाहीतर आमच्या गटाने तिथल्या सगळ्याच छोले भटु-यांचा फ़डशा पाडला असता. आज जवळपास २१ वर्षांनंतरही पठाणकोट स्टेशनवरच्या त्या छोले भटु-यांची चव अगदी माझ्या जिभेवर आहे.


या सगळ्यात अग्रगण्य म्हणजे मुंबई - मडगाव मांडवी एक्सप्रेसची पॅन्ट्री कार. ही गाडी आम्हा सर्व रेल्वे फ़ॅन्समध्ये "फ़ूडी एक्सप्रेस" म्हणून प्रसिद्ध आहे. आयुष्यात देवदयेने राजधानी एक्सप्रेसच्या प्रथम वर्ग वातानुकुलीत या सर्वोच्च वर्गाने प्रवास करण्याचे योग आलेत. या गाड्यांमध्ये प्रथम वर्ग प्रवाशांचे जे खाण्यापिण्याचे लाड होतात त्याला तोड नाही. सहसा हा डब्बा त्या गाडीच्या पॅन्ट्री कारच्या शेजारीच असतो आणि रेल्वेचे नियम या वर्गाच्या प्रवाशांसाठी खूप वेगळे आहेत. 


राजधानीत इतर वर्गाच्या प्रवाशांसाठी अन्न आणि पेये हे प्लॅस्टिक कन्टेनर्स मधून किंवा कागदी पेल्यांमधून आणि टेट्रा पॅक्समधून दिले जातात पण प्रथम वर्ग वातानुकूल प्रवाशांसाठी अगदी पद्धतशीरपणे चिनीमातीची भांडी, कप्स आणि स्टीलचे चमचे वापरले जातात. शीतपेये किंवा आईसक्रीम्स वगैरे काचेच्या भांड्यांमधून दिले जातात. जेवण करत असताना शेजारच्या पॅन्ट्री मधून कॅसरॉलमधून गरमागरम पोळ्या घेऊन तिथला सेवक येतो आणि आग्रह करकरून आपल्याला वाढतो. त्यामुळे या वर्गाचे तिकीट जरी विमानापेक्षा महाग असले तरी ती किंमत तिथे मिळणा-या या राजेशाही वागणुकीची आणि सेवेची असते. एकापाठोपाठ एक आपल्यावर खाण्यापिण्याचा इतका भडिमार राजधानी एक्सप्रेसमध्ये होत असतो की "बरे झाले, आपले तिकीट नागपूरपर्यंतच आहे. पुढे भोपाळपर्यंत किंवा नवी दिल्लीपर्यंत तिकीट असते तर बहुतेक आपल्याला या डब्यातून स्ट्रेचर आणूनच बाहेर काढावे लागले असते इतकी आपली पोटे तुडुंब आणि ताबडून भरलेली आहेत" अशी आमची भावना दरवेळी व्हायची.





गाडीतल्या कोचमध्ये शिरल्याशिरल्या प्रवाशांचे हे स्वागत. फ़ुले आणि टॉफ़ीज देऊन



चहापानाचा इंतजाम. सगदी सरंजामशाही पद्धत.



अगदी राजेशाही नाश्ता


अगदी राजेशाही नाश्ता



भारतीय रेल्वेतल्या अगदी टॉप क्लास गाडीतला सर्वोच्च दर्जाचा वर्ग

पण तरीही मांडवी एक्सप्रेसच्या पॅन्ट्री कारचे एक निराळेच वैशिष्ट्य आहे. इथे मिळणा-या पदार्थांची रेंज आणि त्यांची चव अगदी अतुलनीय आहे. आहुजा नावाच्या एका कॉन्ट्रॅक्टरला या गाडीचा हा पॅन्ट्री कारचा कॉन्ट्रॅक्ट मिळत आलेला आहे आणि त्यांनी आपला दर्जा कायम ठेवलेला आहे. केवळ भरपूर पदार्थ आणि उत्त्तम चव असून भागत नाही, ते पदार्थ स्वच्छ भांड्यांमधून प्रवाशांना मिळायला हवेत आणि आपल्या पॅन्ट्री कारचीही स्वच्छता तितकीच उत्त्तम असायला हवी यावर त्यांचा कटाक्ष असल्याचे कायम दिसते. मी जेव्हा जेव्हा मांडवी एक्सप्रेसने प्रवास केलाय तेव्हा तेव्हा मी आवर्जून त्या पॅन्ट्री कार मध्ये जातो आणि तिथली स्वच्छता, नीटनेटकेपणा पाहून पुन्हा पुन्हा समाधानी होतो. किंबहुना मुंबईवरून कोकणात किंवा गोव्याला जायला मांडवी एक्सप्रेसच्या आधी जनशताब्दी, तेजस एक्सप्रेस, वंदे भारत एक्सप्रेस, डबल डेकर एक्सप्रेस असे अनेक सोयीचे आणि जलद पर्याय उपलब्ध झालेले असले तरी खरा फ़ूडी रेल्वेफ़ॅन मांडवी एक्सप्रेसचाच पर्याय निवडत असतो.


मुंबई - मडगाव - मुंबई मांडवी एक्सप्रेस. 



स्वच्छ धुतलेल्या स्टीलच्या डब्यामधून आलेला अप्रतिम चवीचा उपमा आणि तितकेच चविष्ट सॅंडविच.



जेवण हे साधेसेच असले तरी चव केवळ अप्रतिम. जिभेवर रेंगाळणारी.


मांडवी एक्सप्रेसच्या पॅन्ट्री कारमधील मेन्यू. दर २००९ मधले आहेत हे ध्यानात घ्यावे.

एखाद्या स्टेशनवर मिळणा-या किंवा एखाद्या रेल्वेगाडीच्या पॅन्ट्री कारमध्ये मिळणा-या एखाद्या खास चवीच्या पदार्थाविषयी तुमच्याही अशाच काही आठवणी असतील तर नक्की कॉमेंटमध्ये लिहून कळवा. आमचाही डेटाबेस त्यामुळे विस्तारेल आणि लेख वाचणारी सगळी मंडळी त्यांच्या पुढल्या प्रवासांमध्ये ती चव घेऊन पाहतील.



- एक फ़ूडी रेल्वेफ़ॅन प्रा. वैभवीराम प्रकाश किन्हीकर. (खरेतर "खादाडखाऊ, लांडग्याचा भाऊ" असेच स्वतःला विशेषण लावणार होतो. पण उगाच आमच्या गरीब बिच्चा-या बंधूराजांना उगाचच लांडग्याची उपमा मिळाली असती म्हणून तो शब्दप्रयोग टाळला.)


रविवार, २२ जून २०२५


नागपूर


#सुरपाखरू


#३०दिवसात३०


#जून२०२५



Saturday, June 21, 2025

जीवनातला एक महत्वाचा दिवस २९/११/१९८९

आज मी माझ्या आयुष्यातल्या एका अत्यंत महत्वाच्या दिवसाबद्दल आणि माझ्या अनुभवाबद्दल लिहीणार आहे. ही गोष्ट माझे त्याकाळचे रूम पार्टनर्स, माझे आईवडील आणि माझे अगदी खास मित्र यांच्यापर्यंतच आजवर मर्यादित होती. हा दिवस माझ्या आयुष्यात मी विसरूच शकत नाही. 


शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालय, कराड येथे सप्टेंबर १९८९ पासून आमचे प्रथम सत्र अभियांत्रिकी सुरू झाले होते. खरेतर इथले सत्र जुलै अखेरीसच सुरू झालेले होते. आमचे प्रवेश व्ही. आर. सी. ई. नागपूर येथून झाल्याने आणि आमचा प्रवेश अगदी तिस-या राऊंडला झाल्याने आम्ही सप्टेंबरच्या पहिल्या आठवड्यात इथे आलो होतो. आम्हाला हॉस्टेल मिळाले होते. त्याकाळी हॉस्टेल छान होते आणि मुख्य म्हणजे हॉस्टेलचा खर्च रूपये ६५ प्रतिवर्ष एव्हढा होता. हॉस्टेलला गरम पाण्यापासून इतर सर्व सोयीसुविधा मिळायच्यात. ज्यांना मेरिटनुसार हॉस्टेल मिळू शकले नाहीत असे आमचे काही मित्र कराड शहरात खोली करून रहायचेत. खोलीचे भाडे किमान १०० रूपये प्रतिमहिना होते. शिवाय खोली्च्या वापरावर तिथल्या घरमालकांचे अनेक निर्बंध होते. खोलीत गरम पाण्यासाठी गिझर लावायचा नाही. रात्री अमुक एका वेळानंतर लाईटस लावायचे नाहीत वगैरे वगैरे. त्यामुळे खर्चाच्या मानाने आणि अभ्यासासाठीही हॉस्टेल हा सर्वोत्त्तम पर्याय होता. शिवाय शहरात खोली करून राहिलोत तर रोज कॉलेजपर्यंत येणे जाणे हे शहर बसने करावे लागे. त्याचा खर्च वेगळाच.


प्रथम वर्षाला आम्हाला हॉस्टेलला आमचे रूम पार्टनर्स निवडण्याची मुभा नव्हती. द्वितीय वर्षापासून आपण आपले आपले रूम पार्टनर्स निवडू शकायचो. प्रथम वर्षाला रूम पार्टनर्सचे अगदी रॅंडम अलोकेशन होत असे. नशीब एव्हढेच होते की एकाच विद्यापीठ क्षेत्रातून आलेली मुले एकाच रूममध्ये आणि शक्यतो हॉस्टेलच्या एकाच विंगमध्ये असायची. त्यामुळे आम्हा नागपूर विद्यापीठकरांची एक विंग, पुणे विद्यापीठातून आलेल्या पुणे - नाशिक - नगरकरांची एक विंग, शिवाजी विद्यापीठ क्षेत्रातल्या सोलापूर - कोल्हापूर - सांगलीकरांची एक विंग असे वेगवेगळ्या हॉस्टेल विंग्जमध्ये आमची रहाण्याची व्यवस्था होती. आणि मेस म्हणजे सहकार तत्वावर चालणारी, विद्यार्थ्यांनीच विद्यार्थ्यांसाठी चालवलेली मेस अशी सुंदर मेस होती. आमच्य महाविद्यालय आवारातच. आमच्या हॉस्टेल पासून अगदी ५० पावलांवर. त्यावेळी मेसचे महिन्याचे बिल १२५ ते १५० रूपये प्रतिमहिना येत असे. गावात खोली करून राहिल्यावर तिथे मेस शोधावी लागत असे. ती जरा दूरच असे आणि तिचे बिलही हॉस्टेलच्या मेसपेक्षा जास्त येत असे. गावात राहण्याचा हा आणखी एक तोटा.


प्रथम वर्षाला आम्ही उशीरा गेलो खरे पण तिथे आमच्या पूर्वी, ॲडमिशनच्या पहिल्याच राऊंडमध्ये ॲडमिशन मिळालेला एक मुलगा आम्हाला तिथे रूम पार्टनर म्हणून मिळाला. आमच्या काही दिवस आधी इथे आल्यामुळे त्याने आमच्यावर जरा सिनीयारिटी गाजवायला सुरूवात केली. त्यातून त्याचे कोणीतरी जवळचे नातेवाईक त्याकाळच्या तंत्रशिक्षण मंडळावर उच्च्पदस्थ होते त्यामुळे त्याची स्वतःबद्दल थोडी वेगळी कल्पना होती. स्वतःला काही वेगळे विशेषाधिकार आहेत याच गुर्मीत आणि धुंदीत तो किमान पहिले सत्र तरी तो तिथे वावरत होता.


