Monday, June 30, 2025

माझ्या लेखनप्रेरणा अर्थात मी का लिहितो?

काल आमच्या एका गटचर्चेत प्रत्येकाने काही काही सदस्यांनी  त्यांच्या त्यांच्या  लेखनाच्या प्रेरणा सांगितल्यात आणि मी सुद्धा विचारात पडलो की माझ्या लेखनप्रेरणा नक्की काय ?


एक चांगला गायक व्हायला एक चांगला श्रोता होणे अतिशय आवश्यक आहे असे म्हणतात तसेच एक चांगला लेखक होण्यासाठी आधी ती व्यक्ती एक चांगला वाचक असणे तितकेच महत्वाचे आहे असे मला वाटते. मला आठवतंय माझ्या बालवयातच माझे खूप दांडगे वाचन झालेले होते. अक्षरओळख झाल्यानंतर अगदी चवथ्या वर्गापर्यंतच मी समग्र पु ल देशपांडे , व पु काळे, ग दि माडगूळकर , व्यंकटेश माडगूळकर, रणजित देसाई, बाबासाहेब पुरंदरे  वाचून काढलेले होते. आमचे दादा शाळेत लिपिक होते आणि शाळेच्या वाचनालयात तिथले ग्रंथपाल आमच्या दादांचे सहकारी आणि  मित्र असल्याने वाचनालयात आम्हाला मुक्त प्रवेश होता. त्यामुळे आमच्या सेमिस्टर्स संपण्याच्या अखेरच्या दिवशी (सुट्या लागण्याच्या आदल्या दिवशी) आम्ही शेवटल्या पेपरला जाताना एक भली मोठी पिशवी सोबत घेऊन जात असू आणि पेपर संपला रे संपला की दादांना सांगून वाचनालयात घुसत असू.


अर्थात आमच्या ग्रंथपाल काकांना आमची ही पुस्तके अशी खाण्याची सवय माहिती असल्याने ते आम्हाला अडथळा करीत नसत. आम्हीही अगदी १०० च्या आसपास पुस्तके त्या मोठ्याला पिशव्यांमध्ये भरायचोत आणि अर्धी पुस्तके आम्ही तर अर्धी आमचे दादा त्यांचे ऑफिस सुटल्यावर अशा पद्धतीने घरी घेऊन जात असू.


मग काय ! सुटयांमध्ये या सगळ्या पुस्तकांचा फडशा पाडणे हे एकाच काम उरत असे. बालवयात असे भरपूर वाचनसंस्कार झालेत खरे पण आपण या लेखकांच्यासारखे  लेखक व्हावे ही महत्वाकांक्षा मात्र मनात कधीच आली नाही.


अभियांत्रिकी शिक्षण पश्चिम महाराष्ट्रात कराडला आणि त्यानंतर नोकरीनिमित्त मुंबईत जवळपास सव्वा तप राहणे झाले. सर्वांमध्ये मिळून जाण्याचा आणि मनमोकळा स्वभाव असल्याने तिथल्या तिथल्या जनजीवनात गुरफटून गेलोत, तिथल्या संस्कृतींशी समरस झालोत. विविधरंगी जीवन अनुभव घेता आलेत. प्रवास घडला, एक निराळे व्यक्तिमत्व घडले.


मग या सगळ्या अनुभवांचे मित्र सुहृदांमध्ये कथन सुरू झाले. मुळात जन्मच नकलाकार घराण्यात झालेला त्यामुळे परफॉर्मिंग आर्टस ची आवड आणि सवय बालपणापासूनच होती. त्या सर्वांना हे कथन आवडले आणि मग त्यातून हे अनुभव जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचावे म्हणून लेखन सुरू झाले.


त्यातच साधारण २००७ - २००८ च्या सुमाराला Orkut आले. त्या माध्यमाला सरावलो आणि तिथे विचार मांडणे सुरू झाले. त्यापूर्वीही दै. तरूण भारतातून लिखाण होत होते पण इलेक्ट्रॉनिक समाज माध्यमे ही नाटकांसारखी असतात, लगेच समोरून दाद मिळते तर छापील माध्यमे ही सिनेमांसारखी असतात, प्रत्यक्ष दाद अनुभवायला मिळत नाही हे सुध्दा लक्षात आले.


Orkut नंतर फेसबुक आले. स्वतःच्या अभिव्यक्तित जास्त लवचिकता मिळायला लागली. त्याच दरम्यान मला ब्लॉग या माध्यमाचा शोध लागला. ब्लॉगवर हळूहळू का होईना व्यक्त व्हायला सुरूवात केली. सुरूवातीच्या चार पाच वर्षात ब्लॉगला आलेला प्रतिसाद अगदी कमी होता. निरुत्साही. ब्लॉग लिहीणे सुरू ठेवावे की नको ? या विचाराप्रत येणारा. पण नंतर फ़ेसबुकवरून, व्हॉटसॲप वरून आपल्या ब्लॉगपोस्टस साठी वाचकवर्ग मिळू शकतो हे जाणवले. ब्लॉगच्या लिंक्स या माध्यमांवर द्यायला सुरूवात केली आणि ब्लॉग्जच्या संख्येत आणि वाचकसंख्येतही भरीव वाढ झाली. अधिकस्य अधिकम फ़लम या न्यायाने वाचकांचा उत्साह नवनवे ब्लॉगपोस्ट लिहायला उद्युक्त करीत होता तर सातत्याने लिहील्याने वाढता वाचकवर्ग लाभत होता.


त्यातही आपण लिखाण केल्यानंतर वाचकांना ते आपलाच अनुभव असल्याचे जाणवते आणि ते लिखाण त्यांना त्यांच्या जवळचे वाटते. त्यामुळे फ़ार जास्त अलंकारिक भाषेत, खूप संशोधन करून, एखाद्या विषयाची खूप मांडणी करून एखादे लिखाण मी केलेय असे झाले नाही. मनाला भावले ते सगळे "पिंडी ते ब्रह्मांडी" या न्यायाने लिहीले. त्यात कुठेही अभिनिवेश नव्हता, पेशाने शिक्षक असूनही "आपण या सर्व अज्ञ जनांना शिकवतोय" अशी भूमिका नव्हती. सरळ, स्वच्छ आणि मनमोकळे लेखन. माझ्या स्वभावासारखेच. मला आलेले अनुभव, मला दिसलेले जग, मला जाणवलेली माणसे असे साधे सरळ लिखाणाचे विषय असायचेत आणि वाचकांनाही अशाच प्रकारचे लेखन आवडते हे माझ्या लक्षात आले आणि मी लिहीत गेलो.


"मी लेखन का करतो ?" या प्रश्नाच्या उत्त्तरांमध्ये "मला स्वतःला अभिव्यक्त व्हायला आवडतं म्हणून", "लोकांच्या मनातले विचार ,इच्छा मी माझ्या अनुभवांद्वारे व्यक्त करतो आणि मला समानशील असलेले अनेक वाचक मित्र मिळतात म्हणून" या दोन उत्त्तरांचा क्रम पहिल्या दोन उत्त्तरांत येईल.


मायबाप वाचकांनी लिखाण वाचले आणि तसा प्रतिसाद दिला त्याबद्दल सर्वांचे मनःपूर्वक आभार. यानंतरही असाच प्रतिसाद मला लाभो अशी नम्र प्रार्थना.


- जूनच्या ३० दिवसात वेगवेगळ्या विषयांवर ३० लेख लिहीणारा दृढनिश्चयी लेखक, प्रा. वैभवीराम प्रकाश किन्हीकर


सोमवार, ३० जून २०२५


नागपूर


#सुरपाखरू


#३०दिवसात३०


#जून२०२५


Sunday, June 29, 2025

लहानपण दे गा देवा...

आता आपण मोठे झाल्यावर श्रीतुकोबांचा "लहानपण दे गा देवा" हा अभंग आपल्याला आठवतो आणि लहान होऊन जगावेसे वाटते पण आपल्यापैकी किती जणांना आपल्या लहानपणी "आपल्या लहान असण्याचा" अभिमान वाटला होता, फ़ायदा जाणवला होता ? प्रामाणिकपणे सांगा. मला खात्री आहे की प्रत्येकाच्या लहानपणी प्रत्येक व्यक्तीला "मी कधी एकदा मोठा होतोय" असे झाले असते.


आमच्या बालपणापासून आमचे एकच स्वप्न होते. अशा खेळण्यातल्या कार्स चालवायच्यात. नुसत्या चालवायच्याच नाही तर आपल्या इवल्या इवल्या पायांनी जोर लावत लावत नागपूर ते चंद्रपूर असा आजोळचा प्रवास करायचा. चंद्रपूरच्या प्रवासाचे वेड तेव्हापासून. अर्थात तेव्हाच्या मध्यमवर्गीय घरांमध्ये अशी महागडी खेळणी घेऊन देण्याचे लाड मात्र कधीच झाले नाहीत. आम्ही तिघे भाऊ होतो हे एक कारण होते. अर्थात मी एकुलता एक असतो तरी असे लाड घरी झालेच नसते हे आमच्या काही एकुलत्या एक असलेल्या मित्रमंडळींच्या घरी असलेल्या वातावरणावरून आम्ही हा धडा घेऊ शकतो.






तेव्हा वाटायचे, केव्हा एकदा मोठे होतोय ? केव्हा एकदा मोठी कार घेतोय ? आणि केव्हा एकदा ती कार चालवत चंद्रपूरला, आजोळी जातोय ? अर्थात हे स्वप्न पूर्ण व्हायला ३५ वर्षे मेहनत करावी लागली. पण खरोखरीची नवी कार घेतल्यावर मात्र खरोखर पहिला बाहेरगावचा प्रवास हा चंद्रपूरचाच केला.


आमच्या बालपणी आजच्याइतके सामाजिक म्हणा, वैश्विक म्हणा एक्सपोजर आम्हाला नव्हते. आमचे विश्व आमचे आईवडील, शाळा, मित्र मैत्रिणी एव्हढ्यापुरतेच मर्यादित होते. अर्थात वडिलांनी वाचनाची आवड लावल्याने अगदी लहान वयापासून खूप मराठी साहित्य वाचले. त्या साहित्यातून बाह्य विश्वाशी आम्ही जोडले गेलेलो होतो. त्यामुळे आमच्या संकल्पना, आमच्या इच्छा आकांक्षा, आमचे हट्ट मर्यादितच असायचे. एका गावावरून दुस-या गावाला जाताना पारले ग्लुकोज बिस्कीटांचा एक अख्खा पुडा आपण एकट्याने संपविणे ही आमच्या चैनीची व्याख्या असायची. दरवेळी आई वडील आणि भावंडांसोबतच्या प्रवासात मध्ये एखाद्या थांब्यावर पारले बिस्कीटांचा पुडा आमचे दादा खरेदी करून आणत असत पण त्यातली दोन किंवा तीन बिस्कीटे वाट्याला येत असत. त्यामुळे पहिल्या एकल प्रवासात (अर्थात नागपूर ते चंद्रपूर) मी जांब बसस्थानकावर उतरून एक अख्खा बिस्कीटचा पुडा विकत घेऊन फ़स्त केला होता. सिकंदराला जग जिंकल्याच्या आनंदाइतका आनंद मला त्यावेळी झाला असल्याचे मला चांगलेच स्मरते.


आमच्या बालपणी आम्हाला "कधी एकदा कॉलेजात जाऊन शिकतोय !" असे झाले होते. आमची शाळा दररोज असायची. जावेच लागे. बहाणे वगैरे करून फ़ार तर एक दोन दिवस सुटी मिळेल, रोज रोज शाळेत जाणे, गृहपाठ करणे, मास्तरांच्या / मास्तरणींच्या छड्या खाणे, पी. टी. करणे सगळ्यांचा अगदी कंटाळा यायचा. एखादा दिवस तरी कारणाशिवाय पूर्ण ऑफ़ मिळावा असे मनापासून वाटे. पण तो मिळायचा नाही. आई दादा अगदी खनपटीला बसून शाळेत पाठवायचेच.