मी आणि माझ्यासारखाच नागपूरवरून गेलेला आणखी एक विद्यार्थी आणि आधीपासून तिथे असलेला आमचा काही दिवसांचा सिनीयर असे आम्ही तिघे रूम नंबर 007 चे रहिवासी झालोत. आमच्या अभ्यासाच्या सवयींवर आणि इतर वागण्यावरही या काही दिवसांच्या सिनीयरने लक्ष ठेवायला आणि अकारण टीका करायला सुरूवात केली. एकतर आमचे प्रवेश उशीरा झाल्याने आमचा साधारण महिन्याभराचा अभ्यास बुडला होता. शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालय असल्याने उशीरा आलेल्या विद्यार्थ्यांसाठी विशेष वर्ग चालवून आत्त्तापर्यंत झालेला अभ्यास भरून काढण्याचे प्रयत्न वगैरे त्यांच्याकडून शक्यच नव्हते. घरापासून पहिल्यांदाच इतके दूर राहणे, सगळ्या गोष्टी स्वतःच्या स्वतःच मॅनेज करणे, पैशांचे नियोजन बघणे आणि चालू असलेला अभ्यास समजावून घेताना झालेला अभ्यास स्वाभ्यासाद्वारे भरून काढणे अशी आमची तारेवरची कसरत तिथे पहिल्या सत्राला सुरू होती आणि रूमवर हे सिनीयर महाशय आम्हाला प्रत्येक गोष्टीत हतोत्साहित करायला बसले होते. आम्ही अभ्यासाला बसलोत की "अरे लेको, असा अभ्यास कराल तर तुम्ही डी. सी.(६ पैकी ३ विषयांपेक्षा जास्त विषयात नापास) व्हाल. माझ्यासारखा अभ्यास करा." अर्थात हे वय त्याचेही न कळते असे होते. प्रत्येक व्यक्तीचे वेगळेपण, प्रत्येक व्यक्तीची शक्तीस्थळे (Strong Points), मर्मस्थळे (Weak Points) वेगवेगळी असू शकतात हे समजण्याइतका तो प्रगल्भ नव्हता आणि मनात कुठेतरी स्वतःविषयी अकारण श्रेष्ठतागंड (Superiority Complex) असल्याने तो दररोज आम्हा दोन्हीही पार्टनर्सना हतोत्साहित करीत होता. आणि मी दिवसेंदिवस मनातून खचत चाललेलो होतो.


दिवाळी झाली, पहिल्या सत्राचे शिकवणे संपले, आम्हाला परिक्षेआधी अभ्यासाच्या सुट्या (Preparation Leaves) लागल्यात. जेवढे समजून घेता येईल, तेव्हढे समजून माझा अभ्यास सुरू होता. त्यात पहिल्या सत्राला विषय तर कसले भारी होते. 


अ) इंग्रजी: ह्या विषयाची धास्ती नव्हती. हा विषय साधारण १२ व्या वर्गाच्या पातळीचा असायचा. त्यामुळे हा विषय सहज पास करू शकू हा आत्मविश्वास होता.


आ) गणित: हा विषय पण साधारण १२ व्या वर्गाच्या पातळीचाच होता पण या विषयाच्या तयारीबद्दल मला स्वतःलाच बिलकुल आत्मविश्वास वाटत नव्हता. १२ व्या वर्गात एकाच टॉपिकवरचे शेकडो गणिते सोडवून आलेला आत्मविश्वास इथे मात्र पूर्ण ढासळलेला होता.


इ) भौतिकशास्त्र: हा विषय सुद्धा १२ व्या वर्गाच्या पातळीपेक्षा सोपा वाटत होता.


ई) रसायनशास्त्र: हा विषय सुद्धा भौतिकशास्त्राप्रमाणेच आम्हाला १२ व्या वर्गाच्या तुलनेने आम्हाला सोपा वाटत होता.


उ) इंजीनीअरींग ड्रॉईंग: हा विषय आम्हाला पूर्णपणे नव्याने शिकावा लागला होता आणि त्यातही आमची ॲडमिशन उशीरा झाल्याने सुरूवातीच्या ज्या मूलभूत संकल्पना शिकवल्या गेल्यात त्या आम्हाला कळल्याच नव्हत्या. त्यामुळे एखाद्या इमारतीच्या अत्यंत भुसभुशीत पायासारखी आमची या विषयाची अवस्था होती. म्हणायला इमारत तर आहे पण मूलभूत संकल्पनांचा पायाच नसल्याने ती कधीही कोसळून पडेल अशी नाजूक अवस्था.


ऊ) अप्लाईड मेकॅनिक्स: हा विषय सुद्धा आम्ही आमच्या आयुष्यात पहिल्यांदात शिकत होतो. आणि हा विषय सुद्धा इंजीनीअरींग ड्रॉईंग प्रमाणे मध्येच शिकावा लागत असल्याने या सुद्धा विषयासंबंधी आमच्या मूलभूत संकल्पना नव्हत्याच. नंतर कळले की अभियांत्रिकी शाखेच्या पहिल्या वर्षाच्या निकालात सगळ्याच विद्यापीठांमध्ये हा विषय मुख्य खलनायकाची भूमिका बजावत असतो. 


शिवाजी विद्यापीठात त्यावेळी अंतर्गत गुण आणि सत्रांत परिक्षांचे गुण असे वेगवेगळे नसत. नागपूर विद्यापीठात शिकत असणा-या आमच्या मित्रमंडळींना वर्षभराच्या मेहेनतीचे २० गुणांचे अंतर्गत मूल्यमापन व्हायचे आणि सत्रांत परिक्षांमध्ये फ़क्त ८० गुणांची परिक्षा द्यावी लागत असे. त्यामुळे इकडे अंतर्गत गुणांमध्ये २० पैकी १७, १८, १९ किवा २० गुण मिळवलेत की तिकडे सत्रांत परिक्षांमध्ये पास होण्यासाठी ८० गुणांपैकी अनुक्रमे २३, २२, २१ किंवा २० च गुण पुरेसे ठरत असत. शिवाजी विद्यापीठात तसे नव्हते. अंतर्गत मूल्यमापन हा घटकच नव्हता. सगळी मदार १०० गुणांच्या सत्रांत परिक्षांवर. त्यात किमान ४० गुण मिळवावेच लागत. (ही ४० गुणांची गोष्ट सुद्धा मला २९/११/१९८९ या दिवशीच पहिल्यांदा कळली. तो खुलासा योग्य त्या ठिकाणी येईलच.)

 

आमचे शिवाजी विद्यापीठ परिक्षांचे वेळापत्रक आणि निकाल यांच्याबाबत किती काटेकोर होते याबाबतचे विवेचन मी इथे  केलेले आहे.  


आमची सत्रांत परिक्षा दिनांक २७/११/१९८९ ला सुरू झाली. पहिलीच वेळ होती की घरून आईवडीलांचा आशिर्वाद वगैरे न घेता मी परिक्षेला निघालेलो होतो. पहिला पेपर इंग्रजीचा होता आणि चांगलाच गेला. आम्ही आमच्या दुस-या पेपरच्या तयारीला लागलोत. दुसरा पेपर गणिताचा होता. आणि आमच्या रूमवर आमच्या अभ्यासाच्या तयारीवर, आत्मविश्वासावर सतत विरजण घालणारा रूम पार्टनर होताच. आधीच त्याविषयाची अपुरी तयारी आणि आहे त्या आत्मविश्वासावर पडणारे सततचे हे विरजण यामुळे आमचा आत्मविश्वास अगदी तळाशी पोचलेला होता.


२९/११/१९८९: सकाळी ९.३० ला गणिताचा पेपर सुरू झाला. परिक्षाकेंद्र आमचेच महाविद्यालय होते. जशी स्वतःला जमतील. आठवतील तशी मी गणिते सोडवीत होतो. १२ व्या वर्गाच्या परिक्षेत गणिते सोडवून १०० पैकी ९५ ते १०० गुण मिळविण्याचा आत्मविश्वास मात्र त्या परिक्षा हॉलमधल्या आमच्या कुणाचाच नव्हता हे नक्की.


दुपारी १२.३० ला पेपर आटोपून रूमवर परतलो. पेपरमध्ये किती मार्क्स मिळतील याची टोटल स्वतः स्वतःशीच केली. माझ्या अंदाजाप्रमाणे मला ३७, ३८ गुण मिळायला हरकत नव्हती. तोपर्यंत मला वाटत होते की इतर सगळ्या परिक्षांसारखे अभियांत्रिकीतही १०० पैकी ३५ गुण म्हणजे पास. अभियांत्रिकीत पासिंगसाठी कमीतकमी ४० गुण लागतात ह्या वस्तूस्थितीपासूनसुद्धा मी अनभिज्ञ होतो.


मेसमध्ये जेवण करून रूमवर परतल्यानंतर नेहेमीप्रमाणे आमच्या त्या विरजणाने आमची झाडाझडती घ्यायला सुरूवात केली. मी सांगितले की मी या विषयात काठावर का होईना पास होईन. मला ३७, ३८ गुण मिळतील असे वाटते. हे ऐकल्यावर त्याच्या वाणीला आणि निर्भत्सनेला अधिकच जोर आला. "अबे, तेरेको ४० मार्क्स पासिंगके लिये लगते है इतना भी नही पता, तू क्या पास होगा बे ? तू क्या इंजीनीअर बनेगा बे ? तू तो डी सी ही हो जायेगा." (या संभाषणात प्रत्येक वाक्याच्या सुरूवातीला आणि शेवटी हॉस्टेलला राहणा-या मुलांच्या तोंडात असतात तसल्या शिव्या. तबियतदार तज्ञांनी त्या ओळखून तिथे तिथे शिव्या टाकून घ्याव्यात.) 