आमच्या मामे बहिणी, मावस बहिणी आमच्याहून सात आठ वर्षांनी मोठ्या होत्या. आम्ही शाळेत असताना त्या कॉलेजात जायच्यात. त्यांना मात्र त्यांच्या मर्जीप्रमाणे एखादे दिवशी दोनच लेक्चर्स करून परतणे, एखादे दिवशी इच्छा नसेल तर सरळ कॉलेजला दांडी मारून मित्र मैत्रिणींसोबत सिनेमाला जाणे वगैरे प्रकार करता यायचे. त्यांचे पालक त्यांना याबाबत काहीच बोलायचे नाहीत. त्यामुळे एकदा कॉलेजात गेलोत की हे सगळे न्यू नॉर्मल आहे अशी आमची भावना व्हायची आणि आपणही कॉलेजात गेल्यावर अशा मस्त सुट्या घेऊ, मनमर्जी लेक्चर्स करू अथवा बंक करू वगैरे आमच्या मनाचे बेत झालेले होते.


पण हाय रे दैवा ! आमचा प्रवेश शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालयात झाला आणि अधेमधे असे लेक्चर्स बंक केले तरी विचारणारे. टोकणारे कुणीही नसले तरी एक लेक्चर बंक केल्यानंतर त्यात झालेला अभ्यास भरून काढायला नंतर खूप तास स्वतःच अभ्यास करावा लागतो हे तत्व लक्षात आले आणि आम्ही सुधारलोत. कॉलेज शिक्षणाचे डोंगर आपल्याला वाटले होते तेव्हढे गवताळ, हिरवे नाहीत याची जाणीव आम्हाला प्रगल्भ करून गेली.


तसेच बाहेर खाण्याबाबत आमच्या घरी निर्बंध होते. आमचे दादा हौशी होते. महिन्यातून दोन तीन वेळा बर्डीवर जाऊन कॅफ़े वृंदावनचा दोसा, जगत ची भेळ, आनंद भंडारचे चोमचोम वगैरे मजा आम्ही सगळे कुटुंब मिळून करायचोत. पण रस्त्याशेजारच्या ठेल्यांवर समोसे खाणे, शाळेसमोर बसलेल्या एखाद्या मावशीच्या टोपल्यातले बोरकूट, उकडलेली बोरे, चूर्ण (उच्चारी चूरण) खायला मात्र आम्हाला पूर्ण मनाई होती. त्याकाळी खूप छानशी हॉटेल्स नागपुरात नव्हती आणि आम्हाला पॉकेट मनी वगैरे प्रकार मिळत नव्हता. त्यामुळे मनात इच्छा असूनही असे रस्त्यावरचे पदार्थ आम्हाला खाता आले नाहीत.


त्या दाबलेल्या भावनांचा परिपाक म्हणून कॉलेजला गेल्यावर हॉस्टेलला राहताना "आपण रोज एक प्लेट समोसा रोज संध्याकाळी खायचा बरं का" असा आमचा निर्धार होता. त्या निर्धाराचे पालन आम्ही हॉस्टेलला असताना पहिले ८ दिवस केले सुद्धा. पण नंतर नंतर त्यातले वैय्यर्थ कळले. ॲसिडीटी वाढली, भूक मंदावली, घरचा आईच्या हातचा फ़ोडणीचे वरण भात किती स्वर्गीय चवीचा असतो याची जाणीव झाली आणि त्या खाण्याला आम्ही आसूसलो. यानंतर जेव्हा जेव्हा बाहेर खाण्याचे प्रसंग आलेत तेव्हा केवळ अपरिहार्यता म्हणून आपण बाहेर खातोय ही भावना झाली आणि लहानपणी आईच्या हातचा मऊ मऊ मेतकूट भात, दूध पोळी आठवत गेले. "लहानपण दे गा देवा" ही हाक अधिक प्रबळरित्या मागितली गेली.


अर्थात काही काही दुर्दैवी बालकांचे लहानपण खूप खडतर गेले असेल आणि त्यांना आज त्या आठवणी सुद्धा नकोशा वाटत असतील. लहानपणीच अंगावर खूप मोठी कौटुंबिक जबाबदारी येऊन पडल्याने बिचा-यांच्या लहानपणी त्यांचे लहानपणच हरवले असेल आणि कधी एकदा मोठे होतोय असे त्यांना झाले असेल. मोठे होऊन आपापल्या क्षेत्रात उत्त्तम काम करून बिचा-यांनी आपल्या बालपणीच्या नकोशा जीवनावर मात सुद्धा केली असेल. त्यांच्या साठी "लहानपण दे गा देवा" हे कदाचित नसेल पण अशा अभागी जीवांना मोठ्या वयात सुद्धा त्यांच्या बालपणीसारखे जीवन जगायला मिळावे हीच प्रार्थना आपण मनापासून परमेश्वराकडे करू शकतो.


आज जाणवतय़ की मनातले बालपण जपणे हा प्रत्येकाचा वैयक्तिक निर्णय आहे. मोठे होत असतानाही आपल्या मनातले खट्याळ मूल जपणे, कधीतरी छोट्या मुलासारखे निरागस होऊन निर्लेप जगणे, कधी कधी छोट्या मुलांसारखे आपल्या आयुष्यातले काही निर्णय स्वतः न घेता आपल्या कुटुंबियांवर (बालपणी जसा आई वडिलांवर होता तसा) विश्वास टाकून त्यांना घेऊ देणे आणि स्वतः त्याची चिकित्सा न करता अगदी लहान मुलांसारखे जगणे हे जमणे त्या त्या व्यक्तीच्या मनोवृत्तीवरच अवलंबून आहे, नाही का ? "लहानपण दे गा देवा" हे देवाकडे मागितल्यानंतर त्याने ते आपल्याला आता मोठे झाल्यावर कधी कधी दिले आहे ? हे ओळखण्याची बुद्धी मोठेपणीच आपल्याला प्राप्त होत असते, नाही का ? म्हणूनच "प्रौढत्वी निजशैशव जपणे" ही कवीकल्पना न होता प्रत्यक्ष जगण्याची संकल्पना होणे हाच जीवनविकास आहे.


- स्वतः प्रौढत्वी बालपण जपणारा, जगणारा, प्रा. वैभवीराम प्रकाश किन्हीकर


रविवार, २९/६/२०२५


नागपूर


#सुरपाखरू


#३०दिवसात३०


#जून२०२५





 

Saturday, June 28, 2025

पहाटपक्षी बसेस

पुल म्हणतात की रात्रभर झोपून पहाटे उठून अनुभवलेल्या रेडिमेड पहाटेपेक्षा रात्रभर गाण्यांच्या, गप्पांच्या मैफिली जागवून नंतर आलेली पहाट ती जास्त सुंदर असते.


पण आमच्यासारखे "लवकर निजे, लवकर उठे" वर बालपणापासून विश्वास असलेल्या लोकांना रात्री सेकंड शो चे १२ वाजेपर्यंत जागरणच खूप वाटायचे. जागरण करायचे ते फक्त कोजागरीच्या रात्री आणि ते सुध्दा रात्री १२, १२.३० पर्यंतच. नंतर गाढ झोपेत निसूर. त्यामुळे पुलंनी वर्णन केलेली, रात्रभर जागून आलेली पहाट पहाण्याचे भाग्य जवळपास नाहीच.


पण पहाटे उठून जवळपास रोजच पुल म्हणतात तशी "रेडिमेड पहाट" बघण्याचे भाग्य अनंत वेळा मिळालेले आहे.  अगदी तशीच स्थिती महाराष्ट्र एस.टी. च्या बसेसबद्दल बघायला मिळते.


आमचा जन्म आणि बालपण महाराष्ट्रातल्या पूर्व भागातल्या शहरांमध्ये झाले. ही गावे महाराष्ट्राच्या एका टोकाला असल्याने तिथल्या बसस्टॅण्डवर रात्री येणा-या गाड्या रात्री उशीरात उशीरा १२, १२.३० पर्यंत येणार आणि सकाळी निघणा-या गाड्या पहाटे ३ , ३.३० ला सुरू होणार. रात्री ते बसस्टॅण्ड आमच्यासारखेच निवांत झोपी जाणार. भल्या पहाटे चुळबुळत जागे होणार. पहाटे पहिली बस निघत असली तरीही खरी वर्दळ सकाळी ५.३० , ६ वाजताच सुरू होणार. घरात आई, बाबा लवकर उठले तरीही घरातली इतर सगळी चिल्लीपिली सकाळी ६ वाजताच उठून आपापल्या दिवसभराच्या कामांना सुरूवात करणार तसेच हे. नागपूर म्हणा चंद्रपूर म्हणा हे असेच.


हे पहाटे पहाटे आळोखेपिळोखे देत जागे होणारे बसस्टॅण्डस फ़ार विलोभनीय असतात बरं का. आम्हा बसफ़ॅन्ससाठी अशी बसस्थानके म्हणजे नुकतीच सुस्नात होऊन घराबाहेर अंगणात सुरेख रांगोळी काढत असलेली सुवासिनीच. असे विलोभनीय आणि पुण्यदायक दृश्य खूप भाविकांना आवडते तसेच आम्हा बसफ़ॅन्सना असे पहाटे पहाटेचे नुकतेच उठलेले बसस्थानक बघायला आवडते. ब-याच दिवसांनी अशा बसस्थानकाला मी भेट दिली नव्हती म्हणून लॉकडाऊन काळानंतर मी चंद्रपूरच्या बसस्थानकाला मुद्दाम अशी पहाटे भेट देऊन मी त्याचे दर्शन केले होते. लिंक इथे.





मला वाटतं महाराष्ट्राच्या एका टोकाला असलेल्या सगळ्याच बसस्थानकांना हे रात्री निवांत झोपी जाऊन पहाट अनुभवायचं सुख मिळत असेल. अगदी मुंबई - ठाण्याला सुद्धा. कराडला, सातारला, छत्रपती संभाजीनगरला, धुळ्याला, नाशिकला, जालना बसस्थानकाला मात्र हे सुख नाही. बिचारे रात्रभर जागे असतात. कराड बसस्थानकावर रात्री उशीरापर्यंत कोल्हापूर - सांगली जिल्ह्यातल्या अनेक गावांमधून मुंबईला जायला निघणा-या गाड्यांची वर्दळ असते तर पहाटे अगदी लवकर मुंबई - ठाणे - नाशिकवरून सांगली आणि कोल्हापूर जिल्ह्यातल्या लहान लहान गावांपर्यंत जाणा-या गाड्यांची सुरू होते. विश्रांती अशी नाहीच.


सातारा बस स्थानक तर रात्री ९ वाजण्याच्या सुमारासच ख-या अर्थाने जागे होते असे म्हटले तर वावगे ठरणार नाही. मी कराडवरून पुणे / शिर्डी / नगर/ नाशिक / मुंबईला दरवेळी जाताना आणि येताना सातारा बसस्थानक दिवसाच्या प्रत्येक तासाला आणि रातीच्या बहुतांश तासाला बघितलेले आहे. दिवसा या बसस्थानकावर गाड्यांची गर्दी असते खरी पण रात्री हे बसस्थानक खरे जागृत होते असे म्हणायला हरकत नाही. दिवसा केवळ प्रवाशांची सोय म्हणून जागे असणारे हे बसस्थानक रात्री अक्षरशः जिवंत होते. एकेकाळी सातारा बसस्थानकाचे एस. टी. कॅण्टीन उत्कृष्ट चवीचे जेवण व इतर खाद्यपदार्थांसाठी प्रसिद्ध होते. त्यामुळे मुंबई - पुणे - नाशिककडे जाणा-या बहुतांशी बसगाड्या सातारा स्थानकावर जेवणाची वेळ असेल अशा पद्धतीने त्यांचे वेळापत्रक आखायच्यात. सातारा स्थानकावर पोचल्यावर गाडी फ़लाटावर न लावता फ़लाटासमोरच्या अंधारात उभी करून, सगळ्या प्रवाशांना जेवणासाठी उतरवून, गाडी लॉक करून चालक आणि वाहक सातारा बसस्थानकाच्या कॅण्टीनमध्ये जेवण करताहेत हे दृश्य अनेकदा दिसायचे.


छत्रपती संभाजीनगर म्हणजे महाराष्ट्राचा मध्यबिंदूच. त्यामुळे इथे रात्रभर इकडून तिकडे आणि तिकडून इकडे जाणा-या गाड्यांची वर्दळ अपरिहार्यच. रात्रभर न झोपता हे बसस्थानक पुलंच्या रसिक माणसासारखी पहाट अनुभवत असणार हे नक्की. तसेच आमचे धुळे बसस्थानक, तसेच जालना बसस्थानक. नागपूरवरून पुण्याला एस. टी. बसने जाताना पहिला क्रू (चालक - वाहक) बदलतो तो अकोला स्थानकात आणि दुसरा क्रू बदलतो तो जालना बसस्थानकात. त्या कारणामुळे या दोन्हीही बसस्थानकात ही बस जरा जास्त वेळ थांबा घेते. त्यामुळे या दोन्हीही बसस्थानकात नागपूर - पुणे बस थोडीशी डुलकी घेते आणि लगेच सावध होऊन आपल्या सेवेला लागते असे मला कायम वाटत आलेले आहे.


नागपूरला पहाटे पहाटे निघणा-या पहाटपक्षी बसेस म्हणजे पहाटे ३.४५ ला निघणा-या नागपूर टपाल गाडी चंद्रपूर आणि त्याच्याच शेजारच्या फ़लाटावरून निघणारी नागपूर टपाल गाडी उमरखेड. त्याकाळी आजच्यासारखी छपाईच्या तंत्रज्ञानात प्रगती झालेली नव्हती. नागपूरात छापली जाणारी तरूण भारत, लोकमत, नागपूर पत्रिका, हितवाद ही दैनिके बाहेरगावच्या टपाल आवृत्त्या रात्री लवकर छापून ते गठ्ठे या बसेसने अनुक्रमे चंद्रपूर आणि वर्धा, यवतमाळ, आर्णी, माहूर, उमरखेड इथे पाठविले जायचे. इथल्या लोकांना नागपूरची दैनिके सकाळी थोडी उशीरा वाचायला मिळायची.


त्यानंतर नागपूर बसस्थानक पुन्हा सामसूम झोपी जायचे. मध्ये एकदा पंढरपूर - नागपूर, बुलढाणा - नागपूर बसेस आल्या की तेव्हढ्यापुरते जागे व्हायचे पण मुख्यतः झोपलेलेच असायचे. नागपूर बसस्थानकाला खरी जाग यायची ती पहाटे ५.३० ला निघण-या नागपूर सुपर अहेरी, नागपूर जलद पुसद, नागपूर जलद इंदूर या गाड्यांच्या वर्दळीमुळे. अहेरी आगाराची बस आदल्या दिवशी रात्रीच येऊन त्या काळच्या फ़लाट १९ समोरच्या जागेत झोपलेली असायची. पहाटे ५ वाजता त्या बसची हालचाल सुरू होऊन ती फ़लाटावर लागत असे. तसेच पुसद डेपोच्या गाडीचे. नागपूर - इंदूर ही गाडी मात्र नागपूर - २ (आताचे गणेशपेठ) आगाराची असे. ती छान धुवून पुसून नागपूर - २ आगारातून बाहेर यायची आणि फ़लाट १ वर उभी असायची. सुंदर तयार झालेली ती बस पाहून खूप छान वाटायचे.



त्याकाळी चंद्रपूरवरून निघणा-या पहाटपक्षी बसेस म्हणजे सकाळी  ५.३० ला निघणारी चंद्रपूर जलद नागपूर, सकाळी ६.०० ला निघणा-या चंद्रपूर सुपर नागपूर आणि चंद्रपूर जलद शेगाव तर त्यापाठोपाठ सकाळी ६.३० ला निघणारी चंद्रपूर जलद आर्वी. यातली आर्वी बस फ़क्त बाहेरच्या आगाराची (अर्थात आर्वी) असायची. इतर बसेस चंद्रपूर आगाराच्याच असायच्यात.  


चंद्रपूर बसस्थानकावरून पहाटे साडेपाचची बस गाठायची म्हणजे पहाटे चारला उठून सगळी आन्हिके उरकावी लागायचीत. अगदी अंघोळ वगैरे सुद्धा. कारण नागपूरला सकाळी ९.०० ला पोहोचल्यानंतर वाड्यात नळ गेलेला असायचा. मग कसली अंघोळ आणि कसली आन्हिके ? स्वयंपाकापुरते आणि दिवसभर पिण्यापुरते घडाभर पाणीसुद्धा शेजारून मागून आणावे लागायचे. 


पहाटे साधारण सव्वापाचच्या सुमारास चंद्रपूरला स्टॅण्डवर पोहोचलो की साडेपाचची नागपूर, सहाची नागपूर आणि सहाची चंद्रपूर - शेगाव या तिन्ही गाड्या चंद्रपूर डेपोच्या प्रवेशद्वाराशी थांबलेल्या असायच्यात. त्यात "नेमकी नवी गाडी आज साडेपाचची देऊ देत" म्हणून आम्ही प्रार्थना करायचो पण ९९.९९ % वेळा ही प्रार्थना फ़लद्रूप व्हायची नाही. बाहेर अजूनही अंधार असल्याने आत सगळे दिवे लावलेली साडेपाचची जलद डेपोबाहेर यायची आणि फ़लाटावर लागायची.


ही साडेपाचची बस जरा लेकुरवाळ्या स्वभावाची असे. ही बस चंद्रपूरवरून निघाली की भद्रावती गावाआधी असलेल्या भद्रावतीच्या आयुध निर्माण वसाहतीत जायची. ही एकमेव बस या मार्गे जायची. मग तिथले प्रवासी घेऊन, भद्रावती शहरात असलेल्या बसस्टॅण्डवर जाणे, पुन्हा महामार्गावर परतणे, वरो-याला रेल्वे फ़ाटक ओलांडून गावात असलेल्या बसस्टॅण्डवर जाणे, पुन्हा फ़ाटक ओलांडून महामार्गावर येणे, या गदारोळात एकदा किंवा दोन्हीवेळा रेल्वेचे फ़ाटक बंद असले की खोळंबा सहन करणे या सगळ्या निवांतपणात सहाची सुपर भद्रावती आणि वरोरा थांबे न घेता पुढे निघून गेलेली असायची. जांब बसस्थानकात साडेपाचची बस शिरताना, सहाची बस वाकुल्या दाखवत निघायच्या तयारीत असायची. त्यामुळे आपण साडेपाचच्या बसमध्ये असलो की सहाच्या बसचा राग यायचा आणि सहाच्या बसमध्ये असलो की साडेपाचच्या बसची कीव यायची. 


मुंबईला नोकरी करीत असताना आम्ही नागपूर ते मुंबई हा प्रवास बहुतांशी वेळा विदर्भ एक्सप्रेसने करायचोत. तेव्हा विदर्भ ठाण्याला थांबायची नाही. आम्हाला एक तर कल्याणला किंवा दादरला उतरावे लागे. पहाटे पहाटेचीच वेळ असायची. त्या स्थानकांमध्ये अगदी सकाळी सकाळी छान तयार होऊन आपापल्या कुटुंबाच्या पालनपोषणासाठी लोकल गाडीने ऑफ़िसला / कामधंद्याला निघालेले चाकरमानी दिसायचे. सकाळी कामावर निघालेली माणसे कशीही असोत ती मला कायम प्रसन्न वाटत आलेली आहेत. ही मुंबई मला फ़ार आवडायची. सगळ्यांना काही ना काही काम देणारी आणि दिलेल्या कामावर निष्ठा ठेवणारी.


आजही मी सकाळी माझ्या महाविद्यालयात जायला निघालो की मला आपापल्या ठिकाणांवरून नागपूरला येणा-या अशा पहाटपक्षी बसेस भेटतात. यवतमाळ - नागपूर, चंद्रपूर - नागपूर, वणी - नागपूर, पांढरकवडा - नागपूर, चंद्रपूर - तिरोडा. सगळ्या. पहाटे पहाटे आपापल्या गावांवरून निघून ऑफ़िसच्या, इतर घाईच्या कामांसाठी प्रवाशांची सेवा करीत धावत असलेल्या या पहाटपक्षी बसेस पाहिल्यात की घरी लवकर उठून, आवरून घेऊन, सुस्नात होऊन आपल्या कुटुंबाच्या पालनपोषणासाठी घराबाहेर पडून मेहेनत करणा-या मुंबईच्या चाकरमान्यांची, घरधन्याची आणि घरधनीणीची आठवण येते. त्यांच्याविषयी उगाच ममत्व दाटून येतं. माणसांच्या जिद्दीला, आकांक्षांना पहाटे उठून आपल्या अगदी वेळेवर धावण्याने बळ पुरविणा-या या पहाटपक्षी बसेस. यांच्याविषयी आदर, ममता दाटून येते. या कितीही जुन्या असल्यात तरी यांच्या  कर्तव्यपालनाने या नवीनच वाटतात. (हल्ली अगदी नवीन को-या बसेस या सगळ्या मार्गांवर यायला लागल्या आहेत म्हणा. आजकाल सगळ्या बसेस MH - 14 / MH XXXX या नव्या सिरीजच्या दिसताहेत.) 



तसेही मेंदी लावलेले हात कितीही सुंदर दिसलेत, त्यावर आपले प्रियजन कितीही फ़िदा असलेत; तरी आपल्या कुटुंबासाठी पहाटे उठून जात्यावर धान्य दळून हाताला घट्टे पडलेला हात हा खुद्द त्या विधात्यालाच जास्त विलोभनीय वाटत असतो, नाही का ?



- बसेसना मानवी रूपात अनुभवणारा बसफ़ॅन प्रा. वैभवीराम प्रकाश किन्हीकर


शनिवार, २८ जून २०२५


नागपूर


#सुरपाखरू


#३०दिवसात३०


#जून२०२५


Friday, June 27, 2025

पंचायत

बरोबर वर्षभरापूर्वी याच दिवशी संध्याकाळी २०२३ - २४ या शैक्षणिक वर्षाची सांगता झाली होती. सगळ्या लेखी परिक्षा, तोंडी परिक्षा संपल्या होत्या. विद्यार्थ्यांना आणि आम्हा शिक्षकांना  उन्हाळी सुट्या मिळाल्या होत्या आणि आमच्या सदैव व्यग्र, व्यस्त मेंदूला आवश्यक असलेली विश्रांती मिळालेली होती.


गेल्या दोन वर्षांपासून लेक आग्रह करत होती., "बाबा 'पंचायत' बघ 'पंचायत' बघ म्हणून" दरवेळी काही ना काही कामे असतात. निवांतपणा असा मिळतच नाही. यावेळी मात्र ती खनपटीलाच बसली होतीआणि तिचे मन राखायचे म्हणून मी सुध्दा सुट्यांच्या पहिल्या तीन दिवसात "पंचायत" या वेब सिरीजचे तीनही सीझन्स बघून काढलेत.



तसा मी ओटीटी प्लॅटफ़ॉर्मसचा फार मोठा चाहता नाही. सगळ्या ओटीटी प्लॅटफ़ॉर्मसच्याच म्हणण्यानुसार या सगळ्या प्लॅटफ़ॉर्मसची स्पर्धा एकमेकांशी नसून माणसांच्या झोपेशी आहे. आणि परमेश्वर कृपेने आजवर तरी रात्री वरणभात - ताकभात खाऊन संपला की धुतलले हात वाळेपर्यंत आम्ही निद्रादेवीच्या राज्यात शिरलेलो असतो. अगदी घनघोर निसूर. लोकांना जागे ठेऊन, डोळे तारवटून  ओटीटी वरच्या वेबसीरीज पहायला लावणार्‍या प्लॅटफ़ॉर्मसशी आमचे जमावे कसे ?


पण "पंचायत" खूप आवडली होती. तीनही सीझन्स खूप पटले, भावले होते.


यावर्षी उन्हाळी सुट्या संपता संपता पंचायत चा ४ था सीझन आला. दोन दिवसातच आम्ही बघून काढला. हा भागही खूप आवडला. 


या भागात पंचायतच्या राजकारणाच्या चित्रिकरणावर जास्त भर दिला गेलाय. आणि कुठेही अनैसर्गिक, नुसती Hero Worship न दाखवता गावातले राजकारण आणि त्याचा खराखुरा परिपाक दाखवलेला आहे. पंचायतमधल्या सत्ताधार्‍यांवर काही काही कानपिचक्या सुध्दा दिलेल्या आहेत. पुढच्या भागाची चुटपुट लावून एखाद्या ओटीटी सिरीजचा भाग संपवणे ही प्रत्येक सिरीजची व्यावसायिक गरज असते तसा शेवट इथेही केलेला आहे. शेवटावर काही काॅमेंट करून मी ही सिरीज बघणार्‍या भावी दर्शकांचा रसभंग करू इच्छित नाही. पण एव्हढेच सांगतो की पुढल्या भागात लेखक आणि दिग्दर्शकाकडून या भागासारख्याच खूप बॅलन्स्ड आणि प्रगल्भ कथेची आणि दिग्दर्शनाची अपेक्षा असेल. कुठेही आक्रस्ताळे किंवा अवास्तव न होता पंचायतीच्या पातळीवर भारतीय लोकशाहीचे खरे दर्शन यापुढल्या भागात दर्शकांना घडविण्याचे शिवधनुष्य लेखक, दिग्दर्शकाला पेलावे लागेल. यात त्यांची खरी कसोटी लागेल.