हे ऐकल्यावर माझा आजवरचा आशेचा क्षीण बांधसुद्धा कोसळला. आपण काहीही करू शकत नाही. आपण साधी एक परिक्षासुद्धा पास होऊ शकत नाही. आपल्या आईवडीलांची आपल्याविषयीची स्वप्ने आपण चक्काचूर केलेली आहेत असे अनेक निराशाजनक विचार मनात एकदम आलेत. मी खोल खोल नैराश्यात गेलो. त्या नैराश्यातच "आता आपण हे इंजिनीअरींगचे शिक्षण पूर्ण करू शकत नाही. घरी परत जाऊयात." या अत्यंत घातक विचाराने मनात उचल खाल्ली आणि मी माझी बॅग भरायला घेतली. एव्हाना दुपारचे २ वाजत होते. नागपूरला जाणारी महाराष्ट्र एक्सप्रेस दुपारी ४.००, ४.३० ला कराडवरून निघणार होती. मला तिथे थांबणे असह्य झाले होते. बहुतेक सगळ्या सामानाची गठडी वळून मी हॉस्टेलच्या बाहेर पडलो. स्टेशनवर जायला. मला स्टेशनपर्यंत सोडायला माझे दोन्हीही रूम पार्टनर्स माझ्यासोबत निघालेत. आम्हा तिचांची ही वरात महाविद्यालय परिसरात एका टोकाला असलेल्या आमच्या हॉस्टेलपासून महाविद्यालय परिसराच्या प्रवेश / निर्गम दारापर्यंत निघाली. तिथून रिक्षा करून आम्ही कराड स्टेशनवर जाणार होतो आणि तिथून मी अभियांत्रिकी शिक्षणाला रामराम करून कायमचा नागपूरला. नागपूरला गेल्यावर या शिक्षणाऐवजी काय करायचे ? आई वडीलांना असे अर्धवट शिक्षण सोडून आल्यावर काय वाटेल ? कशा कशा विचार डोक्यात त्यावेळी नव्हता. हे हॉस्टेल सोडून लगोलग नागपूरपर्यंत जाण्याचा अविचारच मनावर ताबा मिळवून होता.


आमची वरात कॉलेज कॅण्टीनसमोरून जात असताना तिथे आमच्या अंतिम वर्षाची काही सिनीयर मंडळी दुपारचा चहा वगैरे पीत बसलेली होती. त्यात आमचा त्यावर्षीचा कॉलेज जी. एस. असलेला भट्टा उर्फ़ टी. व्ही. एस. भट्टात्रिपाद सुद्धा होता. मी आमच्या फ़्रेशर्समध्ये काही नकला, काही गाणी वगैरे सादर केल्यामुळे तो मला ओळखत होता. परिक्षांच्या काळात असे कुणी सामानसुमानासह महाविद्यालय परिसरातून बाहेर जाणे ही घटना सर्वथैव अनपेक्षित होती आणि भट्टाच्या अनुभवी नजरेने ती हेरली. त्याने आणि त्याच्यासोबतच्या आमच्या सिनीयर्सनी आम्हाला कॅण्टीनसमोरच थांबवले आणि का जाताय ? कोण जातय ? वगैरे प्रश्नावली सुरू केली.


मी माझ्या अपयशाचा पाढा आणि माझी कैफ़ियत त्याच्यासमोर मांडली आणि माझा अभियांत्रिकी शिक्षणातला रस कसा संपलाय हे त्याला विषद केले आणि म्हणून मी आता सगळे सोडून घरी निघालोय हे प्रांजळपणे सांगितले. त्याने ते सगळे ऐकले आणि सगळ्यात पहिल्यांदा मला स्टेशनवर सोडायला निघालेल्या माझ्या रूम पार्टनर्सवर तो बरसला. आपल्या मित्राला धीर द्यायचे सोडून त्याच्या अशा अविचारात साथ देताना तुम्हाला लाज वाटत नाही का ? वगैरे वगैरे. त्याने त्यांना रूमवर पिटाळले आणि मला घेऊन तो कॅन्टीन्शेजारच्याच एका कट्ट्यावर बसला. माझ्या सामानसुमानासकट, गादीसकट मी पण नाईलाजाने तिथे विसावलो. तो आमच्या महाविद्यालयाचा जी. एस. होता आणि एक आदरणीय सिनीयर होता. त्याचे म्हणणे डावलणे मला शक्यच नव्हते.


मी वारंवार माझा इथला रस कसा संपलाय हे त्याला सांगत होतो तर तो वारंवार "एव्हढी परिक्षा पूर्ण होऊ दे आणि मगच घरी जा" असे मला सांगत होता. दोघांच्या युक्तीवादात तोडगा निघेना तेव्हढ्यात त्याने एक सर्वमान्य तोडगा सुचवला. तो म्हणाला, "बघ, पराग लपालीकर आता परिक्षेसाठी परिक्षा हॉलमध्ये आहे. त्याची परिक्षा संध्याकाळी ५ वाजता संपेल, त्याला तू भेट आणि तो सांगेल तसे कर." हा तोडगा मला पटला. तरीही भट्टाचा माझ्यावर विश्वास बसला नाही. तो माझ्यासोबत त्या कट्ट्यावर संध्याकाळी ५ वाजेपर्यंत बसून राहिला. न जाणो माझा विचार पालटला आणि मी रिक्षा करून स्टेशनवर निघून गेलो तर म्हणून खबरदारीचा उपाय म्हणून आपला अभ्यास टाकून तो माझा सिनीयर माझ्यासोबत तिथे गप्पा मारत बसून राहिला.


कराडला ॲडमिशन मिळाल्यावर सगळ्यात पहिल्यांदा ओळख म्हणून मी नागपूरचाच असलेला, माझ्यापेक्षा दोन वर्षांनी मोठा असलेला आणि महालातला कट्टर संघ कार्यकर्ता असलेल्या पराग लपालीकरची ओळख घेऊन कराडला गेलो होतो. दोनच वर्षात परागने कराडला उत्त्तम जनसंपर्क आणि आपला प्रभाव निर्माण केल्याचे माझ्या लक्षात आले होते. तो तिथला माझा मेंटर होता हे सगळ्यांनाच माहिती होते. तिथल्या संघ वर्तुळात आमचा प्रवेश करवून देणे, विद्यार्थी परिषदेच्या कामात आम्हाला अगदी प्रथम सत्रापासून समाविष्ट करून घेणे आणि मला योग्य ते मार्गदर्शन करणे अशा अनेक महत्वाच्या जबाबदा-या परागने माझ्याबाबतीत पार पाडलेल्या होत्या. त्यामुळे परागचा त्यादिवशीचा पेपर संपल्यानंतर तो जसा बाहेर आला तसे भट्टाने मला त्याच्याकडे सोपवले आणि दुस-या दिवशी असलेल्या स्वतःच्या परिक्षेची तयारी करायला तो हॉस्टेलकडे रवाना झाला.


मग परागने माझा ताबा घेतला. "हे बघ, आजची महाराष्ट्र एक्सप्रेस तर गेलेली आहे. तू आजच्या दिवशी थांब. आपण यावर थोडी चर्चा करू. वाटल्यास तू तुझ्या रूमवर नको जाऊस. हॉस्टेलवर माझ्या रूमवर थांब, काही प्रॉब्लेम नाही. आपण बोलू मग तू ठरव जायचे की नाही तर." वगैरे माझी समजूत घालून तो मला माझ्या बाडबिस्त-यासकट त्याच्या रूमवर घेऊन गेला. त्याची रूम म्हणजे संपूर्ण महाविद्यालयात अत्यंत हुशार आणि हरहुन्नरी रूम म्हणून प्रसिद्ध होती. त्याचा एक रूम पार्टनर म्हणजे संकेत आंबेरकर, उत्कृष्ट खेळाडू, उत्कृष्ट क्वीझपटू आणि अभ्यासात विद्यापीठात कायम पहिल्या पाचात असणारा हुशार विद्यार्थी,. दुसरा रूम पार्टनर म्हणजे अभिनव बर्वे. महाविद्यालयाकडून विद्यापीठाच्या क्रिकेट टीममध्ये सिलेक्शन झालेला अतिशय उत्त्तम क्रिकेट खेळाडू, अतिशय उत्त्तम वक्ता आणि संकेतशी स्पर्धा करणारा अतिशय हुशार विद्यार्थी. पराग लपालीकर म्हणजे त्या दोघांच्याही तोडीचा विद्यार्थी, एक उत्त्तम नट आणि अतिशय उत्त्तम संघटक. हे तिघेही सगळ्या महाविद्यालयात अतिशय लोकप्रिय होते. 


परागच्या रूमवर गेलो खरा पण मानेवर वेताळ बसलेला असतानाही हट्ट न सोडणा-या राजा विक्रमादित्याप्रमाणे मी आपला नागपूरला परतण्याचा हेका सोडला नाही. एक दिवसाच्या सुट्टीनंतर दुस-या दिवशी माझा पेपर होता. भौतिकशास्त्राचा. पण मी ढिम्म अभ्यासच करत नव्हतो. परागच्या रूममधले माझे सगळे सिनीयर्स पुढच्या पेपरच्या तयारीला लागले पण त्या रात्री मी ढिम्म पुस्तक उघडले नाही आणि झोपी मात्र गेलो. माझ्या हटवादी मनाला समजून माझी समजूत घालण्याचा आणि मला "अभ्यास कर" म्हणण्याचा अजिबात प्रयत्न न करण्याची प्रगल्भता परागने आणि त्याच्या दोन्हीही रूम पार्टनर्सने दाखविली.


दुस-या दिवशी उठल्यावर पराग हळूच म्हणाला, "थांबलाच आहेस तर भौतिकशास्त्र आणि रसायनशास्त्राचे पेपर्स देऊनच जा नं. तसे हे पेपर्स १२ व्या वर्गाच्या पेपर्सपेक्षा सोपे असतात. बघ म्हणजे." मला तो विचार पटला. हे दोन पेपर्स देऊन मग आपण नागपूरकडे निघू हे मी मनाने ठरविले. परागची परवानगी घेऊन माझ्या 007 रूमवर परतलो. तोपर्यंत माझी अवस्था जाणून परागने आणि इतर सिनीयर्सनीही माझ्या त्या विरजण घालणा-या आणि कायम हिणवणा-या रूम पार्टनरला चांगला दम भरला होता त्यामुळे उरलेले दिवस तो माझ्या वाट्याला फ़ारसा गेला नाही.


भौतिकशास्त्र आणि रसायनशास्त्राचे पेपर्स चांगले गेलेत. आता काय उरलेले दोनच पेपर्स. ते तर तीन दिवसांत संपतीलच. मग काय सगळ्यांनीच आपापल्या घरी जायचय हा विचार मनात आला आणि मी उरलेले ते दोन्हीही पेपर्स देऊन ८ डिसेंबरला सगळ्यांच्याच सोबत घरी परतायचे ठरवले. हॉस्टेलला असताना शेवटले एक दोन पेपर्स उरलेत की आमची घरी परतण्याची ओढ इतकी शिगेला पोचत असे की आमच्या सामानाचे पॅकींग वगैरे आम्ही दोन दिवस आधीपासूनच करून ठेवत असू. अगदी अंगावरच्या शर्ट पॅंटसह तसेच दोन दिवस वावरत असू. आणि दुपारी १२.३० ला शेवटचा पेपर आटोपला की पटापट जेवून दुपारी २ वाजताच कराडच्या स्टेशनवर जाऊन आमच्या महाराष्ट्र एक्सप्रेसची वाट बघत बसत असू. शेणोली स्टेशनच्या बाजूने कराड स्टेशनकडे येताना रेल्वेमार्गाला एक चढाव होता. त्या चढावावर धूर सोडत, धापा टाकत चढत असलेले महाराष्ट्र एक्सप्रेसला लागलेले डिझेल एंजिन बघणे हे आम्हा सर्वांचे सर्वात आवडते दृश्य होते.