यात विशेष उल्लेखनीय गोष्ट अशी की जरी हे चारही सीझन्स साधारण तीन वर्षांच्या कालखंडात चित्रित झाले असतील तरी यात काम करणार्‍या सगळ्याच पात्रांचे बेअरींग तसूभरही हललेले नाही. जणू काय हे चारही भाग एकसाथच सलग चित्रित केले गेल्यासारखा या सर्व प्रमुख पात्रांचा अभिनय आहे. त्यात प्रधानमॅडम असोत, प्रधानजी असोत, उपप्रधानजी असोत, सचिवजी असोत, बनराकस असो किंवा रिंकी असो.


विशेष म्हणजे या अडीच तीन वर्षात सगळ्यांच्या प्रकृतीत, शरीरयष्टीतही जाणवावा असा फरक पडलेला नाही. ही एक गोष्ट जरी आपण निसर्गाची देणगी म्हणून सोडून दिली तरी चित्रिकरणादरम्यान पडलेल्या लांब गॅपनंतरही अभिनयातले एकसंध बेअरींग कायम ठेवणे हे खरोखर कौतुकास्पद आहे. 


१९७० - ८० च्या दशकातल्या सिनेमांमध्ये इंटरव्हलपूर्वीच्या सिनेमातले बेअरिंग इंटरव्हलनंतरच्या भागात कायम ठेवणे त्या काळातल्या "महानायक" वगैरे समजले जाणार्‍या सुपरस्टार्सना कधी जमले नव्हते त्यामानाने हे खरोखर स्पृहणीय आहे.


एक मात्र नक्की. पंचायत सीझन ५ आला तर तो आवर्जून बघणार्‍या पहिल्या काही मंडळींमध्ये माझा समावेश नक्की असेल.


- उत्कृष्ट कलाकृतींचा, चित्रपट, नाट्य, साहित्य, संगीत, ललित कलांचा मनापासूनचा आस्वादक, प्रा. वैभवीराम प्रकाश किन्हीकर.


शुक्रवार, २७ जून २०२५


नागपूर


#सुरपाखरू


#३०दिवसात३०


#जून२०२५

Thursday, June 26, 2025

कौसल्येचा राम बाई कौसल्येचा राम

आमच्या बालपणी आमच्या वाड्यात सगळ्या बायका एकमेकांना त्यांच्या मुलांच्या / मुलींच्या नावाने हाक मारायच्यात. आमच्या वाड्याच्या मालकीणबाई, कुहीकर बाई, त्यांना नंदूची आई, पलांदूरकर काकूंना रवीची आई तर माझ्या आईला रामची आई. आमच्या वाड्याच्या मालकीणबाईंच्या एक वृद्ध सासूबाई होत्या. खूप धार्मिक विचारांच्या होत्या त्या. त्या तर माझ्या आईला कौसल्यामाई आणि वडिलांना दशरथराजे म्हणूनच संबोधायच्यात. अगदी एखाद्या भांडणाच्या प्रसंगी सुद्धा त्या तेच संबोधन वापरायच्यात. "हे बघ कौसल्यामाय, काल तुझा नळावरचा नंबर तिसरा होता तर आज दुसराच होईन ना ! पहिला कामून झाला ?" वगैरे


आमच्या मित्रमंडळातही एकमेकांच्या पालकांविषयी घरी बोलताना आम्ही परागची आई, राजेशची आई वगैरे भाषेतच बोलायचो. "सुतवणे मॅडम" किंवा "गोतमारे मॅडम" असले शब्दप्रयोग आम्ही कधीच वापरले नाहीत. "मॅडम" फ़क्त शाळेतल्या बाईंना म्हणायचे असाच आमचा खाक्या होत्या. "गारवे मॅडम" किंवा "सराफ़ मॅडम"


असे एकमेकींना सार्वजनिक रित्या त्यांच्या त्यांच्या मुलांच्या नावाने हाक मारण्यात किती मजा होती ! हे आज जवळपास चार दशकांनंतर मला कळू लागले आहे. आज कुणी क्वचितच अशा नामाभिधानाने एकमेकांना बोलावत असेल. अर्थात घरातल्या घरात नवरा बायकोंच्या संवादात लाडिकपणे "काय अमक्याची / अमकीची आई" असे संबोधन होत असेल तर माहिती नाही. शहाण्या माणसाने नवरा बायकोच्या संवादात तोंड घालू नये असा संकेत आहे. कर्मविपाक सिद्धांतानुसार अशा व्यक्तीला पुढला जन्म घुबडाचा मिळतो आणि रात्र रात्रभर इकडून तिकडे हिंडत भक्ष्य धुंडावे लागते असे म्हणतात बुवा. अर्थात घटस्फ़ोटांच्या खटल्यांचे वकील, त्या कोर्टातले न्यायाधीश किंवा फ़ॅमिली कोर्टाने नेमून दिलेले समुपदेशक यांचा याला अपवाद आहे. मी आपलं ते अतिशय गाजलेलं गाणं नाही का "कधी होनार तू रानी माझ्या लेकराची आई" वरून आपला एक अंदाज बांधला.


पण मानसशास्त्राच्या दृष्टीने विचार केला तर अशा स्वतःच्या मुलाच्या / मुलीच्या नावावरून संबोधण्यामुळे त्या स्त्री च्या मनात त्या अपत्याविषयी जास्त स्नेहभाव उत्पन्न होत असेल, नाही का ? त्या अपत्याविषयी त्यांच्या मनात जास्त ओलावा निर्माण होणे ही क्रिया त्यांच्या मनात घडत नसेलच असे कशावरून ? त्याच अपत्यांविषयी नव्हे तर आपल्या सर्वच अपत्यांविषयी तिच्या मनात अशा संबोधनांमुळे मायेचा पाझर जास्त प्रमाणात फ़ुटत असेल आणि तिचे आपल्या एकूणच संसारावरचे प्रेम सदोदित वृद्धींगत होत असेल असाही माझा एक कयास आहे. आताच्या तुलनेत पूर्वीच्या काळी साध्या साध्या कारणांवरून घटस्फ़ोटांचे प्रमाण अतिशय कमी होते याचे हे सुद्धा एक कारण असू शकेल का ? याचा समाजशास्त्रज्ञांनी आणि समाजमानसशास्त्रज्ञांनी सखोल अभ्यास केला पाहिजे. "स्वातंत्र्योत्त्तर अर्धशतकात मराठी समाजात विवाहित स्त्रियांची आपापसातली संबोधने आणि त्याचा घटस्फ़ोटाच्या गुणोत्त्तरावर होणारा परिणाम: एक तौलनिक अभ्यास". बघा मी कला शाखेतल्या एखाद्या संशोधकाला त्याच्या / तिच्या पी. एच. डी. साठीच्या प्रबंधाचे नावच उपलब्ध करून दिले की नाही ?


या संबोधनात मूल नसलेल्या एखाद्या अभागी स्त्रीचे काय होत असेल याचाही विचार मी केला. त्याकाळी अशा स्त्रियांचे प्रमाण कमी होते पण मी अशाही स्त्रिया त्याकाळी सुद्धा समाजात, इतर कार्यक्रमात सहभागी होताना बघितले आहे. पण या संबोधनाने त्यांची हेटाळणी झाली असे मला कधी निदर्शनास आले नाही. एक सहज संबोधन म्हणून "अमक्याची / अमकीची आई" हे वापरले जायचे. निपुत्रिक स्त्रियांच्या हेटाळणीचे अनेक प्रसंग इतरत्र यायचेत, नाही असे नाही. जुन्या काळी समाजव्यवस्था सर्वत्रच आणि सगळीच चांगली होती असा माझा दावा कधीच नव्हता आणि नसेलही. पण अशा मुलांवरच्या संबोधनांमुळे आपली हेटाळणी होतेय असे कुणाला वाटल्याचे मी तरी बघितले / ऐकले नाही.


काळ पुढे सरकला. जुन्या काळातही त्रयस्थ ठिकाणी एकमेकींचा उल्लेख "देशमुखीण बाई", "पाटलीण बाई", "ठाकरीण" असे करीत असलेल्या बायका आता ८० च्या दशकात हाच उल्लेख एकमेकींसमोर बोलतानाही "देशमुख बाई", "पाटील बाई", "ठाकरे बाई" अशा करू लागल्यात. मुलांच्या नावांवरून उल्लेख होणे कमी कमी झाले.


९० चे दशक तर सर्वत्रच जागतिकीकरण घेऊन आलेत. जगाची रीत सगळ्यांना कळू लागली. आपणही जगाप्रमाणे वागले पाहिजे म्हणून बायकांचे एकमेकींबद्दलचे समोरासमोरील संवादांमधले उल्लेख एकेरी झालेत. "अगं वैभवी", "अगं सौदामिनी", "अगं अनघा" असे. आणि त्रयस्थ ठिकाणी बोलताना नावांसमोर "मॅडम" किंवा नुसते "मॅम" चिकटले. "वै्देही मॅम" किंवा "पल्लवी मॅम" असे.


बाकी गेल्या २५ वर्षांमध्ये करियर करियर करताना नवरा आणि बायको या दोघांचेही संसाराकडे दुर्लक्ष होऊन नवराबायकोंमधला बेबनाव थोडा जास्त वाढलाय असे निदर्शनास आले आहे का ? कुटुंबाशी आपण जोडले गेलेलो आहोत, एका कुटुंबाचा आपण अविभाज्य अंग आहोत ह्या गोष्टीचा नवरा आणि बायको दोघांनाही विसर पडत चाललाय का ? कुटुंबातल्या भल्या बु-या प्रसंगांना / व्यक्तींना स्वीकारून आपण समग्र कुटुंबासाठी काहीतरी संपत्त्ती, संस्कार यांचे निर्माण करत चाललोय की फ़क्त स्वतःच्याच सुखांसाठी सुखोपभोगाची साधने निर्माण चाललोय ? हा विचार आपण सगळेच विसरलोय का ? आपल्या वैयक्तिक महत्वाकांक्षेपुढे आपल्याला मुलांकडे लक्ष द्यायला वेळ नाही, शक्ती नाही आणि इच्छा नाही असे होतेय का ? बरे ही वैयक्तिक महत्वाकांक्षा म्हणजे तरी अगदी आय. ए. एस. / आय. पी. एस. होण्याची असते का ? माझ्या ऑफ़िसात मी सगळ्यांचा / सगळ्यांची बॉस झाली पाहिजे आणि सगळ्यांना आपल्याच तालावर नाचवले पाहिजे ही ती अतिशय क्षुद्र महत्वाकांक्षा. त्यासाठी माझे दुर्लक्ष होऊन कुटुंब मोडकळीला आले तरी चालेल ही किंमत आपण मोजायला तयार आहोत. परम पूजनीय गोंदवलेकर महाराज दृष्टांत देतात त्याप्रमाणे जि-या, मि-यांसाठी आपण केशराला नाकारत चाललो आहोत का ?


गेल्या काही वर्षात तर अजूनच एक फ़ॅड बघायला मिळतेय. "Double Income No Kids" असे. "आम्हाला मूलबाळच नको. त्याच्याकडे लक्ष देणे, सांभाळ करणे, त्याला वाढविणे आमच्याकडून होणार नाही. तेव्हढी आमची शारिरीक, मानसिक आणि आर्थिक तयारी नाही." असे म्हणणारी जोडपी वाढीला लागलीत. निसर्गदत्त्त देणगीला अशा फ़ालतू कारणानी नाकारत आलेली जोडपी पाहिली की मग वाटून जातं की आता कुठली आली "मिहीरची आई" ? कोण म्हणेल "शौनकची आई" ? कोण म्हणेल "गार्गीची आई" ? 


"कौसल्येचा राम बाई कौसल्येचा राम" आता केवळ आठवणींच्या गाण्यांमध्येच उरेल.


 - माझ्या कौसल्यामाई चा अत्यंत अभिमान असलेला पुत्र , प्रा. वैभवीराम प्रकाश किन्हीकर


गुरूवार, २६ जून २०२५


नागपूर


#सुरपाखरू


#३०दिवसात३०


#जून२०२५


Wednesday, June 25, 2025

प्रसन्न "गोल्ड लाईन" घाडगे पाटील "Snooooozer" आणि लक्झरी बसेस बद्दल माझ्या अपेक्षा

 माझ्या कुंडलीत प्रवासाचे भरपूर योग असावेत आणि त्यातही प्रवास आरामदायकच व्हावेत असेही योग असावेत. तूळ किंवा वृषभ राशीचा उच्चीचा शुक्र असला की आयुष्यात असे लक्झरीचे योग येतात असे म्हणतात. माझ्या कुंडलीत हा बेटा शुक्र कुठे बसला आहे, कोण जाणे ! पण आरामदायक प्रवासाचे भरपूर योग आलेत हे मात्र नक्की. अर्थात काही काही प्रवास दगदगीचेही ठरलेत म्हणा. त्यांच्यावर एक स्वतंत्र ब्लॉगपोस्ट येऊ शकते. कदाचित तेव्हा तो गोचरीचा शुक्र नेमका वक्री असावा. बाकी शुक्र मार्गी असावा असेच योग जास्त.


मागील एका लेखात वर्णन केल्याप्रमाणे प्रसन्न ट्रॅव्हल्सने साधारण १९९३ मध्ये नागपूर - पुणे प्रवासासाठी त्यांची "गोल्डलाईन" ही लक्झरी बस सुरू केली होती. त्यातल्या ब-याचशा सोयीसुविधा त्या काळाच्या पुढे होत्या आणि काहीकाही सोयीसुविधा तर आजही ब-याचशा आराम गाड्यांमध्ये दिसत नाहीत. 


प्रसन्न ची "गोल्डलाईन" बस नागपूरवरून प्रसन्नच्याच "विदर्भ क्वीन" च्या पाटोपाठ दुपारी ३.३० च्या सुमारास निघत असे. अकोल्याला रात्री ८.३० ला पोचून पुढे पुण्याला सकाळी ७ पर्यंत पोचत असे. या वातानुकूल गाडीचे काहीकाही खास फ़ीचर्स असे होते.


अ) या गाडीमध्ये आसनांच्या ६ च रांगा होत्या. त्याकाळी "विदर्भ क्वीन" आणि इतरही गाड्यांमध्ये आसनांच्या १० रांगा असायच्यात. म्हणजे दोन रांगांमधले अंतर "गोल्डलाईन" मध्ये इतर बसेसच्या तुलनेने १६६ % जास्त होते.


आ) या "गोल्डलाईन" बसमध्ये आसनांची व्यवस्था २ बाय १ अशी होती. इतर सर्व बसेसमध्ये ती २ बाय २ अशी असायची. म्हणजे प्रत्येक आसनाची रूंदी १३३ % जास्त असू शकत होती. म्हणजे अधिकचा आराम.


इ) "गोल्डलाईन" बस इतर बससारखी १०.५ मीटर लांब असूनही फ़क्त १८ प्रवाशांना घेऊन प्रवास करीत होती. त्याकाळच्या इतर बसेस मात्र ३५ आसनी होत्या. याचाच अर्थ या "गोल्डलाईन" बस मधल्या सगळ्या प्रवाशांना मधल्या थांब्यांवर चढण्या उतरण्यासाठी कमी वेळ, कमी गर्दी लागत असणार. ही बस प्रवाशांना एखाद्या मोठ्या कारसारखीच वाटत असणार.


ई) "गोल्डलाईन" ही बस सेमी स्लीपर बस होती. दोन रांगांमध्ये अंतर जास्त असल्याने प्रत्येक प्रवाशाला भरपूर पुशबॅक करता येत होता आणि त्यासोबतच पायांच्या पोट-यांना अधिकचा आधार या गाडीतल्या विशेष आसनांमुळे मिळत होता. त्याकाळी स्लीपर बसेसचे प्रस्थ नागपूर - पुणे मार्गावर फ़ारसे नव्हते, किंबहुना एक सुद्धा स्लीपर कोच बस या मार्गावर नव्हती. तेव्हा त्याकाळी ही "गोल्डलाईन" सेमी स्लीपर बस आरामाच्या दृष्टीने या मार्गावर सर्वोत्त्तम होती हे नक्की.


उ) त्याकाळी बसमध्ये टी व्ही. असणे आणि एव्हढ्या लांबच्या प्रवासात मनोरंजन म्हणून एक दोन सिनेमे बघणे हे त्या काळी सगळ्यांसाठी एक आवश्यक गोष्ट होती. बरे, रात्री एका विशिष्ट वेळेनंतर काही काही प्रवाशांना झोप घ्यायची असायची तर इतर काही प्रवाशांसाठी टी. व्ही. सुरूच असायचा त्यामुळे काही प्रवाशांची अकारण झोपमोड होत असे. प्रसन्न कडून प्रत्येक प्रवाशाला स्वहेडफ़ोन्स दिले जात होते. त्यामुळे ज्यांना टी. व्ही. बघायचा नाही ते प्रवासी निवांत हेडफ़ोन्स काढून झोपेची आराधना करू शकायचेत. या बसच्या सीटस मध्ये चॅनेल म्युझिक ऐकण्यासाठी जॅक्स होते. त्यामुळे ज्याला उत्त्तम संगीताचा आनंद घ्यायचाय असे प्रवासी संगीतसुद्धा ऐकू शकायचेत. अर्थात प्रसन्न मध्ये लागणारे सिनेमे सुद्धा दर्जेदार असायचेत.


ऊ)  या "गोल्डलाईन" बसमध्ये प्रवाशांचे स्वागत एका वेलकम ड्रिंकने होत असे. सोबतच एक पाण्याची बॉटल आणि एक वेट वाईप टिश्यू पेपर दिला जात असे. 


प्रसन्न "गोल्डलाईनची" जाहिरात. आसनव्यवस्था त्या काळाच्या मानाने भरपूर पुढचा विचार केलेली होती.

बाकी इतर तर प्रसन्न चे सिग्नेचर फ़ीचर्स सोबत असायचेत. चांगल्या ठिकाणी जेवायला थांबणे, वेळेवर निघणे आणि पोचणे, मधल्या थांब्यांवरून अनधिकृत प्रवासी न घेणे वगैरे. त्यामुळे त्या काळी ही "गोल्डलाईन" बस नागपूर पुणे प्रवासाच्या सोयींमधली लक्झरीचा सर्वोच्च आदर्श होती. अर्थात या बसचे तिकीटही इतर बसेसच्या तुलनेत दुपटीपेक्षा जास्त महाग होते. पण प्रवाशांच्या सोयीचा, आरामाचा विचार करून, इतर स्पर्धक काय देऊ शकत नाहीत ते आपण देऊयात या भावनेने सोयी सुविधा पुरवलेली नागपूर - पुणे प्रवासासाठीची ही पहिली बस होती. हिची बस बांधणीपण "विदर्भ क्वीन" प्रमाणेच पुण्यातल्या ऑटो बॉडी या कंपनीनेच केलेली होती.


बाकी अशीच एक अतिशय उत्त्तम सेवा बरीच वर्षे कोल्हापूर ते मुंबई, मुंबई ते छत्रपती संभाजीनगर या मार्गावर कोल्हापूरचे घाडगे पाटील ट्रॅव्हल्स (मोहन ट्रॅव्हल्स) चालवीत असे. ही बस वातानुकूल शयनयान होती पण शयन आसनांची रचना इतर गाड्यांप्रमाणे २ बाय १  नसून १ बाय १  असायची. म्हणजे उजव्या आणि डाव्या बाजूला खालच्या बाजूला आणि वरच्या बाजूला एक एकच बर्थस. या गाडीत अशा ५ बर्थसच्या रांगांमध्ये २० बर्थस ची सोय होऊ शकत होती पण घाडगे पाटलांनी पहिले रांगेतले उजवीकडले पहिले दोन बर्थस काढून तिथे प्रवाशांच्या हॅंडबॅग्जसाठी जागा केलेली होती. बर्थसवर झोपताना जवळ आपली बॅग घेऊन अवघडून झोपण्यापेक्षा ती बॅग त्या रॅकमध्ये आपल्या नजरेसमोर ठेऊन सगळे प्रवासी निवांत झोपण्याचा आनंद घेऊ शकत होते. मोठे जड सामानसुमान ठेवायला बसच्या पोटात डिक्की होतीच पण तरीही जवळच्या छोट्या छोट्या सामानासाठी प्रवाशांची गैरसोय होऊ नये म्हणून बसमध्ये फ़क्त १८ च बर्थस होते. आणि त्याकाळी कोल्हापूर - मुंबई धावणा-या इतर गाड्यांच्या तुलनेने हिचे तिकीट थोडेसेच महाग होते. म्हणजे दीडपट वगैरे. अत्यंत आरामदायक प्रवासासाठी एअर सस्पेन्शन असणा-या या गाडीवर दोन्हीही बाजूला "Snooooozer" असे लिहीले असायचे. त्यातही मधल्या दोन "oo" त दोन अत्यंत झोपाळू असे डोळे काढलेले असायचे आणि शेवटल्या "r" नंतर घोरण्याचे प्रतिक म्हणून z z z असायचेत. या गाडीत बसतानाच आपण इथे निवांत झोपणार आहोत अगदी घोरेपर्यंत निवांत ही भावना व्हायची. बस तशी खरोखर खूप आरामदायक होती. सगळ्यात महत्वाचे म्हणजे प्रत्येक शायिकेखाली प्रवाशांची पादत्राणे एकाच जागी आणि व्यवस्थित राहतील अशी उत्त्तम शू रॅक पण त्या बसमध्ये होती.  


घाडगे पाटील मधला आमचा कोल्हापूर ते वाशी प्रवास. तसा आरामदायक बसप्रवास पुन्हा झाला नाही.


नंतर घाडगे पाटलांनी ही सेवा बंद केली. नवी सेवा "Snooooozer" होती खरी पण ती इतर ट्रॅव्हल्सप्रमाणे २ बाय १  केलेली होती. घाडगे पाटलांची बस, त्यांच्या बसचे मेण्टेनन्स वगैरे इतर कुणापेक्षाही उजवे असले तरी या बसचे वैशिष्ट्यपूर्ण फ़ीचर १ बाय १  शयनव्यवस्था होते ते हरवले होते.


आजच्या ट्रॅव्हल कंपन्यांनी जर २० वर्षांपूर्वीसारखा, प्रसन्न आणि घाडगे पाटील ट्रॅव्हल्स सारखा प्रवाशांच्या सुखसोयींचा आणि नेमकी त्यांची मागणी काय आहे ? याचा विचार केला तर आजही लांब पल्ल्याच्या बससेवेत खालील बदल घडू शकतील.


१) बसप्रवासासाठी आजकाल प्रवाशांची विशेषतः महिला प्रवाशांची आणि ज्येष्ठ नागरिकांची मुख्य अडचण म्हणजे बसेसमध्ये चांगली स्वच्छतागृहे नसणे. प्रवासात निसर्गाच्या हाकेला ओ देण्यासाठी दरवेळी बस थांबवावी लागणे. यात बसचालकांचाही 

ब-याचदा नाईलाज असतो. रात्री बेरात्री निर्जन स्थळी अशी बस थांबवून प्रवाशांना उतरण्यासाठी मुभा देणे धोक्याचे असू शकते. ज्या थांब्यांवर बस जेवण, नाश्यासाठी थांबते तिथली स्वच्छतागृहे चांगली आहेत की नाहीत यावर ट्रॅव्हल कंपनीचे कुठलेच नियंत्रण नसते. अशा कारणासाठी एखादा थांबा वगळून दुस-या थांब्यावर बस थांबवली तर तिथेही पहिले पाढे पंचावन्नच असतात.


यावर उपाय म्हणजे बसमधली मागची एक पूर्ण रांग काढून तिथे विमानाच्या धर्तीवरची दोन व्हॅक्युम स्वच्छतागृहे तयार करणे. आताशा अशी टेक्नॉलॉजी वापरणे म्हणजे रॉकेट सायन्स नव्हे आणि या दर्जाची स्वच्छतागृहे आता उभारणीच्या आणि नियमित देखभालीच्या दृष्टीनेही तुलनेने स्वस्त आहेत. त्यामुळे मागच्या शयन रांगेच्या ऐवजी अशी दोन स्वच्छतागृहे प्रवाशांचा खूप मोठा त्रास वाचवू शकतील.