त्याप्रमाणे मी घरी, नागपूरला परतलो. घरी प्रांजळपणे सगळा प्रकार सांगितला. हा सत्रात गणित, ड्राइंग आणि मेकॅनिक्स हे तीन विषय बॅक राहू शकतात याचीही कल्पना दिली. घरच्यांनी परिक्षा सोडून परतण्याच्या निर्णयाबद्दल थोड्या कानपिचक्या दिल्यात आणि मला तिथे सहाय्य केल्याबद्दल परागचे मनापासून आभार मानलेत. आणि पुढल्या सत्रात पहिल्यापासून चांगला अभ्यास करून त्या सत्राचे आणि ह्या सत्रात कदाचित बॅक राहिलेत तर या सत्राचे असे विषय काढून टाक, नक्की निघतील, काळजी करू नको असा धीरसुद्धा दिला.


जानेवारी १९९० च्या पहिल्या आठवड्यात आम्ही दुस-या सत्रासाठी पुन्हा कराडला पोचलो. जुने नैराश्य झटकून, नव्या दमाने, नव्या आशेने. पहिल्या सत्राचा आमचा निकाल लागला आणि काय आश्चर्य ! ज्या गणित विषयात मला ३७, ३८ गुण मिळतील असा अंदाज होता त्यात मला तब्बल ४८ गुण होते आणि मेकॅनिक्समध्ये तर १०० पैकी ७० गुण मिळाले होते. मी चक्क फ़र्स्ट क्लास मिळवून पास झालो होतो. ताबडतोब तार करून ही आनंदाची बातमी घरी कळविली. सोबतच गुणपत्रिकेची कॉपी करून एका पत्राद्वारे घरीही पाठविली. त्यादिवशी आमचा टॉपर असलेल्या मुलांपेक्षा माझ्यावर अभिनंदनाचा वर्षाव जास्त झाला. परिक्षा कठीण गेली म्हणून अर्धवट शिक्षण सोडून परत निघालेल्या मुलाला त्याच परिक्षेत प्रथम वर्ग मिळाला होता. त्याचे स्वतःविषयीचे एकंदर आकलन किती नैराश्यपूर्ण होते याचा धडा त्याला मिळाला. कोणी कितीही हतोत्साहित केले तरी स्वतःवर, स्वतःच्या नैसर्गिक आणि प्रयत्नांनी सिद्ध केलेल्या क्षमतांवर स्वतःचा विश्वास पाहिजे हा धडा त्याला मिळाला होता. बहुतांशी हिंदी सिनेमांप्रमाणे या प्रकरनाचा शेवटही गोड झाला होता. 


सगळ्यात कहर म्हणजे "अभ्यास कसा करावा ?" याचे कायम डोस पाजणा-या आणि "तुम्ही नापासच होणार" अशी भविष्यवाणी करणा-या त्या विरजणाला मात्र या परिक्षेत कसाबसा सेकंड क्लास मिळवता आला होता. त्याचे भवितव्य त्याला अधिक भेडसवायला लागलेले होते कारण त्या काळी आमच्या महाविद्यालयात कॅम्पस प्लेसमेंटला येणा-या टेल्को, एल. ॲण्ड टी. सारख्या चांगल्या कंपन्या विद्यार्थ्यांकडून सगळ्या सेमिस्टर्समध्ये फ़र्स्ट क्लासची अपेक्षा करीत असत. एका सेमिस्टरमध्ये मिळवलेला सेकंड क्लास त्यांना चालत नसे. मग उरलेले सत्र या विरजण महाशयांनी आमच्याशी अभ्यासाबाबत पंगा घेतला नाही. आणि दुस-या सत्रातही आम्ही फ़र्स्ट क्लास तर मिळवलाच आणि डिस्टींक्शनच्या भोज्याला हात लावून थोडक्यात परतलो.


२९/११/१९८९, माझ्या जीवनातला एक अत्यंत महत्वाचा दिवस. मला इंजीनीअरींगच्या ट्रॅकवर ठेवणारा, माझा क्षणैक अविचार हाणून पाडणारा, मला माझे करियर देणारा एक अत्यंत महत्वाचा दिवस. या दिवशी भट्टात्रिपाद तिथे नसता, परागने मला समजून घेतले नसते, त्याच्या रूम पार्टनर्सनी मला सहाकार्य केले नसते तर माझे काय झाले असते ? या विचाराने आजही माझ्या अंगावर काटा आणणारा दिवस. माझ्या त्या सगळ्या सिनीयर्सशी जीवनभराची कृतज्ञता बाळगण्याचा हा दिवस. मला प्रौढ, प्रगल्भ करणारा महत्वाचा दिवस.


- त्या प्रसंगानंतर माणसांना अधिक चांगल्या पद्धतीने समजून घेणारा आणि हतोत्साहित करण्यापेक्षा माणसांना कायम धीर देता आला पाहिजे या दृढ समजुतीचा प्रा. वैभवीराम प्रकाश किन्हीकर


शनिवार, २१ जून२०२५


नागपूर


#सुरपाखरू


#३०दिवसात३०


#जून२०२५


Friday, June 20, 2025

मैत्र जिवाचे

परवा आमच्या घराजवळच्या मदर डेअरीतला मुलगा आपल्या कुटुंबियांसोबत गोव्याला जाऊन आला. तो मुलगा त्या आऊटलेटमध्ये असला की हिशेब वगैरे भराभर होतो, नवीन आलेले प्रॉडक्टस वगैरे कळतात, दोन चार इकडल्या तिकडल्या गप्पा होतात. तो मधला आठवडाभर नव्हता तेव्हा तिथे जे गृहस्थ होते त्यांना ते या आऊटलेटमध्ये नवखे असल्याने हिशेबातच इतका वेळ लागायचा की अवांतर गप्पांसाठी आमच्याकडे वेळच नसायचा कारण त्या वेळात आऊटलेट बाहेर गि-हाईकांची रांग लागायची. आणि गप्पा सुरू ठेऊन त्यांना ताटकळत ठेवणे हे माझ्या स्वभावाला पटत नाही.


परवा तो मुलगा परतल्यानंतर त्याला त्याचा प्रवासमार्ग विचारला. हो, ही एक माझी सवय आहे. कुणीही कुठल्याही प्रवासाला जाणार असेल किंवा जाऊन परत आला असेल तर त्याला मी त्याचा प्रवासमार्ग, प्रवासाची साधने वगैरे सविस्तर विचारतो. माझ्या आप्त सुहृदांना हा माझा "प्रवासी पक्षी" पणा माहिती आहे म्हणून बरे, नाहीतर एखाद्या नवख्या माणसाला हा उगाचचा भोचकपणा वाटणे अगदी शक्य आहे. पण या माझ्या मोकळ्या स्वभावामुळेच अनेक विविध क्षेत्रातली आणि विविधरंगी माणसे माझ्याशी जोडली जातात हे सुद्धा तितकेच खरे. माणसाला जेव्हा पुढच्या माणसाचा शुद्ध हेतू कळतो तेव्हा त्या दोघांमध्ये मैत्र प्रस्थापित होते. आजवरच्या माझ्या आयुष्यात माझ्या सरळ स्वभावामुळे असे अनेक समस्वभावी मैत्र मी जोडले. 


अर्थात या सरळ स्वभावाचा फ़ायदा घेणारी, या सरळ स्वभावाला हिणवणारी मंडळी सुद्धा भेटलीत बरं का, नाही असे नाही. माझ्या सरळ स्वभावाला "बावळटपणा" समजून मला दूर करणारी मंडळी त्यात होती तशीच त्या स्वभावाचा आपल्याला काही फ़ायदा करून घेता येतो का ? या माणसाला तेव्हढ्यापुरते वापरून फ़ेकून देता येते का ? याचा अदमास घेणारी आणि तशी वागणारीही मंडळी भेटलीतच. अर्थात जोडलेल्या मैत्रांपेक्षा अशा व्यक्तींची संख्या अगदीच नगण्य होती आणि अशा प्रत्येक व्यक्तीने मला जीवनात एक नवीन आणि अनमोल धडा शिकवला, अगदी मोफ़त. आणि मला या सगळ्यांमध्येही सगळ्यात हर्ष होणारी गोष्ट हीच होती की या सगळ्यांना माझ्या स्वभावातला साधेपणा जाणवला आणि त्यांच्या मनापासून पटला म्हणून तर त्यांनी त्याचा फ़ायदा करून घेतला किंवा फ़ायदा करून घेण्याचा प्रयत्न केला. आपले व्यक्तीमत्व इतके पारदर्शी आहे की ते सर्व प्रकारच्या लोकांनी ओळखलेले आहे या जा्णीवेसारखे दुसरे सुख नाही.


आपणही थोडा खोलवर विचार केला तर आपल्या लक्षात येईल की आपल्यासारखीच मनुष्य सहवासाला, मैत्राला आसुसलेली अनेक माणसे आपल्या आसपास अहेत. दोन पैशांचे घेणे देणे नसतानाही त्यांचे आणि आपले निखळ मैत्र जुळू शकते. फ़क्त समोरची व्यक्ती ही आपल्यासारखीच एक व्यक्ती आहे, तिचेही मन आपल्यासारखेच आहे असा विश्वास आपल्या मनात ठेवूनच त्या व्यक्तींशी व्यवहार करत गेला पाहिजे. यात मी वर वर्णन केल्याप्रमाणे काही काही ठिकाणी आपल्या मनाशी न जुळणा-या, आपल्या अगदी विरूद्ध मनोवृत्त्ती असणा-या व्यक्ती भेटतीलही. पण अशा व्यक्ती कमीच आहेत आणि त्या व्यक्ती सुद्धा आपल्याला जीवनात एखादा धडाच शिकवून जातील. माणसे ओळखण्याचा, पारखण्याचा. म्हणजे त्या सुद्धा जाताना आपल्यावर उपकारच करून जातील.


व.पु.काळे म्हणतात "नाटकाच्या पंधराव्या रांगेत एकमेकांशेजारी बसलेल्या दोन अनोळखी माणसांनी एकमेकांना इतके का लाजायचे ? इतके का परक्यासारखे करायचे ?" खरेच आहे ते. एकाच नाटकाला येताय म्हणजे सांस्कृतिक पातळी, सांस्कृतिक आवडीनिवडी ब-याचशा सारख्या असल्या पाहिजेत, एकाच रांगेचे तिकीट काढताय म्हणजे आर्थिक पार्श्वभूमी सुद्धा जवळपास सारखी असली पाहिजे. मग उगाच शिष्टपणा, इतरांविषयी अनेक प्रकारचे ग्रह का करून घ्यायचे ? "मीच तेव्हढा शहाणा, मीच तेव्हढा तत्वांवर चालणारा, मीच तेव्हढा उच्च अभिरूचीचा" असे ग्रह मनात घेऊन आपण जगात वावरलोत की आपण जगात खरोखर एकटे पडू. याउलट आपले सामर्थ्य, आपले गुण अवगुण ओळखून इतर जगातली माणसेही माझ्याप्रमाणेच आहेत अशा भावनेने आपण जगात वावरलोत तर आपल्यासारखीच अनेक समानधर्मी माणसे आपल्याला भेटलीत आणि आपले जीवन आनंदमय होईल. 