२) सरसकट सगळी आसने १ बाय १  च असावीत आणि त्यातही आसनांची व्यवस्था पॉडसारखी असावी. आजकाल सगळी माणसे घरीसुद्धा एकमेकांशी सर्वच बाबतीत अंतर ठेऊन असतात आणि अतिशय वैयक्तिक रित्या घरीही वावरत असतात त्यामुळे प्रवासात सहप्रवाशांशी गप्पा, त्यांच्यासह सुखदुःख वाटून घेणे खूप दूरची गोष्ट आहे. त्यात आपला बर्थ हा कुणासोबत शेअर करायचा म्हटल्यावर बहुतेकांना खूप अवघडल्यासारखे होते. त्यामुळे पॉड सारखे बर्थस असलेली बस लगेचच लोकप्रिय होईल यात शंका नाही. जपानमध्ये अशा पॉड बसेस आधीपासून वापरात आहेत.


३) आज प्रवाशांची सोय बघून विशेषतः जे प्रवासी एका दिवसाच्या कामासाठी नागपूर ते पुणे ते नागपूर असा प्रवास करत असतात त्यांच्या सोयीसाठी शेवटल्या रांगेतल्या काढलेल्या शायिकांऐवजी दोन स्वच्छतागृहांसोबत आणखी दोन क्युबिकल्समध्ये अत्यंत मॉड्युलर असे शॉवर्स उपलब्ध करून द्यावेत. म्हणजे रात्रभर प्रवास करून पुण्यात सकाळी पोचून दिवसभराची कामे करून रात्री परत नागपूरला परतणारी अशी जी मंडळी असतील त्यांना हे शॉवर्स म्हणजे वरदान ठरतील. रात्रभर प्रवास करून सकाळी पुण्यात पोचण्याआधी असे स्वच्छ अंघोळ वगैरे करूनच बसबाहेर पडणे त्यांच्यासाठी एका दिवसाच्या हॉटेलचा खर्च वाचविणारे ठरू शकते. असे शॉवर्स सुद्धा उभारणीच्या आणि नियमित देखभालीच्या दृष्टीने आजकाल शक्य आहेत. फ़ार खर्चिक नाहीत. पण जर अशा प्रवाशांची सोय बघितली तर या बसला थोडे जास्त तिकीट द्यायला अशा प्रवाशांची ना असणार नाही. आज पुण्यासारख्या शहरात एखाद्या हॉटेलची रूम फ़क्त अंघोळीसाठी आणि कपडे वगैरे बदलण्यासाठी घेणे यात प्रवाशांचे किमान १००० रूपये तरी जातात. त्याऐवजी या बसेसचे थोडे महाग तिकीट प्रवाशांना परवडेलच.


४) आता अशी बस ट्रॅव्हल्सवाल्यांना आणि प्रवाशांनाही परवडण्याच्या अर्थशास्त्राचा विचार करू. साध्या २ बाय १  शायिका असलेल्या बहुतांशी बसमध्ये आजकाल ६ रांगांमध्ये ३६ शायिका असतात. प्रत्येक आसना / शायिकेसाठी नागपूर ते पुणे तिकीट १५०० रूपये धरले तर एका पूर्ण बसमधून एका ट्रीपमध्ये ट्रॅव्हल्सवाल्यांना ५४००० रूपयांचा महसूल मिळतो.


आपण शेवटली रांग काढून तिथे दोन स्वच्छतागृहे आणि दोन शॉवर्स ठेवण्याचे नियोजन करतोय. त्यामुळे आपल्या बसमध्ये शायिकांच्या ५ च रांगांची व्यवस्था असेल. प्रत्येक रांगेत उजव्या बाजूला २ पॉडसदृश शायिका (१ खाली आणि १ वर अशा रचनेच्या) आणि डाव्या बाजूला सुद्धा २ च पॉडसदृश शायिका (१ खाली आणि १ वर अशा रचनेच्या) अशा ४ शायिका येतील. म्हणजे एकूण प्रवासीसंख्या २० होईल.


आता एकूण मिळणा-या महसूलाला (५४००० रूपये) २० ने भागले तर प्रत्येक प्रवाशाला २७०० रूपये प्रवासखर्च येईल. म्हणजे साधारण बसच्या जवळपास पावणेदोन पट. पण त्या वाढीव तिकीटात ज्या सोयीसुविधा मिळत आहेत त्या हव्या असणारे २० प्रवासी तर रोज दोन्हीबाजूने अशा बसला मिळतीलच. 


काय म्हणताय ? पोचवताय आमचे म्हणणे संबंधितांपर्यंत ? "गोल्डलाईन" किंवा "Snooooozer" सारखी अशी उत्कृष्ट सोयीसुविधायुक्त, आरामदायक बस सुरू झाली तर थोडे जास्त पैसे खर्चून प्रवास कराल ?



- स्वतः एस. टी. च्या साध्या बसने कोल्हापूर ते पुणे ते अकोला ते नागपूर असा सलग २५ तास प्रवास केलेला आणि "Snooooozer"  ने सुद्धा प्रवास केलेला, सर्वत्र असा आरामदायक प्रवास आवडणारा, सगळ्यांच्या आरामाचा विचार करणारा एक प्रवासी पक्षी प्रा. वैभवीराम प्रकाश किन्हीकर


बुधवार, २५ जून २०२५


नागपूर


#सुरपाखरू


#३०दिवसात३०


#जून२०२५


Tuesday, June 24, 2025

आनंदवारी

"चला बाई, ओलांडला आपन दिवे घाट. काय भारी वाटतय ना या वारीत येऊन !"


"आपल्या महाराजांचा रथ, त्याच्या संगटच्या भजनी दिंड्या, मध्ये मध्ये होणारी रिंगनं, त्यात आपन सगळे खेळत असलेल्या फ़ुगड्या, ते घोड्या्चं रिंगन, किती भारी !"


"मुक्या जनावरालाबी येवडी शिस्त ! हा महाराजांचाच चिमित्कार बाई."


"या सगळ्या चालन्यात आणि या व्यापात रात् कशी होते आणि दररोज मुक्कामाच्या ठिकाणी जाऊन आपण आपली पिठलं भाकरीची वाढलेली शिदोरी कशी संपवतो ? ते कळतच नाही बाई. मुक्कामाच्या जागी जमिनीवरच, कांबळं अंथरून आणि एखादी गोधडी, जुनेरं पांघरून केव्हा आन कशी निवांत झोप लागते ? हे बी कळतच नाही बाई."


"घरी का बर नसेल येत आशी झोप ? आणि घरी का बर नसेल लागत अशी भूक ? घरी तर छान बेडरूममध्ये मऊमऊ गाद्या. दुलया आहेत. मस्त येसी लावून घेतलाय मालकांनी."


"घरी छान मळा आहे. ताजा भाजीपाला येतो. मळ्यात राबनारी गडीमाणसं हायेत खरी पन आपल्यालाबी त्यांच्या मागे कमी बघावं लागतय का ? रोज तशी घरात, मळयात धावपळ होतेच बाई. तरीबी घरी भूक लागतच नाही. इथं मात्र अशी भूक लागते की बाई आनखी भाकरी वा्डा म्हनायला लाज वाटते. पण आजूबाजूच्या मैतरणीबी तशाच खातायत आणि इथे कुणीबी तुमच्या खान्याकडे लक्ष देत नाहीत म्हटल्यावर आपणबी पोटभर जेवतोय. संकोच न करता. अशी भूक घरी कधी लागेल बरं ?"


"घरी गुदस्त साली सून बी आलीया. माजं पोरगं चांगलं हाय. शेतकी कालिजात शिकलं सवरलं आन घरचीच शेती, मळा चांगला करतुया की आता. सूनबी शेजारच्या गावातली, तशी लांबच्या भावकीतलीच, गरीबाघरची पोर. चांगली हाय. अगदी पोटच्या पोरीसारकी समदं करती माजं आन माज्या धन्याचबी."


"पुन्य लागतं बाई अशा संसाराला. माजं धनी आनि माजे सासू सासरे दोनीबी वारकरी. मीच थोड्या सुदारक घरातनं आले. माज्या बा ला आनि आई ला बी आसं द्येवाधर्माचं खूप नवतं. या घरात मला देताना आमच्या आत्यानं, मावशाईनं मला खूप सांगितलं व्हतं ’बाई, वारकरी घरात जातीया. संबाळून वाग गं. रूढी, परंपरा जमवून घे गं बाई.’ पन मला त कंदीच असं काई येगळ वाटलं नाई बाई या घरात वागताना. माजी सासू आन माजे मामंजी कंदीच मला ’रूकमाई’ शिवाय हाक मारले नाईत. खूप प्रेम, आदर दिला म्हाता-यानं आन म्हातारीनं बी."


"दोन वर्षामागं सासू गेली, एकादशीला. सकाळी उटून न्हाली, धुली आन म्हाता-याच्या सोबत सकाळी चा पिता पिता म्हाता-याच्याच अंगावर मान टाकून कशीशीच करू लागली बाई. मंग म्हाता-यानं शांतपनं तिच्याकडून राम नाम म्हनून घेतलं बाई. राम नामातच म्हातारीचा श्वास गेला. म्हातारा तशातही आनंदी जाला. ५२ वर्साचा संसार जाला हुता पन म्हाता-यान आनंदान निरोप दिला सासूला. ’भाग्यवान होती बा’ म्हनत राईला. म्हातारीला आगीच्या हवाली करताना एकदाच डोळ्यात पानी तरारलं 

म्हाता-याच्या पन नंतर कंदीबी नाई."


"सासू नंतर दोनच महिन्यात सासरा बी गेला. चालता बोलता. घरी सकाळी सकाळी उटला, अंगोळ करून माळ घेऊन देवाम्होरं बसला आन तिथंच गलंडला. माळ हातातच ठेवून गेला म्हातारा, एकादशीलाच. आख्ख गाव लोटलं होत म्हाता-याच्या राखेला. विमान बांदलं लोकाईनं त्याच्यासाटी. मोठाच भाग्यवान म्हातारा. मुला नातवाच्या खांद्यावर गेला आनि मातीत मिसळला.". 


"सासू सासरे असेपावेतो कंदी वारी घडली नाई. त्यांनी बी कंदीच म्हटलं नाई का हे कर आन ते कर म्हनून. गेल्या वर्सी वारीची लय ओढ लागली व्हती बाई माजी मलाच. पन घरी नवीन सून आलती, ती माझ्या पोराचं आन माज्या धन्याचं, घरचं समदं कसं करनं ? काय करनं ? काय की बाई ? अशी माजी मलाच धास्ती होती म्हनून गेल्या वर्सी वारीला न्हाई गेली."


"पन सून चांगली हाये. घर, मळा, शेती समदं चांगलं संबाळतीया. सोताच्या नव-याचं आन आम्हा दोगांचबी चांगलं करतीया. म्हनून या येळी धन्याला आन पोरगा सुनेला इचारून वारीत आलीया."


"इतं आली हाये खरी आन अजूनबी घरचीच याद येतीया. इथं नाव कदी घेऊ ? त्या इट्टलाला मनातलं कदी सांगू ? त्याला सांगाव त्याच्यापाशी काईतरी मागाव अस काईच न्हाई म्हना. काय मागू त्याच्याकडं?"


"ठरलं. त्याच्यापाशी मागू ’बापारे, माज्या सासू सास-याला लाबलं तसच भाग्य आमाला बी लाबू दे. तुजं ध्यान आयुक्षभर ठेव आमच्यात आन तुज्यात आमचबी ध्यान राऊ दे.’ आजून काय मागायच असतया ?"


"वारीत आलो तं मागायचच असतं का त्याच्याकडं ? हा वारीतला आनंद समद्या जीवनात नेहमीच राऊ दे बापा. कुनाशी काई देनं नाई न घेनं नाई. तुज्या ओढीनं पावलं पडतायत बस्स. पायाला काटे बोचतायत का चिखल्या पडतायत काईच परवा न्हाई. बस तुजं दर्सन, तुज्या कळसाचं दर्सन झाल की वाटचाल सरली. मंग चाललेल्या वाटेचा हिशेब कुनी ठेवायचा ? तसच तुज्यामंदी मिळून जायला या देहाची वाटचाल ठीव. मंदी काय सुक दुक आलं त्याचा हिशेब कशाला ठिवायचा ? शेवटच्या टायमाला तूज्यापाशी पोचलो, तुज्यात मिळालो की झाली की देहाची आनंदवारी. मग संसार सुकी आहे का दुखी आहे ? याचा काय फ़रक पडनार बापा ? जीवनाचीच अशी आनंदवारी होऊ दे."