शेवटी तुमची माझी या जगातली धडपड आपले जीवन आनंदमय होण्यासाठीच आहे, नाही का ? "शेवटला दिवस गोड व्हावा" यासोबतच जगलेला प्रत्येक दिवस आनंदमय व्हावा यासाठीही आपली सगळी धडपड आहे. एकदा स्वतःच्या मनाला शांतपणे विचारून तर बघा की आपल्या जीवनाचे अंतिम उद्दिष्ट काय आहे ? बहुतेक सगळ्यांचे "रोज आनंदाने जगणे" हेच उत्त्तर येईल याचा मला आत्मविश्वास आहे. आपल्या उपनिषदांमध्येही "सर्वे भद्राणि पश्यन्तु" अशीच प्रार्थना आहे ना ?




- पटकन कुणाशीही मैत्र जुळणारा, मनमोकळा, प्रा. वैभवीराम प्रकाश किन्हीकर


शुक्रवार, २० जून २०२५


नागपूर


#सुरपाखरू


#३०दिवसात३०


#जून२०२५


Thursday, June 19, 2025

व्योमातून उडताना ओढीतसे मज घरटे

कवी कुसुमाग्रजांची एक कविता आहे.

 

व्योमातून उडताना ओढीतसे मज घरटे, 

अन उबेत त्या घरट्याच्या क्षुद्र तेच मज गमते.


एखादा कवी, एखादा लेखक असा सार्वकालिक होत असतो की त्याच्या लिखाणाचे संदर्भ हे त्या त्या काळाशी जोडलेले नसतात तर ते मानवी वृत्त्तीशी, मानवी स्वभावाशी, मानवी क्रिया प्रतिक्रियांशी जोडलेले असतात. आणि जगात जोपर्यंत मानवजात आहे तोपर्यंत त्यांच्या वृत्त्ती, त्यांचे स्वभाव, त्यांच्या क्रिया प्रतिक्रिया या सारख्याच असणार. म्हणूनच या मानवी स्वभावाचा अभ्यास करून लिहीलेले एखादे "वाडा चिरेबंदी" सारखे नाटक आजही आपल्याला आपल्या घरीच घडणारी घटना म्हणून बघाविशी, चिंतन कराविशी वाटते. वाडा संस्कृती आज कालबाह्य झाली असली तरीही एखाद्या कुटुंबामधले नात्यांचे पीळ, नात्यांची वीण, ती उसविण्याची कारणे हे आपण आपल्या आजूबाजूला, कदाचित आपल्या घरी सुद्धा सतत बघत असतो. आणि म्हणून ते नाटक कुठेतरी आपल्या मनाला भिडते.


अशा अनेक कलाकृती आहेत. बरेचसे सिनेमे आहेत. विस्तारभयास्तव त्यांचा उल्लेख इथे टाळतो. पण कुसुमाग्रजांची उपरोल्लेखित कविता मात्र अशाच मानवी वृत्त्तीचे आरस्पानी दर्शन देणारी आहे. (व्वा ! ब-याच दिवसांनी "उपरोल्लेखित" आणि "आरस्पानी" हे शब्द लिखाणात आले. अगदी विद्यापीठात मराठी भाषेचे प्राध्यापक झाल्यासारखे वाटले.)


आज जी पिढी चाळीशी किंवा पन्नाशी पार केलेली आहे त्यांना या माझ्या विधानाचा तत्काळ प्रत्यय येईल. आपल्या बालपणी बहुतांशी घरे अंगणे यांच्या भिंती, जमिनी मातीच्या असायच्या. त्यांचे पोपडे निघायचेत. मातीचे फ़्लोरिंग दर आठवड्याला शेणाने सारवावे लागे आणि अंगणात आठवड्याला शेणसडा टाकावा लागे. भिंतींना दरवर्षी एकदा तरी मातीचा गिलावा करून रंगवावे लागे. आमच्या कडे गणपती महालक्ष्म्यांआधी भिंती रंगवीत असत. बहुतांशी घरी दस-या नंतर दिवाळी आधी हे रंगकामाचे प्रकरण चालायचे. दर आठवड्याला जमिन सारवायचा अगदी कंटाळा यायचा. ते गोठ्यातून शेण आणा, बादलीत कालवा आणि जमीन सारवा. वैताग यायचा. केव्हा एकदा हे घर सोडून छान फ़रशी घातलेल्या किंवा सिमेंटचा गिलावा केलेल्या घरात आपण जातोय असे व्हायचे. फ़्लोरिंगला मार्बल असलेली घरे तेव्हा फ़क्त हिंदी सिनेमांमध्येच दिसायची आणि आपण कधीतरी असल्या घरांमध्ये रहायला जाऊ हे आमच्या कधी स्वप्नातही आले नव्हते. मग आजसारख्या मार्बोनाईट वगैरे व्हिट्रीफ़ाईड टाईल्स तर गोष्ट दूरचीच. असे काही येईल याची कल्पनाही कुणाला नव्हती.


गेल्या २० - २५ वर्षांमध्ये या नवनवीन आणि सहज साफ़ करता येऊ शकणा-या गुळगुळीत टाईल्सवर आपण सहज वावरतोय. इतवारीतून किराणा आणावा इतक्या सहजतेने घराला इटालियन मार्बल चे फ़्लोरिंग बसवतोय. पण नंतर लक्षात येतय की हिवाळ्यात या फ़्लोरिंगवर उघड्या पायांनी चालणे तर सोडाच हे फ़्लोरिंग लावलेल्या खोलीत बसणेसुद्धा अशक्य व्हावे, इथे बसल्यावर एखाद्या शीतगृहात बसल्यासारखे वाटावे इतका या फ़्लोरिंगचा प्रताप आहे. मग काय मोजे, घरात घालायच्या सपाता (हा शब्दही फ़ार दिवसांनी भेटला आणि उपयोगात आणला.) घालूनच आपण घरात वावरतोय आणि खास डॉक्टरांच्या सल्ल्याने, एखाद्या वास्तूतज्ञाच्या सल्ल्याने घराबाहेर चार फ़ूट बाय चार फ़ूटाचा चौकोन मुद्दाम टाईल्स न लावता तसाच ठेवलाय. रोज तिथे जाऊन सहज जमिनीला पाय टेकवून आपले अर्थिंग करून येतोय. ती जागा दर आठवड्याला सारवण्यासाठी शेण आणतोय आणि ती जागा स्वछ ठेवण्यासाठी रोज तिथे सडा रांगोळी वगैरे करतोय. "व्योमातून उडताना ओढीतसे मज घरटे"


आमच्या बालपणी आमची आई, मावश्या, माम्या या दर आठवड्यात कुठल्या ना कुठल्या वारी उपवास धरायच्याच. शेगावच्या गजानन महाराजांसाठी म्हणून गुरूवार तर बहुतेक घरी असायचाच. सकाळी जेवण करून घेऊन संध्याकाळी फराळाला उसळ असायची. (विदर्भाच्या हद्दीबाहेर जिला साबुदाण्याची खिचडी म्हणतात ती उसळ. किंबहुना ज्या जागेपासून तिला साबुदाण्याची खिचडी म्हणायला सुरूवात होते ती विदर्भाची हद्द हा आमचा पक्का खाद्यसांस्कृतिक भुगोल. किंबहुना उपवासाच्या दिवशी "खिचडी खाल्ली" असे म्हटल्यावर देखील ज्याचा उपवास मानसिकरित्या मोडल्या जातो तो खरा वैदर्भिय माणूस. हे आमच्या वैदर्भिय माणसांचे व्यवच्छेदक लक्षण. असो, मूळ मुद्दा तो नाही.)


त्याकाळी सर्वसामान्य मध्यमवर्गीय घरांमध्ये ही उसळ करायला सरसकट वनस्पती तूप (डालडा) वापरले जाई. प्रत्येकाच्या वाट्याला ही उसळ थोडीथोडीच (वाटीभर वगैरे) यायची. खूप सुबत्त्ता नव्हती. महिन्याभरासाठी एखाद्या चौकोनी कुटुंबात एखादा किलो शेंगदाणे आणि अर्धा किलो साबुदाणा असा किराणा येत असे आणि तो महिनाभर पुरवावा लागे. त्यामुळे आम्ही बाळगोपाळांनी ती अप्रतिम चवीची उसळ खाण्याकरिता दंगा केला की "अरे, तिला उपास आहे, तिला खाऊ देत भरपूर. तुमचे लेको आताच जेवण झाले ना." वगैरे दटावणी घरातल्या वडिलधार्‍यांकडून मिळायची सुध्दा. पण खरं सांगतो त्या वाटीभर (द्रोणभर) उसळीची चव इतकी अप्रतिम असायची की ती उसळ संपूर्ण कढईभरही आपण खाऊ शकतो हा आमच्यातल्या सगळ्या बाळगोपाळांना आत्मविश्वास असे. वाटीभर उसळ खाऊन मन आणि पोट दोन्हीही भरत नसत. पुढल्या गुरूवारी तशी उसळ घरी कधी होतेय ? याची वाट आम्ही बघत असू. ती आस, तो ध्यास आम्हाला आमच्या त्या आठवड्यातल्या इतर घडामोडींमध्ये बळ पुरवीत असे.


बाकी या उसळीची खरी चव म्हणजे पळसाच्या पानांच्या द्रोणातच (वैदर्भिय भाषेत 'डोन्या'तच) असे माझे स्पष्ट मत आहे.

आज तेच आमचे मध्यमवर्गीय जीवन आपापल्या विद्यावैभवाच्या बळावर लक्ष्मीमाता प्रसन्न करुन घेऊन स्थिरावले आहे. उच्च मध्यमवर्गीय, श्रीमंत झालेले आहे. आता उसळीसाठी चांगले साजूक तूप वापरण्याची ऐपत मध्यमवर्गीय घरांमध्ये आलेली आहे. प्रत्येकाला त्याचे पोट आणि मन भरेस्तोवर अशा उसळी करता येतील इतपत ऐपत आणि मने विस्तारलेली आहेत. पण आज आमच्या बालपणची ती चव हरवली आहे हे माझे निरीक्षण आहे. आज वाटीभर उसळ सुद्धा कधीकधी खाऊ शकत नाही अशी परिस्थिती आहे. त्यात त्या उसळीची चवच हरवलीय ? की कुसुमाग्रजांच्या "उबेत त्या घरट्याच्या क्षुद्र तेच मज गमते" ओळींसारखे असे होते आहे ? ह्याचा विचार आज खरोखर करावासा वाटतोय ना ?


मी ही अशीच दोन उदाहरणे दिलीयत. आपल्यालाही असे अनेक अनुभव आलेले असतील. ते कॉमेंटमध्ये लिहा. बहुधा "आमच्या वेळी" किंवा "आम्ही तरूण होतो ना" वगैरे ओळी आपल्या लिहीण्याबोलण्यात आल्या की आपल्याला लोकं "हा लेकाचा आता म्हातारा झाला, आता जास्त नॉस्टॅल्जियामध्ये रमतोय" वगैरे बोलतील की काय ? अशी उगाचच भिती वाटायला लागते पण एका मेंदूतज्ञ डॉक्टरांच्या मते अशा जुन्या आठवणींमध्ये रमणे म्हणजे आपल्या मेंदूला पूर्णपणे आणि अधिक कार्यक्षमरित्या वापरणे होय. जुन्या स्मृती ज्या मेंदूच्या कप्प्यात साठवल्या गेल्या आहेत त्यांच्यापर्यंत असे मध्येमध्ये आठवणींच्या द्वारे रमणे म्हणजे मेंदूचा तो भाग अजूनही वापरात आणणे आणि भावी अल्झायमर किंवा डिमेन्शिया पासून आपल्या मेंदूचे आपणच रक्षण करणे होय. मग आठवा तुमच्या बालपणीच्या अशा गोष्टी ज्या तुम्हाला बालपणी फ़ार आवडत नव्हत्या किंवा त्यातून सुटका होण्यासाठी तुम्ही प्रयत्न करीत होतात आणि आज त्यातून तुम्ही मोकळे झालायत तर तुम्हाला त्या एकेकाळी नको वाटणा-या गोष्टींचीच ओढ लागलीय.

- नॉस्टॅल्जियात रमणारा म्हातारा, प्रा. वैभवीराम प्रकाश किन्हीकर


गुरूवार, १९ जून २०२५


नागपूर


#सुरपाखरू


#३०दिवसात३०


#जून२०२५

Wednesday, June 18, 2025

आग्रह विपरीत फ़ळ देई

२४ मे २०१४. नागपूर इथला जवळपास चार दिवसांचा मुक्काम आटोपून आम्ही आमच्या कामाच्या गावी सांगोल्याला निघालोय. उन्हाळी सुट्या आणि इतरही काही प्रासंगिक कार्ये नागपूर आणि चंद्रपूर येथे होती. ती आवरून आम्ही परत आमच्या निवासस्थानी सांगोल्याला जायला निघतोय.


सांगोला जिल्हा सोलापूर आणि शिरपूर जिल्हा धुळे येथे माझे नोकरीनिमित्त्त मधली ५ वर्षे वास्तव्य होते. नागपूर या शहरावर, इथल्या सगळ्या नातेवाईकांवर भारी प्रेम त्यामुळे सुट्यांमध्ये इथे आलो की इथे सगळ्या नातेवाईकांच्या भेटीगाठी अगदी आवर्जून घेणे आणि त्यानिमित्त्ताने माझ्या नागपूर शहरात काय काय आणि कसे कसे बदल होताहेत ते सुद्धा बघणे, टिपून घेणे अशी आस मला लागायची. आपण नोकरीनिमित्त्त ६०० - ७०० किलोमीटर्स दूर असतो. सगळ्या नातेवाईकांच्या सुखदुःखाच्या सगळ्याच प्रसंगात आपण मुद्दाम येऊन हजर राहू शकत नाही यानिमित्त्ताने सगळ्यांना भेटून होईल आणि चार सुखदुःखाच्या गोष्टी एकमेकांसोबत वाटून घेता येतील हा त्या आवर्जून भेटींमागचा उद्देश. तसाच यावेळेसच्या नागपूर भेटीतही आम्ही दिवसभर इकडून तिकडे फ़िरत भेटीगाठी घेत होतो.


"राखावी बहुतांची अंतरे" ह्या श्रीसमर्थउक्तीवर माझा फ़ारच विश्वास. कुणाचे मन मोडणे माझ्या सहसा जिवावर येते. या भेटीतही प्रत्येक आप्त सुहृदांकडे काही ना काही खाण्यापिण्याचा आग्रह होतच होता. कुणाकडे उन्हाळ्यासाठी करून ठेवलेला चिवडा, कुणाकडे दुपारी मधल्या वेळेत खायला केलेली मटकीची उसळ, कुणाकडे नुसताच चहा तर अशाच कुणाकडे आंब्याचे पन्हे अशा विविध पदार्थांनी पोट तुडुंब भरले. आणि ज्या आप्तांकडे आम्ही मुक्कामाला होतो त्यांच्याकडे यजमानांसोबत रात्रीचे जेवण म्हणून थोडे फ़ोडणीचे वरण भात हे वरून झालेच.


नागपूर ते सांगोला आमच्या कारने प्रवासाचे आमचे साधारण वेळापत्रक असे असायचे. पहाटे ३ - ३:३० ला उठून भरभर आवरायचे. आणि पहाटे ४, ४:३० पर्यंत प्रस्थान ठेवायचे.  मला रात्री अंधारात गाडी चालवायला अजिबात आवडत नाही. पहाटेचा अंधार आणि रात्रीचा अंधार यात फ़ार फ़रक असतो. पहाटेच्या अंधारात क्षणाक्षणाला प्रकाश वाढत असतो आणि आपल्याला अधिक आश्वासक वाटत असते. पण रात्रीला क्षणाक्षणाला गडद होत जाणा-या नकारात्मकतेची किनार असते. किमान एक ड्रायव्हर म्हणून तरी माझी तशी भावना होते. रात्री आपल्या सखीचा हात धरून चांदण्यात निवांत फ़िरणे, त्या फ़िरण्यात एखादी कविता सुचणे, ती तिला ऐकवून तिची दाद घेणे हे अत्यंत रोमॅंटिक आहे. रात्री जवळपासच्याच एखाद्या हॉटेलमध्ये सहकुटुंब जेवायला निघालोय, गाडीवर मालिनीताई राजूरकरांचा मालकंस आणि त्यानंतर बिलासखानी तोडी ऐकतोय, एक शब्दही न बोलता आपले आणि सखीचे मन एकमेकांमध्ये इतके जुळलेय हे सुद्धा अत्यंत रोमॅंटिक आहे हे ही मला मान्य आहे कारण या प्रसंगांचा अनुभव मी अनेकदा घेतलेला आहे, हे प्रसंग जीवनसंगिनीसह खूपवेळा जगलेलो आहे. पण इतक्या लांबचा प्रवास रात्री करणे हे मला खरोखर आवडत नाही. त्यामुळे पहाटे लवकर प्रथान ठेवणे हे मी श्रेयस्कर समजतो.


४:३० च्या आसपास नागपूरवरून निघालोत की मध्ये फ़क्त शरीराच्या हाकेला ओ देण्यासाठी पाचेक मिनिटे, बडने-याला  संत्री खरेदी करण्यासाठी पाचेक मिनीटे आणि आमच्या ठरलेल्या पेट्रोल पंपावर पेट्रोल भरण्यासाठी पाचेक मिनीटे असे छोटे छोटे थांबे घेऊन अमरावती - बडनेरा - कारंजा (लाड) - शेलू बाजार - मालेगाव (जहांगीर) - मेहेकर - सुलतानपूर - सिंदखेडराजा या मार्गाने बरोबर ७ तासांत ४०० किलोमीटर्सचा प्रवास करीत साधारण ११:३० ला देऊळगाव राजा इथल्या "चैत्रबन" ला जेवणासाठी थांबणे. "चैत्रबन" ला मनसोक्त जेवण आणि थोडे हातपाय ताणून दिल्यानंतर तासाभराने तिथून निघून जालना - अंबड - वडीगोद्री - गेवराई - बीड - मांजरसुंबा - वाशी - येरमाळा - बार्शी - कुर्डुवाडी - पंढरपूर मार्गे उरलेले ३५० किलोमीटर्स प्रवास पूर्ण करायला आम्हाला जवळपास आणखी ७ - ७:३० तास लागीत असत आणि संध्याकाळी ६:३० ते ७ च्या सुमाराला आम्ही आमच्या मुक्कामी, सांगोल्याला पोचत असू. उन्हाळ्यात सूर्य जरा लवकर उगवत आणि उशीरा मावळत असल्याने हा सगळा प्रवास बहुतेक उजेडातच पार पडत असे.


तसे प्रवासाचे लेखी नियोजन आदल्या दिवशीच आमच्या कारच्या लॉगबुकमध्ये करून आम्ही प्रवासाला निघत असू. हे नियोजन तयार असले की आपल्याला किती उशीर झालाय किंवा आपण वेळेच्या किती आधी आहोत याचा अंदाज आपल्याला येत असतो आणि नियोजनाच्या मागे पुढे अर्धा तास, पाऊण तास आपण आपले गंतव्य गाठतोच हा माझा तोपर्यंतच्या प्रवासांचा उत्त्तम अनुभव होता. पण आज काहीतरी वेगळेच व्हायचे होते.


वर वर्णन केल्याप्रमाणे आदल्या दिवशी दुपारी आणि संध्याकाळी उशीरपर्यंत इतके वेगवेगळे खाणे झालेले होते. त्यात भर उन्हाळ्यातल्या दुपारी नागपुरात फ़िरणे. त्यात भर म्हणजे रात्री चांगल्या ११, ११:३० वाजेपर्यंत नातेवाईकांशी गप्पांची मैफ़ल रंगवून पहाटे लवकर उठून आवरून निघणे यात आपल्या शरीरावर आपण अन्याय करतोय हे माझ्या लक्षातच आले नाही. आपण आपल्याच शरीरावर असे अनेकदा अत्याचार करतो पण शरीर एका मर्यादेपर्यंत सहन करते आणि एखादेवेळी असा काही फ़टका देते तो फ़टका आज बसायचा होता. सकाळी निघालो खरा पण पोट थोडे गडबड आहे याची जाणीव प्रवासादरम्यान झाली. त्यामुळेच "चैत्रबन" ला नेहेमीप्रमाणे पूर्ण जेवण न करता मी फ़क्त थोडेसे ताक प्यायलो आणि आज दिवसभर लंघन करून संध्याकाळीच जेवण करू असा बेत सुपत्नी आणि सुकन्येला बोलून दाखवला. मी लोकांची मने राखायला स्वतःवर कसा अन्याय करतो आहे यावर या दोघींचे एक छोटेसे लेक्चर पण ऐकले. गोष्ट खरी होती. निमूटपणे लेक्चर ऐकून घेण्याशिवाय माझ्याकडे पर्याय नव्हता.


देऊळगाव राजावरून निघालो खरा आणि २५ किलोमीटर्स अंतर कापून जालना शहरात पोचलो तोच पोटात काहीतरी विचित्र होतेय याची जाणीव झाली. सुरूवातीला वाटले की जालना शहरातल्या बायपासवरील खड्ड्यांमुळे गाडी उसळून पोट डचमळत असेल पण नंतर लक्षात आले की हा काहीतरी वेगळाच प्रकार आहे. जालना औद्योगिक वसाहतीतलया दिसलेल्या पहिल्याच ब-यापैकी हॉटेलच्या बाहेर गाडी थांबवली आणि आत जाऊन अति शीघ्र गतीने रिसेप्शनवर रूमची किल्ली मागितली. गाडी लॉक करणे, गाडीतले सामानसुमान रूमवर आणणे वगैरे जबाबदा-या सहधर्मचारिणी आणि सुकन्येवर सोपवून धावतच रूम गाठली आणि पोट रिकामे करायला धावलो. त्यानंतर काय विचारता राजेहो !  दोन तीनदा उलटी आणि शौचाला जावे लागले आणि लगेच प्रचंड ग्लानीतच मी झोपी गेलो. आजूबाजूचा पूर्ण विसर पडला. अर्धवट बेशुद्धावस्थाच.