"बोला, पुंडलिक वरदा हारी विठठल, श्री ज्ञानदेव तुकाराम, सदगुरूनाथ महाराज की जय."



- आपले जीवन हे आनंदवारी व्हावे ही भावना मनात कायम बाळगणारा, भोळा भाविक प्रा. वैभवीराम प्रकाश किन्हीकर


मंगळवार, २४ जून २०२५


नागपूर


#सुरपाखरू


#३०दिवसात३०


#जून२०२५





Sunday, June 22, 2025

फ़ूडी एक्सप्रेस

आजकाल खादाडपणाला "फ़ूडी" असे आंग्लभाषेतले नाव प्राप्त झालेले आहे ही गोष्ट आमच्या चाणाक्ष नजरेतून सुटलेली नाही. मराठी शब्दांना असा आंग्ल साज चढवला की त्यांना काय प्रतिष्ठा प्राप्त होते, नाही ? एखाद्याला "खादाड" म्हणणे हा त्याचा अपमान ठरू शकतो पण त्याच माणसाला तुम्ही "फ़ूडी" म्हणून बघा. तो माणूस ती पदवी कशी अभिमानाने मिरवतो ते बघा.


तर थोडक्यात सांगायचे म्हणजे आम्ही असे "फ़ूडी" प्रवासी आहोत. रस्ता मार्गे जाताना कुठेकुठे कायकाय उत्त्तम मिळते या बाबतचा आमचा शोध सतत सुरू असतो. अर्थात त्यात काही रॉंग नम्बर्स लागतातही, नाही असे नाही. पण पूर्वी जर असे ५० % रॉंग नम्बर्स लागत असतील तर आजकाल त्यांचे प्रमाण फ़क्त २५ % वर आलेले आहे ही त्यातल्या त्यात दिलासाजनक बाब. 


छत्रपती संभाजीनगर ते जालना रस्त्यावर असणारा "अमृतसर पंजाबी" हा अगदी पंजाबी चव देणारा ढाबा, देऊळगाव राजा इथला मराठी माणसाने चालवलेला आणि एका उत्कृष्ट चवीसोबत उत्कृष्ट संस्कृतीचेही दर्शन घडविणारा ढाबा, अशाच एका सुसंस्कृत व्यवस्थापनाने चालवलेला आणि तिथल्या स्थानिक खाद्यपदार्थांची चव आपल्याला करवून देणारा धुळे - मुंबई नॅशनल हायवेवर मालेगावच्या आधी असलेला साई कार ढाबा. आमच्या आजवरच्या भ्रमंतीत अशा अनेक हि-यांचा शोध आम्ही कायम घेत असतो.


रेल्वे प्रवासात मात्र त्या त्या रेल्वेच्या पॅंट्री कारमधून येणा-या किंवा एखाद्या मधल्या स्टेशनवर थांबल्यानंतर तिथल्या प्लॅटफ़ॉर्मवर मिळणा-या पदार्थांवरच अवलंबून रहावे लागे. रेल्वेत एखाद्या स्थानिक रेस्त्रॉ मधून ऑनलाईन पदार्थ मागवता येण्याची सुविधा साधारण २०१३ पासून सुरू झाली होती आणि नवनवीन असताना आम्ही आमच्या गोंदिया ते मुंबई आणि मुंबई ते सोलापूर प्रवासात या सेवेचा लाभ घेण्याचा प्रयत्न केला होता. पण गोंदिया ते मुंबई प्रवासात अकोल्याला आणि मुंबई ते सोलापूर प्रवासात पुण्याला ते जेवण घेऊन येणारी व्यक्ती आलीच नाही. फ़ोन केला असताना "पोचतोय, पोचतोय" म्हणून उत्त्तरे मिळालीत. बरे झाले गोंदिया ते मुंबई प्रवासात धाकटा भाऊ नागपूरला भेटायला आलेला असताना त्याने थोडे खाण्याचे पदार्थ आणलेले होते. त्यावर आम्हाला गुजराण करावी लागली आणि आदल्या रात्रीच्या अनुभवाने शहाणे होऊन मुंबई ते सोलापूर प्रवासात आम्ही कर्जतला वडे, पुण्याला सॅंडविचेस वगैरे खाऊन घेतलेले होते. त्यामुळे उपाशी रहावे लागले नाही तरी या बेभरवशाच्या सेवेमुळे आम्हाला अर्धपोटी नक्कीच रहावे लागले होते. म्हणून ऑनलाईन मागवण्यापेक्षा रेल्वेच्या पॅंट्री कारची विश्वसनीयता जास्त हा आमचा ग्रह झालेला आहे.


आमच्या लाडक्या महाराष्ट्र एक्सप्रेसला कधीच पॅंट्री कार नव्हती. खरेतर तिच्या २७, २८ तासांच्या प्रवासासाठी तिला पॅंट्री कार मिळायला हवी असा आमचा ग्रह फ़ार वर्षे होता. "डेक्कन क्वीन ला तिच्या अवघ्या ३, ३.५ तासांच्या प्रवासासाठी पॅंट्री कार मिळते आणि आमच्या महाराष्ट्र एक्सप्रेसला मिळत नाही म्हणजे काय ? हा मुंबई - पुणे करांनी आमच्या विदर्भावर केलेला अन्याय आहे." असे टिपीकल नागपुरी विचार आमच्या मनात यायचेही. आम्ही ते जाहीररित्या बोललेलोही आहे. पण रेल्वेचे एखाद्या गाडीला पॅंट्री कार देण्याचे किंवा न देण्याचे निकष निराळे असतात आणि डेक्कन क्वीनची पॅंट्री कार ही नुसती पॅंट्री कार नसून पॅंट्री कम डायनिंग कार आहे, तो भारतीय रेल्वेचा एक मानबिंदू आहे हे कळले आणि आमचा विरोध मावळला. 


महाराष्ट्र एक्सप्रेसमध्ये गाडी नागपूरवरून निघून वर्धेपर्यंत पोचली की सेवाग्राम (पूर्वीचे वर्धा पूर्व स्टेशन) स्टेशनवर डाळवडे यायचेत. टिपीकल पूर्व विदर्भाची, चंद्रपूरची उत्कृष्ट चव असणारे हे डाळवडे मी सेवाग्राम स्टेशनशिवाय इतरत्र कुठेही बघितले नाहीत, अगदी सेवाग्राम स्टेशनपासून ३ किलोमीटर अंतर असलेल्या वर्धा स्टेशनवर सुद्धा. 


वर्धा स्टेशनवर मिळणारा चहा मात्र अत्यंत मचूळ असायचा आणि आहे. अत्यंत बोगस चहाची माझी व्याख्या वर्धा आणि पुणे स्टेशनवर मिळणारा चहा अशी आहे. एखादेवेळी घरी चहा पिताना जर माझ्याकडून "वा ! फ़र्स्ट क्लास" अशी नेहेमीची दाद गेली नाही याउलट चहा पिताना चेहेरा आंबट झाला असेल तर सुपत्नी विचारायची, "एकदम पुणे किंवा वर्धा स्टेशनचा चहा झालाय का रे ?" इतका तो चहा कुविख्यात होता. मला वाटत उकळलेल्या पाण्यात कोळशाची भुकटी टाकली तरी ते मिश्रण वर्धा स्टेशनच्या चहापेक्षा चवदार लागेल. 


बडनेरा स्टेशनवर मात्र बरीच वर्षे एक चाचा आपली केळ्यांची गाडी घेऊन "केला बढिया है" अशी टिपीकल आरोळी मारत केळी विकायचेत. केळी चांगली असायचीत. खुद्द जळगाव स्टेशनात मात्र कधी असे केळी विकणारे कधी दिसले नाहीत. "पिकत तिथे विकत नाही" या म्हणीला साजेसा हा व्यवहार.


अकोला स्टेशनवर काही खास वस्तू विकत घेतल्याचे मला तरी आठवत नाही कारण अकोल्यानंतर लगेचच अर्ध्या तासात शेगावचे वेध लागतात. गाडी मंदिरासमोरून जात असताना सगळे एंजिनचालक एक मोठ्ठा हॉर्न देतातच. महाराजांना मानवंदना म्हणून. आणि गाडीतले जाणकार मंदिराच्या कळसाकडे गाडीतूनच पाहून मनोभावे हात जोडतात. "बोलाव रे देवा लवकर दर्शनाला" अशी भाक देतात. शेगाव स्टेशन मात्र टिपीकल शेगाव कचोरी साठी प्रसिद्ध आहे. पण इथे मात्र बरोबर चांगली कचोरी मिळण्यासाठी नशीबच पाहिजे. ५० - ५० पर्सेन्ट चान्सेस असतात. एखादेवेळी मस्त गरमागरम आणि ताजी कचोरी मिळून जाते तर कधी थोड्या वेळापूर्वी येऊन गेलेल्या गाडीसाठी तळलेली पण तिथे खप न झाल्यामुळे तशीच ठेवलेली कोमट किंवा थंड कचोरी घाईघाईत आपल्याला खपविली जाते. अर्थात खुद्द महाराजांचा पाय लागल्यामुळे शेगाव स्टेशन हे इतके पवित्र आहे की आपण ती थंड कचोरी सुद्धा प्रसाद म्हणून खाऊन टाकतो.


भुसावळ स्टेशन हे प्रवाशांच्या बाबतीत कॉस्मॉपॉलिटन. इथे उत्त्तरेकडून येणा-या गाड्यांमधल्या भय्या लोकांसाठी (भुसावळच्या उत्त्तरेला सगळे भैय्या राहतात हा एक टिपीकल मराठी माणसाचा समज आहे. जसा मलकापूरच्या पश्चिमेला राहणारे सगळे लोक "मुंबई - पुणेकर" हा टिपीकल वैदर्भीय माणसाचा गैरसमज आहे अगदी तसाच.), नागपूर , छत्त्तीसगढ, ओरिसा, पश्चिम बंगाल इथून येणा-या पुरभैय्यांसाठी, दक्षिणेकडून येणा-या दाक्षिणात्यांसाठी सर्व प्रकारची व्यंजने उपलब्ध असतात. केळी पट्ट्यातली केळी जळगाव स्टेशनवर मिळत नसली तरी भुसावळला मिळतात. पण हे स्टेशन प्रकृतीने कॉस्मॉपॉलिटन असल्याने स्वतःचे वैशिष्ट्य असे काही नाही.


महाराष्ट्र एक्सप्रेसमध्ये म्हणा किंवा विदर्भ एक्सप्रेसमध्ये म्हणा भुसावळ ते मनमाड ते दौंड आणि भुसावळ ते मनमाड ते कल्याण हा प्रवास रात्री होत असे. त्यामुळे मधल्या चाळीसगाव, मनमाड, कोपरगाव, अहिल्यानगर इथल्या स्टेशन्सवरच्या खाद्यसंस्कृतीचा फ़ारसा परिचय झाला नाही. तसेच मुंबईला जाताना नाशिक स्टेशनचे व्हायचे. पण परतताना, विशेषतः सेवाग्राम एक्सप्रेसने परतताना कसारा स्टेशनवर आजूबाजूची स्थानिक मंडळी पळसाच्या पानांची शंक्वाकृती आकाराचे (Conical Shape) द्रोण करून त्यात तिथल्या स्थानिक करवंदांची (रानाची मैना) विक्री करायचीत ती मात्र अप्रतिम. अर्थात आपल्या विदर्भात करवंद वेगळी असतात आणि ठाणे जिल्ह्यात ज्याला करवंदे म्हणतात ती संपूर्ण वेगळी असतात. इथली करवंदे जांभळांसारखी काळी जांभळी आणि खायला अप्रतिम गोड असतात. कसारा स्टेशनवर पुढे घाट चढण्यासाठी म्हणून गाडीला मागून दोन तीन एंजिने लावतात त्यामुळे गाडी तबियतेने थांबलेली असते. ही करवंद विकणारी मंडळी अगदी शोधून काढता येतात आणि त्यांच्यापर्यंत जाऊन आपण ती करवंदे विकत घेऊ शकतो.