संध्याकाळी मी थोडा शुद्धीवर आलो. सहधर्मचारिणी आणि माझी लेक माझ्या उशा पायथ्याशीच बसलेले होते. सचिंत पण खंबीर. तेव्हढ्या वेळात माझ्या सहधर्मचारिणीने सांगोल्याला माझा मित्र आणि आमच्या महाविद्यालयाचा प्राचार्य असलेल्या सतीश ला फ़ोन करून सगळी परिस्थिती निवेदन केली होती. उद्या कदाचित मी गाडी चालवू शकेल न शकेल तर उद्या आम्हाला जालन्यावरून सांगोल्यापर्यंत आमच्याच गाडीत ड्राइव्ह करीत आणण्यासाठी तिथून रात्री एक ड्रायव्हर बसने पाठविण्याचे त्याने ठरविले.


शुद्धीवर आलो. स्वतःला आणि कुटुंबालाही सावरले. आज जालन्यात मुक्काम करतोच आहे तर जालन्यात एका अत्यंत अवतारी सत्पुरूषांच्या दर्शनाला संध्याकाळी जायला आम्ही निघालो. तीव्र ॲसिडीटी आणि भयंकर खवळलेल्या पित्त्तामुळे पोट अक्षरशः रिकामे झालेले होते. त्या सत्पुरूषांच्या आश्रमात त्यांचे दर्शन आणि तिथेच प्रसाद घेतला. प्रसाद घेतल्यानंतर शरीराला एकदम तरतरी आली आणि सतीशला फ़ोन करून ड्रायव्हर पाठवू नको, मी ठीक आहे, उद्या मीच गाडी चालवीत उरलेले ३५० किलोमीटर्स अंतर पूर्ण करतोय म्हणून सांगितले. नेहेमीप्रमाणे माझ्या खाण्याच्या शौकावर आणि आग्रह न मोडण्याच्या स्वभावावर सुपत्नीप्रमाणे त्याच्याही शिव्या खाल्ल्यात. माझ्यासाठी तो प्राचार्य, माझा बॉस वगैरे अगदी कमी, मित्र कमी आणि घरातला एक सदस्य जास्त होता. आनंदाने आणि त्याने केलेल्या विनोदांवर मनमुराद हसत हसत त्याच्या कानपिचक्या ऐकल्या आणि रात्री निवांत झोपलो.


दुस-या दिवशी मात्र जालन्यावरून निवांत निघालो. आज फ़क्त सात आठ तासांचाच प्रवास करायचा होता. दुपारी बार्शी - कुर्डुवाडी रस्त्यावरच्या एका अतिशय सुंदर धाब्यावर जेवण करून सांगोल्याला पोचलो. 


सहज विचार केला की ही वेळ जालना शहरात आणि हॉटेल दृष्टीपथात असताना आली म्हणून बरय. प्रवासात, निर्जन जागी मी असा ग्लानीत पडून राहिलो असतो तर आमच्यावर किती अनवस्था प्रसंग ओढवला असता ? या कल्पनेनेच अंगावर शहारा आला. माझे नक्की काय चुकले ? याचे आत्मपरिक्षण मी केले.


त्यानंतर मात्र मी माझ्या जीवनात बदललो. लोकांच्या आग्रहापेक्षा माझे शरीर काय म्हणतेय ? याकडे जास्त लक्ष देऊन आग्रह ठामपणे टाळायला लागलो. "राखावी बहुतांची अंतरे" हे करतानाच स्वतःचे अंतर काय म्हणतेय हे ओळखून नम्रपणे नकार द्यायला लागलो. या आत्यंतिक घाबरवणा-या प्रसंगाने मला हा जन्मभराचा धडा दिला.



- खादाडखाऊ असला तरी वयोमानानुसार मोजकेच आणि अगदी वेळेवर खाणारा, खाण्याच्या वेळा अगदी काटेकोर पाळणारा, निग्रही माणूस प्रा. वैभवीराम प्रकाश किन्हीकर


बुधवार, १८ जून २०२५


नागपूर


#सुरपाखरू


#३०दिवसात३०


#जून२०२५


Tuesday, June 17, 2025

शताब्दी एक्सप्रेस

 यापूर्वीचे लेख आणि पूर्वपिठीका येथे वाचा.

भारताचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांची जन्मशताब्दी १९८९ मध्ये होती. म्हणून तत्कालीन रेल्वेमंत्री माधवराव शिंदे यांनी १९८८ च्या रेल्वे अर्थसंकल्पात शताब्दी एक्सप्रेस या गाडीची घोषणा केली. आणि लगेच चेन्नईच्या इंटिग्रल कोच फ़ॅक्टरी ने शताब्दी एक्सप्रेससाठी विशेष डबे बांधायला सुरूवात केली. 


भारतातली पहिली शताब्दी एक्सप्रेस सेवा १० जुलै १९८८ रोजी नवी दिल्ली आणि ग्वाल्हेर दरम्यान धावली. ग्वाल्हेर हा माधवराव शिंदेंचा लोकसभा मतदारसंघ. इंदिरा गांधींच्या हत्येनंतर झालेल्या लोकसभा निवडणुकीत कॉंग्रेसला जे अभूतपूर्व यश मिळाले त्यात माधवराव हे त्यावेळेस भाजपचे अर्ध्वयू आणि बडे नेता श्री अटलबिहारी वाजपेयी यांचा ग्वाल्हेरमधून पराभव करून निवडून आले होते. तत्कालीन पंतप्रधान श्री राजीव गांधी यांनी त्यांना रेल्वेमंत्रीपद बहाल केले होते. त्यानंतर या शताब्दी एक्सप्रेसचा मार्ग झाशी जंक्शन (आता वीरांगना राणी लक्ष्मीबाई जंक्शन) आणि त्यानंतर भोपाळ जंक्शनपर्यंत वाढवण्यात आला. आता ही गाडी भोपाळच्याच राणी कमलापती टर्मिनस पर्यंत जाते. ती "भोपाळ शताब्दी एक्सप्रेस" या नावाने ओळखली जाते.






१९६९ मध्ये हावडा राजधानी आणि १९७२ मध्ये मुंबई राजधानी या लक्झरी ब्रॅंडच्या गाड्या सुरू केल्यानंतर १९८८ मध्ये पहिल्यांदाच भारतीय रेल्वेने आपला दुसरा एक लक्झरी ब्रॅंड शताब्दी एक्सप्रेसच्या रूपाने आणला होता. राजधानी गाड्या राज्यांच्या राजधान्यांना देशाच्या राजधानीशी जोडणा-या लक्झरी गाड्या होत्या. त्या आपला प्रवास दिवसा आणि रात्री पार पाडत होत्या. त्यांना सुरूवातीच्या काळात वातानुकूल प्रथम वर्ग (First AC), वातानुकूल शयनयान (AC Sleeper, i.e. Second AC){वातानुकूल त्रिस्तरीय शयनयान फ़ार नंतर १९९२ च्या सुमारास भारतीय रेल्वेत आलेत.} आणि वातानुकूल खुर्ची यान (AC Chair Car) असे डबे लागत असत. शताब्दी एक्सप्रेस ही देशाच्या राजधानीला आसपासच्या राज्यातल्या महत्वाच्या शहरांना जोडणारी सेवा होती. ही गाडी आपला प्रवास सकाळी लवकर सुरू करून संध्याकाळी उशीरा संपवीत असे त्यामुळे या गाडीला शयनयान डब्यांची गरज नव्हती. फ़क्त वातानुकूल खुर्ची यान (AC Chair Car) डबे या गाडीला लागत असत. 


नवी दिल्ली वरून सकाळी ६.०० वाजता निघणारी शताब्दी ग्वाल्हेरला ४, ४.५ तासात पोचत असे. त्याकाळचे सगळ्यात शक्तीशाली एंजिन WAP 1 या गाडीला मिळायचे आणि या मार्गावर या गाडीला अगदी टॉप प्रा्यॉरिटी होती. या गाडीचे डबेही अगदी निळ्या आणि क्रीम अशा रंगसंगतीचे, विशेष डिझाईनचे आणि ताशी १३० किलोमीटर प्रतितास अशा वेगाने धावू शकणारे होते. तेव्हा नवी दिल्ली ते आगरा हा रेल्वेमार्ग मात्र ताशी ११० किलोमीटर वेगासाठीच फ़िट होता त्यामुळे शताब्दी या मार्गावर ताशी ११० किलोमीटर वेगाने मार्गक्रमण करीत असे. 


राजधानीप्रमाणेच शताब्दीही संपूर्ण वातानुकुलीत सेवा होती आणि त्याच्या तिकीटांमध्ये नाश्ता, चहा, जेवण सगळे समाविष्ट असायचे. या गाड्या पूर्णपणे आरक्षित असायच्यात आणि यांची तिकीटेही विमानाच्या तिकीटांसारखी लंबीचवडी आणि एवंगुणविशिष्ट अशी असायचीत.


परतीच्या प्रवासात ग्वाल्हेरवरून ही गाडी दुपारी निघून संध्याकाळी नवी दिल्ली स्टेशनवर संध्याकाळी पोचत असे. या गाडीचा मुख्य उद्देश नवी दिल्लीत राहून आग्रा येथे येणा-या भारतीय आणि परदेशी पर्यटकांसाठी एक लक्झरी सेवा पुरविण्याचा होता. सकाळी नवी दिल्लीवरून निघून आग्रा येथे पोहोचून ताजमहाल वगैरे बघून रात्री मुक्कामाला नवी दिल्लीतल्या हॉटेल्समध्ये येणा-या पर्यटकांना ही गाडी सोयीची होती. अगदी दोन तासांत नवी दिल्ली ते आग्रा हे १८८ किलोमीटरचे अंतर विनाथांबा पार करीत असे. यापूर्वी या मार्गावर याच पर्यटकांच्या सोयीसाठी ताज एक्सप्रेस धावत होती पण याच प्रवासासाठी ताज एक्सप्रेस जवळपास ४ तास घ्यायची. 


या गाडीला लाभलेल्या लोकप्रियतेमुळे नंतर भारतातल्या इतर शहरांमध्येही एका दिवसात जाऊन आपल्या मूळ स्टेशनवर परतणारी ही शताब्दी सेवा सुरू करण्यात आली.


लखनऊ जंक्शन - नवी दिल्ली स्वर्ण शताब्दी एक्सप्रेस: १९८९ मध्ये नवी दिल्ली आणि उत्त्तर प्रदेशची राजधानी यात ही सेवा सुरू करण्यात आली. 


नवी दिल्ली - कालका शताब्दी एक्सप्रेस: १९८९ मध्येच नवी दिल्ली वरून सिमल्याला जाण्यासाठी ही शताब्दी सेवा सुरू करण्यात आली. 


चेन्नई सेंट्रल - म्हैसूर शताब्दी एक्सप्रेस: १९९४ मध्ये चेन्नई आणि बंगलोर यांना जलद जोडणारी शताब्दी एक्सप्रेस म्हणून ही गाडी सुरू झाली.