बाकी कल्याण, ठाण्यापासून तर मग स्टेशनवर वडापावचेच अनभिषिज्ञ साम्राज्य सुरू होते. अर्थात तो वडापाव बाहेरगावावरून येणा-या मेल एक्सप्रेसच्या प्रवाशांसाठी नसतोच मुळी. तो वडापाव मुंबईच्या लोकलशी आपली नशीबे जोडून लांबलांब प्रवास करीत आपले आयुष्य घडविणा-या चाकरमान्यांसाठी असतो. त्यातही एखादा चलाख चाकरमानी ठाण्यापर्यंत एका लोकलने येऊन पटकन बाहेर जाऊन अगदी ठाणे स्टेशनबाहेर मिळणारा कुंजविहारचा वडा (राम मारूती रोडवरचा राजमाता वडापाव फ़ारच लांब पडला असता) घेऊन मागून चारच मिनीटांनी येणा-या दुस-या लोकलमध्ये बसून बदलापूर किंवा टिटवाळा गाठतो हे मी माझ्या डोळ्यांनी बघितलेले आहे.


विदर्भ एक्सप्रेसमधल्या एका खाद्यपदार्थाचा शोध मला फ़ार उशीरा लागला याची मला खरोखर खंत आहे. विदर्भ एक्सप्रेसला सुद्धा पॅंट्री कार नाही. विदर्भ मुंबईवरून सुटतासुटता एका वेताच्या मोठ्या टोपलीत मावतील इतक्या कुल्फ़्या घेऊन (पारशी डेअरीच्या कुल्फ़्या) एक विक्रेता साधारण S - 2  किंवा S- 3 कोचमध्ये शिरतो. त्याचा प्रवास S - 2  पासून S - 1 कडे आणि पुढे वातानुकुलीत कोचेसकडे होत असतो. पण पहिल्या वातानुकुलीत कोचमध्ये येईपर्यंतच त्याच्याकडल्या सगळ्या कुल्फ़्या संपलेल्या असतात. म्हणून जाणकार मंडळी गाडी सुटली रे सुटली की S - 2  कडे धाव घेतात. साधारण एका छोट्या ताटलीच्या आकाराची, थोडेसे दूध लागलेल्या चवीची ती अप्रतिम कुल्फ़ी खरेच खूप छान असते आणि इतके वर्ष एकच चव राखण्याचे त्यांचे कसब म्हणजे त्यांना एखादे ISO सर्टिफ़िकेटच दिले पाहिजे या मताचा मी आहे.


तसे तर हावडा मेल आणि गीतांजली गाड्यांनाही पॅन्ट्री कार फ़ार पूर्वीपासून असायच्यात. त्यातली कटलेटस सोडलीत तर इतर काही खाण्याची इच्छा होत नाही. न जाणो, सामिष आणि निरामिष (ही रेल्वेची खास भाषा. सामिष = मांसाहारी आणि निरामिष  = शाकाहारी. हे दोन संस्कृत शब्द रेल्वेतल्या कुठल्या पंडिताने कुठून शोधून काढले कोण जाणे ?) जेवणात यांनी भेसळ केली तर ? ही शंका कायम मनात असते.


बाकी कधीकधी एखाद्या अनोळखी जागीसुद्धा अप्रतिम चवीचे खाद्यपदार्थ खायला मिळतात यावर माझा विश्वास आहे बर का. अहो म्हणूनच तर दरवेळी एखाद्या अनोळखी जागेला एकदम खारीज करून न टाकता तिथली चव बघूयात तरी म्हणत आपण खात असतो ना. काहीवेळा रॉंग नंबर्स लागतीलही पण कधीकधी असा अनपेक्षित खजिनाही हाती लागतो. आम्ही सगळे कुटुंबिय दिल्ली स्टेशनवरून जम्मू मेलने जम्मू कडे निघालेलो होतो. आदल्या दिवशी दगदगीमुळे दिवसा आणि रात्रीही कुणाचेच नीट जेवण झालेले नव्हते. जम्मू मेल सकाळी ८ च्या सुमाराला पठाणकोट स्टेशनमध्ये दाखल होत असे. तिथे तिचे एंजिन उलट बाजूने येऊन लागत असे आणि तिचा पुढला प्रवास सुरू होत असे. आता जम्मू मेल पठाणकोट स्टेशनवर जात नाही. या स्टेशनला बायपास करणा-या चक्की बॅंक स्टेशनवरूनच पसार होते. पण तेव्हा ती पठाणकोट स्टेशनवर जायची. 


गाडी प्लॅटफ़ॉर्मला पुरती लागण्याआधीच "ए, छोले भटुरे" अशा आरोळ्यांनी सर्व विक्रेत्यांनी आपापल्या गाड्या घेऊन गाडीच्या कोचेसवर आक्रमण केले होते. आम्हा सर्वांना भुका तर लागल्याच होत्या. पण त्या भटु-यांचा आकार बघूनच आमच्यापैकी काहींनी "राम, आपल्याला ही डिश दोघांमध्ये एकच पुरे होईल. तसाच ऑर्डर दे." अशी मला सूचना केली. मी पण त्याचे पालन केले. पण सगळ्यांनाच सपाटून लागलेली भूक, त्यात त्या छोल्यांची अप्रतिम आणि अस्सल पंजाबी चव, ते मोठे मोठे दिसणारे पण अजिबात तेलकट नसलेले आणि तोंडात सहज विरघळणारे भटुरे यामुळे एकापाठोपाठ एक किती डिशेस आम्ही मागवल्यात आणि फ़स्त केल्यात याचा हिशेब आमच्यापैकी कुणालाच नव्हता. त्या विक्रेत्याकडे तो हिशेब होता म्हणून ठीक झाले. गाडी तिथे फ़क्त अर्धाच तास थांबली म्हणून बरे नाहीतर आमच्या गटाने तिथल्या सगळ्याच छोले भटु-यांचा फ़डशा पाडला असता. आज जवळपास २१ वर्षांनंतरही पठाणकोट स्टेशनवरच्या त्या छोले भटु-यांची चव अगदी माझ्या जिभेवर आहे.


या सगळ्यात अग्रगण्य म्हणजे मुंबई - मडगाव मांडवी एक्सप्रेसची पॅन्ट्री कार. ही गाडी आम्हा सर्व रेल्वे फ़ॅन्समध्ये "फ़ूडी एक्सप्रेस" म्हणून प्रसिद्ध आहे. आयुष्यात देवदयेने राजधानी एक्सप्रेसच्या प्रथम वर्ग वातानुकुलीत या सर्वोच्च वर्गाने प्रवास करण्याचे योग आलेत. या गाड्यांमध्ये प्रथम वर्ग प्रवाशांचे जे खाण्यापिण्याचे लाड होतात त्याला तोड नाही. सहसा हा डब्बा त्या गाडीच्या पॅन्ट्री कारच्या शेजारीच असतो आणि रेल्वेचे नियम या वर्गाच्या प्रवाशांसाठी खूप वेगळे आहेत. 


राजधानीत इतर वर्गाच्या प्रवाशांसाठी अन्न आणि पेये हे प्लॅस्टिक कन्टेनर्स मधून किंवा कागदी पेल्यांमधून आणि टेट्रा पॅक्समधून दिले जातात पण प्रथम वर्ग वातानुकूल प्रवाशांसाठी अगदी पद्धतशीरपणे चिनीमातीची भांडी, कप्स आणि स्टीलचे चमचे वापरले जातात. शीतपेये किंवा आईसक्रीम्स वगैरे काचेच्या भांड्यांमधून दिले जातात. जेवण करत असताना शेजारच्या पॅन्ट्री मधून कॅसरॉलमधून गरमागरम पोळ्या घेऊन तिथला सेवक येतो आणि आग्रह करकरून आपल्याला वाढतो. त्यामुळे या वर्गाचे तिकीट जरी विमानापेक्षा महाग असले तरी ती किंमत तिथे मिळणा-या या राजेशाही वागणुकीची आणि सेवेची असते. एकापाठोपाठ एक आपल्यावर खाण्यापिण्याचा इतका भडिमार राजधानी एक्सप्रेसमध्ये होत असतो की "बरे झाले, आपले तिकीट नागपूरपर्यंतच आहे. पुढे भोपाळपर्यंत किंवा नवी दिल्लीपर्यंत तिकीट असते तर बहुतेक आपल्याला या डब्यातून स्ट्रेचर आणूनच बाहेर काढावे लागले असते इतकी आपली पोटे तुडुंब आणि ताबडून भरलेली आहेत" अशी आमची भावना दरवेळी व्हायची.





गाडीतल्या कोचमध्ये शिरल्याशिरल्या प्रवाशांचे हे स्वागत. फ़ुले आणि टॉफ़ीज देऊन



चहापानाचा इंतजाम. सगदी सरंजामशाही पद्धत.



अगदी राजेशाही नाश्ता


अगदी राजेशाही नाश्ता



भारतीय रेल्वेतल्या अगदी टॉप क्लास गाडीतला सर्वोच्च दर्जाचा वर्ग

पण तरीही मांडवी एक्सप्रेसच्या पॅन्ट्री कारचे एक निराळेच वैशिष्ट्य आहे. इथे मिळणा-या पदार्थांची रेंज आणि त्यांची चव अगदी अतुलनीय आहे. आहुजा नावाच्या एका कॉन्ट्रॅक्टरला या गाडीचा हा पॅन्ट्री कारचा कॉन्ट्रॅक्ट मिळत आलेला आहे आणि त्यांनी आपला दर्जा कायम ठेवलेला आहे. केवळ भरपूर पदार्थ आणि उत्त्तम चव असून भागत नाही, ते पदार्थ स्वच्छ भांड्यांमधून प्रवाशांना मिळायला हवेत आणि आपल्या पॅन्ट्री कारचीही स्वच्छता तितकीच उत्त्तम असायला हवी यावर त्यांचा कटाक्ष असल्याचे कायम दिसते. मी जेव्हा जेव्हा मांडवी एक्सप्रेसने प्रवास केलाय तेव्हा तेव्हा मी आवर्जून त्या पॅन्ट्री कार मध्ये जातो आणि तिथली स्वच्छता, नीटनेटकेपणा पाहून पुन्हा पुन्हा समाधानी होतो. किंबहुना मुंबईवरून कोकणात किंवा गोव्याला जायला मांडवी एक्सप्रेसच्या आधी जनशताब्दी, तेजस एक्सप्रेस, वंदे भारत एक्सप्रेस, डबल डेकर एक्सप्रेस असे अनेक सोयीचे आणि जलद पर्याय उपलब्ध झालेले असले तरी खरा फ़ूडी रेल्वेफ़ॅन मांडवी एक्सप्रेसचाच पर्याय निवडत असतो.


मुंबई - मडगाव - मुंबई मांडवी एक्सप्रेस. 



स्वच्छ धुतलेल्या स्टीलच्या डब्यामधून आलेला अप्रतिम चवीचा उपमा आणि तितकेच चविष्ट सॅंडविच.



जेवण हे साधेसेच असले तरी चव केवळ अप्रतिम. जिभेवर रेंगाळणारी.


मांडवी एक्सप्रेसच्या पॅन्ट्री कारमधील मेन्यू. दर २००९ मधले आहेत हे ध्यानात घ्यावे.

एखाद्या स्टेशनवर मिळणा-या किंवा एखाद्या रेल्वेगाडीच्या पॅन्ट्री कारमध्ये मिळणा-या एखाद्या खास चवीच्या पदार्थाविषयी तुमच्याही अशाच काही आठवणी असतील तर नक्की कॉमेंटमध्ये लिहून कळवा. आमचाही डेटाबेस त्यामुळे विस्तारेल आणि लेख वाचणारी सगळी मंडळी त्यांच्या पुढल्या प्रवासांमध्ये ती चव घेऊन पाहतील.



- एक फ़ूडी रेल्वेफ़ॅन प्रा. वैभवीराम प्रकाश किन्हीकर. (खरेतर "खादाडखाऊ, लांडग्याचा भाऊ" असेच स्वतःला विशेषण लावणार होतो. पण उगाच आमच्या गरीब बिच्चा-या बंधूराजांना उगाचच लांडग्याची उपमा मिळाली असती म्हणून तो शब्दप्रयोग टाळला.)


रविवार, २२ जून २०२५


नागपूर


#सुरपाखरू


#३०दिवसात३०


#जून२०२५