मुंबई सेंट्रल - अहमदाबाद शताब्दी एक्सप्रेस: १९९४ मध्ये या दोन महत्वाच्या औद्योगिक शहरांना जोडणारी ही जलद सेवा सुरू झाली. आज या दोन शहरांमध्ये भारतीय रेल्वेवरच्या सर्व सेवा असलेल्या अनेक प्रकारच्या रेल्वेगाड्या उपलब्ध आहेत. फ़क्त राजधानी एक्सप्रेस सोडून. साधी पॅसेंजर, एक्सप्रेस, ए. सी. एक्सप्रेस, शताब्दी, तेजस एक्सप्रेस, वंदे भारत एक्सप्रेस, डबल डेकर एक्सप्रेस. अगदी सगळ्या सेवा. आणि आता तर याच दोन शहरांदरम्यान बुलेट ट्रेन सुद्धा येणार आहे. 


नवी दिल्ली - अमृतसर शताब्दी एक्सप्रेस: १९९४ मध्ये सुरू झाली. या गाडीचे वैशिष्ट्य हे की संपूर्ण भारतीय रेल्वेवर IR 20 या बनावटीचे आणि अमेरिकन एक्सप्रेस गाड्यांना असतात तसे कॉर्युगेटेट पत्र्यापासून बनलेले (जास्त ताकदवान) असे कोचेस फ़क्त याच गाडीला मिळत होते. तो एकच रेक भारतीय रेल्वेने प्रायोगिक तत्वावर बनवला आणि या गाडीला दिला. नंतर त्या प्रयोगाचे काय झाले हे कळले नाही. 





नवी दिल्ली - अजमेर शताब्दी एक्सप्रेस : १९९५ मध्ये सुरू झाली.


मुंबई - पुणे शताब्दी एक्सप्रेस. ही गाडी पण १९९५ मध्ये सुरू केली होती. डेक्कन क्वीन ही प्रतिष्ठित गाडी सकाळी पुण्यावरून मुंबईला येते आणि संध्याकाळी परतते ही गाडी त्याच्या बरोबर विरूद्ध धावायची. सकाळी मुंबईवरून पुणे गाठायची आणि संध्याकाळी मुंबईत परतायची. पण हिला प्रवाशांचा फ़ार प्रतिसाद लाभू शकला नाही म्हणून दोन वर्षातच ही गाडी रेल्वेने बंद केली. आता या गाडीच्या ऐवजी त्याच वेळांमध्ये मुंबई - पुणे - मुंबई ही इंटरसिटी एक्सप्रेस सुरू आहे. 


हावडा - रांची शताब्दी एक्सप्रेस: १९९५ ला ही गाडीपण सुरू झाली.


नवी दिल्ली - देहरादून शताब्दी एक्सप्रेस: १९९५ मध्येच ही गाडी सुरू झाली.


नवी दिल्ली - अमृतसर स्वर्ण शताब्दी एक्सप्रेस (दुसरी): १९९८


बेंगलुरु कॅंट - चेन्नई सेंट्रल शताब्दी एक्सप्रेस: २००५


कानपूर सेंट्रल - नवी दिल्ली शताब्दी एक्सप्रेस: २०१०


चेन्नई सेंट्रल - कोइंबतूर जंक्शन शताब्दी एक्सप्रेस: २०११


पुणे - सिकंदराबाद शताब्दी एक्सप्रेस: २०११


काठगोदाम - नवी दिल्ली शताब्दी एक्सप्रेस: २०१२


हावडा - न्यू जलपाईगुडी शताब्दी एक्सप्रेस: २०१२


नवी दिल्ली - चंदीगड शताब्दी एक्सप्रेस: २०१३


हावडा - पुरी शताब्दी एक्सप्रेस: २०१३


गुवाहाटी - नाहरलागुन शताब्दी एक्सप्रेस: २०१७


सगळ्या शताब्दी एक्सप्रेसमध्ये खालील प्रकारचे कोचेस असतात. 


अ) कार्यकारी वातानुकूलित खुर्ची यान (Executive Class - EC)


या वर्गात २x२ (दोन आसनं एका बाजूला आणि दोन आसनं दुस-या बाजूला) अशी आरामदायक बसण्याची व्यवस्था असते. या आसनांना जास्त लेगरूम (पाय ठेवण्यासाठी जागा) असते आणि ती अधिक मागे झुकतात (recline)

या डब्यांमध्ये सहसा उत्तम दर्जाच्या सुविधा असतात, जसे की आरामदायक सीट, हेडरेस्ट, अधिक जागा आणि काही गाड्यांमध्ये वैयक्तिक मनोरंजन प्रणाली (personal entertainment system). या वर्गातील तिकीटाचे भाडे सामान्य खुर्ची यान पेक्षा जास्त असते. शताब्दी एक्सप्रेसमध्ये या दर्जाचे एक किंवा दोनच कोचेस असतात.  




आ) वातानुकूलित खुर्ची यान (AC Chair Car - CC)


या वर्गात ३x२ (तीन आसनं एका बाजूला आणि दोन आसनं दुस-या  बाजूला) अशी बसण्याची व्यवस्था असते.

या वर्गातील आसनं कार्यकारी वर्गाच्या तुलनेत थोडी कमी आरामदायी असली तरी, ती वातानुकूलित असतात आणि त्यात पुरेशी लेगरूम असते. शताब्दी एक्सप्रेसमध्ये सगळ्यात जास्त डबे या श्रेणीचे असतात. येथेही जेवण तिकीट दरात समाविष्ट असते.


या व्यतिरिक्त, काही निवडक शताब्दी एक्सप्रेस गाड्यांमध्ये अनुभूती (Anubhuti) आणि विस्टाडोम (Vistadome) कोच देखील असतात, जे अधिक आरामदायक आणि विशेष वैशिष्ट्ये प्रदान करतात.



इ) अनुभूती (Anubhuti) कोच (काही निवडक गाड्यांमध्ये)


हा एक नवीन बांधणीचा (LHB) लक्झरी  कोच आहे, जो शताब्दी आणि राजधानी एक्सप्रेसमध्ये हळूहळू समाविष्ट केला जातो आहे. हा कोच उच्च दर्जाच्या सुविधा आणि अधिक चांगला प्रवासाचा अनुभव देण्यासाठी विशेष रूपाने डिझाइन केलेला आहे. यात अत्याधुनिक आसने आणि प्रवाशांच्या सोयीसाठी अनेक वैशिष्ट्ये असतात.


ई) विस्टाडोम (Vistadome) कोच (काही निवडक गाड्यांमध्ये)


काही निवडक पर्यटन मार्गांवरील शताब्दी एक्सप्रेसमध्ये विस्टाडोम कोच जोडले जातात.

या डब्यांमध्ये मोठ्या काचेच्या खिडक्या, पारदर्शक छत (transparent roofing) आणि फिरणाऱ्या आसनांची सोय असते. यामुळे प्रवाशांना आजूबाजूच्या निसर्गाचा आणि दृश्यांचा अनुभव घेता येतो.


शताब्दी एक्सप्रेसच्या कोचेसमध्ये खूप बदल घडलेत. आताशा सगळ्याच शताब्दी एक्सप्रेस गाड्यांना नवे LHB कोचेस यायला लागलेत. आमच्या बंगलोर म्हैसूर प्रवासासाठी म्हैसूरवरून परतताना आम्ही रस्तामार्गे न परतता, मुद्दाम म्हैसूर - चेन्नई शताब्दीचे कार्यकारी वातानुकूलित खुर्ची यान (Executive Class - EC) आरक्षण केले होते. २ जुलै २००९ रोजी आमचा हा प्रवास होणार होता. आमच्या सुदैवाने या गाडीला १ जुलै २००९ रोजीच नवा कोरा LHB कोचेसचा रेक मिळाला. आणि आमचा म्हैसूर ते बंगलोर हा प्रवास अगदी नव्या को-या रेकने झाला.




या प्रवासात आम्हाला नाश्ता किंवा जेवण मिळेल अशी आमची अपेक्षा होती. दुपारी म्हैसूर वरून निघणारी ही गाडी जरी फ़क्त दोन अडीच तासांत बंगलोरला पोचणार असली तरी तिकीट मात्र याच गाडीच्या वातानुकूलित खुर्ची यान (AC Chair Car - CC) च्या तुलनेत जवळपास अडीचपट होते. त्यामुळे आम्ही या खाण्यापिण्याचा आस्वाद घ्यायचा म्हणून म्हैसूरवरून निघताना फ़क्त नाश्ता करून निघालेलो होतो. न जाणो आपण पूर्ण जेवण वगैरे करून निघायचो आणि गाडीतल्या उत्कृष्ट पदार्थांचा आपल्याला आस्वादच घेता यायचा नाही म्हणून आम्ही पोटात भूक ठेवूनच निघालेलो होतो.


म्हैसूरला आम्ही गाडीत शिरलो. गाडी पूर्णपणे रिकामी. ही गाडी मुख्यतः बंगलोर ते चेन्नई या प्रवासातच पूर्ण प्रवाशांनिशी धावते हे वर्तमान आम्हाला गाडीतल्या रेल्वे कर्मचा-यांनी सांगितले होते. गाडी छान फ़ुग्यांनी वगैरे सजवलेली होती. म्हैसूरवरून निघून अर्धा तास झाला तरी आम्हाला साधा चहा / कॉफ़ी सुद्धा विचारले नाही म्हणून मी कोच अटेंडंट कडे चौकशी केली तेव्हा जे वर्तमान समजले त्यामुळे आम्ही हादरलोच. या गाडीत म्हैसूर ते बंगलोर प्रवास करणा-या प्रवाशांकरिता रेल्वेकडून काहीही म्हणजे काहीही खायला प्यायला दिले जात नाही. आमचे पडलेले चेहरे पाहून त्या कर्मचा-यांनाच दया आली असावी कारण थोड्या वेळाने त्यांनी आम्हाला कॅडबरी इक्लेअर्स, चहा आणि मारी बिस्कीटे आणून दिलीत. राजधानी एक्सप्रेसमधल्या प्रथम वर्ग वातानुकूल वर्गातल्या आदरातिथ्याचा आम्ही यापूर्वी खूपच छान अनुभव घेतला होता पण या शताब्दी एक्सप्रेसच्या पहिल्या प्रवासाने आम्हाला आदरातिथ्याबाबत मात्र वेगळाच धक्का दिला. 





आज शताब्दी गाड्यांना काही काही मार्गावर गतिमान एक्सप्रेस, तेजस एक्सप्रेस आणि गेल्या काही वर्षांमध्ये वंदे भारतने पर्याय द्यायला सुरूवात केलेली आहे. आता शताब्दीचे नवे कोचेससुद्धा बनविणे रेल्वे कारखान्यांनी बंद केले आहे. शताब्दी एक्सप्रेस ही राजधानी एक्सप्रेसची धाकटी बहीण खरी पण राजधानी एक्सप्रेस अजूनही आपले अस्तित्व टिकवून आहे पण शताब्दी एक्सप्रेस मात्र येत्या २-३ वर्षांमध्ये काळाच्या पडद्याआड जाईल आणि भूतकाळ होईल हे खरे.


- भारतीय रेल्वेच्या जवळपास सगळ्या गाड्यांमधून आणि सगळ्या वर्गांमधून प्रवासाचे भरपूर अनुभव घेतलेला एक प्रवासी पक्षी, प्रा. वैभवीराम प्रकाश किन्हीकर


मंगळवार, १७ जून२०२५


नागपूर


#सुरपाखरू


#३०दिवसात३०


#जून२०२५